शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 जुलै 2021 (15:21 IST)

राज ठाकरेंनी केलं बाबासाहेब पुरंदरेंचं कौतुक

बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत राज ठाकरे म्हणाले की, "आनंदी आहे पण समाधानी नाही, असं बाबासाहेब पुरंदरेंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यांना अजून काही इतिहासातून शोधता येईल का, असं वाटत राहायचं. मी लहानपणापासून बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्याने ऐकली आहेत. आजही ऐकतो."
 
"मला प्रत्येक वेळी असं वाटतं की ते फक्त शिवचरित्र सांगत नाहीत. तर त्या माध्यमातून आपण आज 2021 मध्ये कसं जगायला पाहिजे, देशातील हिंदूंनी कसं सावध असलं पाहिजे, हे सांगण्याचा प्रयत्न बाबासाहेब सातत्याने करत आले आहेत. आजच्या काळातही त्या गोष्टी लागू होतात," असं राज ठाकरे म्हणाले.
 
"आमच्या प्रत्येक गाठीभेटीवेळी बाबासाहेब नवीन काहीतरी ऐतिहासिक साक्षात्कार घडवतात. मला यामध्ये खूप रस आहे. आपल्या येथील आडनावे, खाद्यपदार्थ कुठून आले, त्याचा शोध इतिहासात मिळतो. या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांकडून समजून घेता येतात. बाबासाहेबांशी माझी अनेकवेळा विविध विषयांवर चर्चा झाली. त्याबाबत मी स्वतःला नशीबवान समजतो.
 
"बाबासाहेब पुरंदरे यांची लिखाणाची भाषा पाहिल्यास ती अलंकारिक आहे, पण अतिरंजित नाही. बाबासाहेबांच्या संपूर्ण लिखाणादरम्यान त्यांनी इतिहासाला कधीच धक्का लावला नाही. शिवाय, दंतकथांनाही त्यामध्ये शिरकाव करू दिला नाही. इतिहासाच्या पानांमध्ये जे काही सापडलं, असं सत्यच त्यांनी त्यांच्या चरित्रात लिहिलं," असं राज ठाकरे म्हणाले.
 
बाबासाहेब पुरंदरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. त्यांच्यातील संवाद पाहण्याचा मला योग आला. त्यामुळे मी स्वतःला नशीबवान समजतो, असं राज ठाकरे म्हणाले.
 
ज्या लोकांना जाती-जातीत भेद करून मतदान हवं आहे, त्यांनीच बाबासाहेबांवर टीका केली. ती माणसं त्यांच्यासमोर किरकोळ आहेत. त्यांचा हेतू काय आहे, हे सर्वांना माहीत आहे.