भंडारा जिल्ह्यात, नवविवाहित जोडप्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
नागपूरहून छत्तीसगडला दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका नवविवाहित जोडप्याला मागून येणाऱ्या अज्ञात महिंद्रा पिकअप वाहनाने धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार झाले. मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चिखली फाट्यावर हा अपघात झाला. रोशन महावीर साहू (२८) आणि त्यांची पत्नी चांदनी रोशन साहू (२३) अशी मृतांची ओळख पटली आहे. ते नागपूरमधील नवीन पारडी येथील रहिवासी आहेत.
मृत जोडप्याचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. दोघेही त्यांच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी राजनांदगाव जिल्ह्यातील तरोडी बोडा येथे जात होते. पण नियतीने काहीतरी वेगळेच ठरवले होते. दोघेही सकाळी 6 वाजताच्या सुमारास नागपूरहून एकाच दुचाकीने राजनांदगाव जिल्ह्यातील तरोडी बोडा येथे एका लग्न समारंभाला जात होते.
भंडारा जिल्ह्यातील चिखली फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या महिंद्रा पिकअपने धडक दिली. पिकअप चालकाने दोघांनाही सुमारे 100फूट ओढले. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोहोचले. पिकअप गाडीचा चालक घटनास्थळावरून पळून गेला असून पोलिसांनी गाडीचा शोध सुरू केला आहे.या दुःखद घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
Edited By - Priya Dixit