शिवसेना पक्षाचा वाद: सुनावणी पुढे ढकलली, 'पुन्हा तारीख पे तारीख'
शिवसेना पक्षाचा वाद (उद्धव ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदे गट) आणि 'धनुष्यबाण' चिन्हाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली गेली आहे. हे प्रकरण २०२२ पासून सुरू असून, साडे तीन वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहे.
शिवसेना पक्षाचे नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली महत्त्वाची सुनावणी गुरुवारी पार पडली. या सुनावणीदरम्यान दोन्ही गटांनी आपला अंतिम युक्तिवाद मांडण्याची तयारी दर्शवली असून, आता न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुढील तारीख प्रलंबित
दोन्ही बाजूंचे (ठाकरे आणि शिंदे गट) लेखी युक्तिवाद वाचल्यानंतर, न्यायमूर्तींच्या उपलब्धतेनुसार अंतिम सुनावणीची पुढची तारीख निश्चित केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
तीन वर्षांपासून लढा
२०१२ मध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर हा वाद सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेले 'शिवसेना' नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
पार्श्वभूमी:
जून २०२२ - एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांचे बंड; महाविकास आघाडी सरकार कोसळले.
फेब्रुवारी २०२३- निवडणूक आयोगाचा निर्णय; शिंदे गटाला 'धनुष्यबाण' व 'शिवसेना' नाव बहाल.
फेब्रुवारी २०२३- उद्धव ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव; 'मशाल' चिन्हाचा तात्पुरता वापर सुरू.
जानेवारी २०२४- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल; शिंदे गटालाच 'खरी शिवसेना' म्हणून मान्यता.
मे २०२५- सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; मात्र स्थानिक निवडणुकांपूर्वी तातडीने निकाल देण्यास नकार.
ठाकरे गटाचा मुख्य दावा असा आहे की, निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाही मूल्यांच्या विरोधात असून मूळ पक्षाची ओळख पुसण्याचा हा प्रयत्न आहे. दुसरीकडे, शिंदे गटाने विधीमंडळातील बहुमताच्या जोरावर आपला दावा कायम ठेवला आहे. आता न्यायालय या प्रकरणाचा अंतिम निकाल कधी जाहीर करते, यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे.