रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मे 2020 (13:47 IST)

राज्य सरकारला दिलासा, २१ मे रोजी विधान परिषद निवडणुका

निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या रिक्त नऊ जागांसाठी २१ मे निवडणूक घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विनंतीनंतर निवडणूक आयोगाची शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 
 
या निणर्यामुळे निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलासा दिला आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मागणीनुसार विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली होती. 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या उभय सभागृहाचे सदस्य नाहीत. तसेच त्यांची २७ मे पूर्वी निवड होणे आवश्यक असल्याने नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी विनंती राज्यपालांनी निवडणूक आयोगाला केली होती.
 
कोरोना व्हायरसचा प्रसार आणि लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. पण राज्यपालांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याची शिफारस केल्यानंतर ही निवडणूक घेण्यास आयोगाने परवानगी दिली आहे. पण निवडणुकीदरम्यान कोव्हिड-19 महामारीचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक नियम पाळण्याची सूचना करण्यात आली आहे.