मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जुलै 2022 (14:39 IST)

बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 ला सुरुवात, भारताला विजयाची सोनेरी संधी का मानली जातेय?

2013 ला चेन्नईत झालेली बुद्धिबळ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर लिडिंग न्यूज बनली होती. त्यानंतर तब्बल एक दशकाचा कालावधी लोटलाय. 2013 मधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर भारतात दुसरी मोठी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
 
28 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान चेन्नईजवळ असलेल्या ममल्लापुरम शहरात चेस ऑलम्पियाड स्पर्धा आयोजित करण्यात आलीय. या स्पर्धेत 180 हून अधिक देशांतील स्पर्धक सहभागी झाले आहेत.
 
2014 मध्ये भारताने ऑलिंपियाडमधील खुल्या गटात ब्रॉंझपदक जिंकलं होतं.
 
यावेळी भारताच्या खेळाडूंमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करण्याची क्षमता आहे. तेच भारताला अमेरिकेतील बुद्धिबळपटूंचे कडवं आव्हान असणार आहे.
 
भारतीय संघाला वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने मार्गदर्शन केले आहे. तसेच जगभरातील सर्वोत्तम अशा यशस्वी प्रशिक्षकांनी या संघाला मार्गदर्शन दिले आहे.
 
भारताचे सहा संघ या स्पर्धेमध्ये उतरणार आहेत. यात एकूण 30 भारतीय खेळाडू असतील जे देशाचं प्रतिनिधित्व करतील.
 
हे खेळाडू गेल्या काही आठवड्यांपासून सांघिक प्रशिक्षण घेत आहेत. यातले काही खेळाडू स्पर्धेसाठी बाहेर गेले होते. त्यांच्यात अजूनही विमान प्रवासाने येणारा शीण आहे. होम ग्राऊंडवर होणाऱ्या स्पर्धेचा उत्साह आणि दडपण त्यांच्यावर असू शकतं.
 
पहिल्या ओपन टीममध्ये पेंटाला हरिकृष्ण, विदित गुजराथी, के शशिकिरण, एसएल नारायणन आणि अर्जुन एरिगायसी असतील. पण बी टीम मध्ये ही सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत.
 
नियम
कोणताही संघ एकाच प्रतिस्पर्ध्याशी एकापेक्षा जास्त वेळा खेळणार नाही. तसेच दोन संघांच्या मॅच पॉइंटमधील फरक 0 किंवा शक्य तितका लहान असावा.
 
"A" संघात देशातील हायरेटेड खेळाडू असतील तर "B" संघात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट खेळाडू असावेत.
 
सामना जिंकण्यासाठी दोन गुण, ड्रॉसाठी एक आणि हरल्यास कोणतेही गुण मिळणार नाहीत.
 
खुला गट आणि महिला अशा दोन विभागात स्पर्धा विभागली आहे. खुल्या गटात महिला आणि पुरुष दोघेही सहभागी होऊ शकतात.
 
बी संघात भारतातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर्स आहेत. यात आर प्रज्ञनंदा, डी गुकेश, निहाल सरीन, रौनक साधवानी आणि बी अधिबान आहेत.
 
दुसऱ्या मानांकित भारतीय संघाचे प्रशिक्षक श्रीनाथ नारायणन म्हणतात, "आमच्याकडे खरोखरच मजबूत "बी" टीम आहे. ही टीम आम्हाला मेडल्स मिळवून देईल."
 
ते म्हणाले, "शेवटच्या क्षणी शारीरिक अडचणी आल्या नाहीत तर हा सामना जिंकायची संधी आहे. त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं नक्कीच आहे मात्र त्यांच्यावर दबाव निर्माण होणार नाही."
 
उद्घाटन आणि समारोप समारंभासाठी प्रत्येकी एक दिवस राखीव असतो. त्यामुळे 29 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान सामने खेळवले जातील. हे सामने 11 राऊंडसमध्ये खेळले जातील. त्यामध्ये विश्रांतीसाठी एक दिवस असेल. एका संघात चार खेळाडू असतील आणि एक राखीव असेल.
 
कोनेरू हंपी आणि गरोदर असलेली हरिका द्रोणवल्ली या दोन तगड्या खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय महिला संघ पहिल्या स्थानावर मानांकित आहे. हा संघ अंतिम फेरी गाठेल अशी अपेक्षा आहे. या संघात तानिया सचदेव, आर वैशाली आणि भक्ती कुलकर्णी यांचाही समावेश आहे.
 
ऑनलाइन ऑलिम्पियाडच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने पदकांना गवसणी घातली. या सामन्यात वेळेचं नियंत्रण ठेऊन वेगवान गतीने सामना खेळण्यात आला. पण दर दोन वर्षांनी प्रत्यक्षात होणाऱ्या आणि बोर्डवर खेळल्या जाणाऱ्या शास्त्रीय बुद्धिबळ स्पर्धेशी या ऑलिम्पियाडची तुलना होऊ शकत नाही.
 
बऱ्याचदा अशा स्पर्धा भरवण्यासाठी यजमान देश बऱ्याच आधीपासून तयारी करत असतात. युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियाकडून यजमानपद हिसकावण्यात आले. आणि भारताने संधी साधली.
 
तामिळनाडू सरकारने 80 कोटीच्या डिपॉजिटची व्यवस्था केली आणि त्यानंतर ऑल इंडिया चेस फेडरेशनने 1700 खेळाडूंचा सहभाग असलेला हा दहा दिवसीय समारोह आयोजित केला.
 
स्पर्धेच्या ठिकाणी ऐनवेळी गोंधळ उडू नये म्हणून रविवारी देशातील 1400 खेळाडूंसह एक चाचणी स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा इलेक्ट्रॉनिक बुद्धिबळ बोर्डवर घेण्यात आली.
 
जगभरातल्या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर शुभंकर 'थंबी' चं पोस्टर लावण्यात आलं आहे. हा पारंपारिक तमिळ पोशाख धोतर (धोती) आणि शर्ट परिधान केलेला शूरवीर आहे आणि हात जोडून उभा आहे. हा शुभंकर तामिळ अभिवादन 'वनक्कम' चा संदर्भ देतो.
 
पॉवर हाऊस असलेला रशिया आणि चीन या ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होणार नाहीत. पण उर्वरित मुख्य राष्ट्र त्यांच्या सर्वोत्तम खेळाडूंसह स्पर्धेत सहभागी होताना दिसतील.
 
यात जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेला नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन आहे. सलग पाचवेळा जेतेपदाला गवसणी घातल्यानंतर पुढच्या वर्षीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बाहेर पडण्याची त्याने घोषणा केली आहे.
 
कार्लसनसाठी हा योगायोगचं म्हणावा लागेल. कारण 2013 साली याच शहरात त्याने विश्वविजेत्या विश्वनाथ आनंदला हरवून जेतेपदाला गवसणी घातली होती.
 
भारताच्या युवा बुद्धिबळपटूंच्या पिढीच्या कल्पनेला चालना देणारा हा सामना होता. आज देशातील सर्वांत आश्वासक असे ग्रँडमास्टर्स त्यावेळी सात किंवा आठ वर्षांची लहान मुलं असतील.
 
त्या सामन्यादरम्यान हयात रीजेंसी हॉटेलच्या लॉबीला बुद्धिबळाच्या जत्रेचे रूप आलं होतं. सर्व मजल्यांवर बोर्ड पसरले होते. तिथं आलेली मुलं बुद्धिबळातले डावपेच सोडवण्यात व्यस्त होती.
 
या मुलांमध्ये प्रज्ञनंदा आणि निहाल होते. त्याच दरम्यान चेन्नईत झालेल्या नऊ वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत यांनी बाजी मारली होती. अवघ्या 20 व्या वर्षी विश्वविजेता म्हणून बाजी मारलेल्या कार्लसनचा प्रभाव स्पर्धेत उपस्थित असणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या मनावर पडला असेल.
 
गॅरी कास्पारोव्ह आणि विश्वनाथ आनंद यांच्यात झालेली 1995 ची वर्ल्ड चॅम्पियनशिपची लढत ग्रँडमास्टर श्रीनाथसाठी प्रेरणादायी ठरली. "माझ्या वडिलांनी तो सामना टीव्हीवर पाहिला आणि ते बुद्धिबळाच्या प्रेमात पडले. तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं की मी हा खेळ खेळावा. तेव्हा मी अवघ्या एक वर्षाचा होतो." असं श्रीनाथ सांगतो.
 
भारतात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या ऑलिम्पियाडसाठी आयोजकांनी प्रसिद्धीचा धडाका लावलाय. चेन्नईच्या सर्वात प्रतिष्ठित वास्तूंपैकी एक असलेल्या नेपियर ब्रिज तुम्हाला बुद्धिबळाचा भला मोठा बोर्ड असल्याचं भासेल. थंबी तुम्हाला दुधाच्या पॅकेटवर सुद्धा दिसेल. सोशल मीडियावर तर कार्यक्रमाच्या हॅशटॅगने ऊत आणलाय.
 
कोव्हीड आल्यापासून बुद्धिबळला सुगीचे दिवस आले असं म्हणता येईल. युट्युब आणि ट्विच स्ट्रीमवर मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन सर्च मध्ये हा गेम दिसतो. या ऑलिम्पियाडला त्याचा फायदाच मिळेल.
 
भारताने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भूषवून नऊ वर्षे झाली आहेत. तेव्हाच्या गोष्टी आता धूसर झाल्या आहेत. त्यामुळे आता मोठी स्पर्धा भरवून रीफ्रेश व्हायची हीच वेळ आहे.
 
भारताच्या बुद्धीबळ संघासाठी हा सामना ऐतिहासिक ठरू शकतो. क्रिकेट आणि युरोपियन फुटबॉलवर प्रेम करणाऱ्या भारतीय क्रीडा चाहत्यांना कदाचित पुढचा दीड आठवडा त्यांच्या सोशल मीडिया फीडवर फक्त आणि फक्त बुद्धीबळचं दिसेल.
 
आणि देशातल्या तगड्या बुद्धिबळपटूंना नावानिशी ओळखणं एवढं सुद्धा पुरेसं ठरेल.