गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 एप्रिल 2020 (09:39 IST)

पालघर घटनेतील सर्व आरोपींना अटक, दोषींना कडक शिक्षा होईल: उद्धव ठाकरे

पालघरमधील घटना अत्यंत लज्जास्पद असून दोषींवर कडक कारवाई होईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. “पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलीस कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल,” अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यांनी ट्विटरवरून याप्रकरणी माहिती दिली. 
 
गुरूवारी रात्री पालघरमधील एका गावात दोन साधूंसह एकाला ठार मारल्याची घटना घडली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पालघर प्रकरणावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. त्यानंतर या प्रकरणी कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे.
 
पालघर येथील घटना गुरुवारी रात्री घडली होती. मुंबईतून कारमधून निघालेल्या तीघांना पालघर येथे एका जमावाने अडवून त्यांना चोर समजून बेदम मारहाण करण्यात आली. या वेळी गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही जमावाने मारहाण करण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. 
 
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही पालघर प्रसरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''मुंबईहून सूरतला निघालेल्या तीघांची पालघर येथील हत्येची राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन हल्ल्यात सामील 101 जणांची अटक केली गेली आहे व उच्च स्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. कुणीही या घटनेचं विवाद करुन सामाजिक/जातीय तेढ निर्माण करत नाही यावरही सरकार लक्ष ठेऊन आहे.''