1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: सोमवार, 25 जुलै 2022 (07:57 IST)

Gatari Amavasya 2022 गटारी नव्हे गताहारी

deep amavasya
आपल्या सणांना बदनाम करायचे काम आपणच नेहमी करत असतो. आपल्या कडे आषाढी अमावस्या नंतर आहारात बदल केला जातो. या दिवसाला गताहारी(जो आहार गेला आहे ती ) अमावस्या म्हणतात.
 
गटारी नव्हे गताहारी
गटर हा इंग्रजी शब्द आहे. अशुध्द जलसंवहन यंत्रणेसाठीचा हा इंग्रजी प्रतिशब्द. इंग्रजांच्या काळात या शब्दाशी भारताचा परिचय झाला. भारतीय सण हे नेहमीच पावित्र्याचं अधिष्ठान असलेले आहेत. तसेच स्धल काल व परिस्थिती यांच्याशी त्यांचा प्रगाढ संबंध आहे. आषाढ हा पूर्वी विशेष करुन तीव्र वर्षावाचा कालावधी असे. पावसामुळे अंधारलेपण व अन्न अनुपलब्धता हा मोठा अडचणीचा भाग असे.
 
श्रावण सुरू होण्यापूर्वी व नंतरही श्रावणात कित्येकदा ऊपोषणाची स्थिती असे. शिवाय पावसाळी पाण्याने रोगराई पसरण्याच्या शक्यता टाळण्यासाठी ऊपोषणाचा वैद्यकीय सल्ला धार्मिक आधार देऊन चार महिन्या साठी लागू केला गेला. 
(चातुर्मास)
ऊपोषण म्हणजे गताहार -  गत म्हणजे गेलेला आहार म्हणजे जेवण. तर असा हा गताहार प्रारंभ आषाढी अमावस्येपासून होतो. म्हणून गताहारी अमावस्या. आपल्या प्रत्येक सणांचे नावे संस्कृतवर आधारित आहेत. Gutter हा इंग्रजी शब्द आपल्या सणाला खोडसाळ पणे जोडलेला आहे. आपली लायकी गटारात लोळायची आहे असे आपल्याला हिणवले गेले व दुर्दैव हे की आपण ते खरे ठरवण्याच्या मागे लागलोय.
 
आपल्या महान संस्कृतीची जाणीव ठेवा. आपल्या प्रत्येक सणाला मोठा अर्थ आहे. आपल्या सणांची बरोबरी कुणीही करू शकत नाहीं. आपले सण फक्त आपण आपल्या खऱ्या संस्कृतीने साजरे करू या आणि जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या अपभ्रंशाने होणारा ऱ्हास थांबवूया.
 
गटार (Gutter) नव्हे, गताहार
गत = मागील, जुने, गेलेले, आता नाहीं ते
आहार = भोजन
गत+आहार = गताहार
 
जसे:-
शाक+आहारी=शाकाहारी
तसे:-
गत+आहारी=गताहारी
गत+आहारी+अमावस्या = गताहारी अमावस्या
 
या दिवशी दीप पुजन करतात
येत्या रविवारी २८ जुलै २०२२  रोजी दीप अमावस्या आहे. हिंदूंच्या सर्वाधिक कुचेष्टेचे, विकृत विनोदांचे  जे सण आहेत त्यात वटपौर्णिमेनंतर दीप अमावस्या हा सण येतो.  व्यक्तिगत पातळीवर गटारी साजरी करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे.  पण दीप पूजे ऐवजी केवळ गटारी म्हणून याला सर्वत्र  कुप्रसिद्धी मिळू नये असे वाटते.  जो आपला सणच नाहीये त्यासाठी आपण आपला धर्म,आपली संस्कृती का म्हणून बदनाम करायची ? उलट महाराष्ट्रातील सर्व जातींच्या लाखो घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने या दिवशी दीपपूजन केले जाते. 
 
त्यामुळे अशी आपलीच मानहानी टाळण्यासाठी गटारी हा शब्द वापरू नका ही विनंती आम्ही अनेकांना करीत असतो. तसेच दारूच्या बाटल्या, कोंबड्या, बोकड यांची चित्रे शुभेच्छा म्हणून एकमेकांना पाठविणे, Happy Gatari म्हणून wish करणे या वाईट गोष्टी आपण कटाक्षाने टाळाव्यात.
 
हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या धर्मात याच्या मागचे विज्ञानही सामावलेले आहेच. पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. किमान या पावसाळी दिवसांमध्ये मांसाहार बंद ठेवण्याची तीव्र गरज आणि आपली प्रथा किती दूरदर्शीपणे आपल्या पूर्वजांनी योजली आहे हे यावर्षी प्रकर्षाने अधोरेखित होते आहे.
 
आपण यामागची वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया:
१) या ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही.
 
२) बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा / प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली  तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत. मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून ? याचा  साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो.  त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते. 
 
३) या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.
 
४) वातावरणात ओलावा असतो. मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते  हवेतील वाढलेल्या  जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते. 
 
५) आज विविध लसी, अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके, औषधे उपलब्ध असूनसुद्धा, धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथीना  आवर घालणे कठीण झाले आहे. अनेक  घातक रोगांच्या जीवघेण्या साथी, ह्या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतुंमुळे पसरतात. म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो. 
 
अशा सर्व कारणांमुळे या दिवसाला धार्मिक जोड दिली गेली आहे. त्यामुळे  आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो.
 
या दिवसात शाकाहार करण्यामागेही शास्त्रीय कारणे आहेतच--
 
१ ) अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायलाही  मिळत नाहीत. 
 
२) शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या  जातात. 
 
३) तुलनेने शाकाहाराचे या दिवसात नीट पचन होते.                                              
 
४) विविध उपासांच्या दिवशी खाल्ल्या  जाणाऱ्या कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खनिजे आणि उपयुक्त पोषक घटक अपोआप शरीराला लाभतात. 
 
५) कायम मांसाहार करणाऱ्यांच्या पचन संस्थेवर नेहेमी येणारा ताण, या शाकाहारी बदलामुळे कांही काळ कमी होतो.  
 
म्हणून विनंती  " श्रावण जरूर पाळा, गटारीची कुप्रसिद्धी टाळा "!
- सोशल मीडिया