शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 जुलै 2020 (16:00 IST)

शाळा कधी सुरु कराव्यात ? पालकांना थेट सवाल

मानव संसाधन विकास मंत्रालयाचा भाग असणाऱ्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने राज्यं तसच केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवलं आहे. यात पालकांकडून शाळा कधी सुरु कराव्यात यासंबंधी मत मागवण्यास सांगितलं आहे. ऑगस्ट, सप्टेंबर की ऑक्टोबर…कोणत्या महिन्यात शाळा सुरु करणं तुम्हाला योग्य वाटतं अशी विचारणा पालकांकडे करण्यास सांगण्यात आलं आहे.
 
राज्यांना अभिप्राय नोंदवण्यासाठी तीन दिवसांची डेडलाइन देण्यात आली आहे. १७ जुलै रोजी सर्व राज्यांच्या शिक्षण सचिवांना पाठवण्यात आलेल्या पत्रात मंत्रालयाकडून विनंती करण्यात आली आहे की, “शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून २० तारखेपर्यंत अभिप्राय नोंदवला जावा”.
 
मंत्रालयाकडून दोन प्रश्नांवर पालकांचं मत मागवण्यात आलं आहे. यामधील पहिला प्रश्न म्हणजे, ऑगस्ट, सप्टेंबर की ऑक्टोबर कोणत्या महिन्यात शाळा सुरु करणं पालकांना अनुकूल वाटतं. दुसरं म्हणजे शाळा सुरु झाल्यानंतर पालकांच्या काय अपेक्षा असणार आहेत.
 
एकीकडे अधिकाऱ्याने राज्यांना पत्र पाठवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असताना दुसरीकडे शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. अभिप्राय देण्यासाठी सोमवारची डेडलाइन असताना अद्यापही अनेक शाळांना याबद्दल कोणतीच माहिती नसल्याचं कळत आहे.