Last Modified शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (09:18 IST)
यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. १ ते १५ फेब्रुवारीदरम्यान ९२३ रुग्ण पॉझटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात गुरुवारपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. रात्री १० ते सकाळी ९ वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
शहर किंवा ग्रामीण भागात पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास व जमाव करण्यास बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तींची मर्यादा घालून देण्यात आली आहे. हॉटेल, चहा टपरी आदी सार्वजनिक ठिकाणी हँड सॅनिटायझर, मास्क, सामाजिक अंतराचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे. दुकाने, बाजारपेठ रात्री ८ वाजेपर्यंतच तर हॉटेल ९.३० पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. याशिवाय ५ ते ९वीपर्यंत सुरू असलेल्या शिक्षण संस्था, शिकवणी वर्ग २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहे. जिल्ह्यात यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद येथून सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण येत आहे. या तालुक्यात कडक निर्बंध लावण्यात येणार आहे.