1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 एप्रिल 2023 (14:33 IST)

कुस्तीपटू आंदोलन : खेळाडूंना न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागणं दु:खद - नीरज चोप्रा

कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्या नेतृत्त्वात पैलवानांनी पुन्हा एकदा दिल्लीतल्या जंतरमंतर मैदानात आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला आता राजकीय, तसंच क्रीडा क्षेत्रातूनही पाठिंबा वाढत चालला आहे. मात्र, तरीही सरकारकडून अद्यापही या कुस्तीपटूंचं म्हणणं ऐकलं जात नाहीय. ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा यानं पत्रक काढून कुस्तीपटूंच्या आंदोलनावर भाष्य केलंय.
 
खेळाडूंना न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागणं दु:खद - नीरज चोप्रा
नीरज चोप्रानं म्हटलंय की, "खेळाडूंना न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरावं लागतंय, हे पाहून दु:ख होतंय. आपल्या देशाला अभिमान वाटेल असं प्रतिनिधित्त्व करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेत. देश म्हणून आपण प्रत्येक खेळाडूच्या प्रामाणिकतेचं आणि प्रतिष्ठेचं संरक्षण केलं पाहिजे."
 
नीरज चोप्रा पुढे म्हणाला की, "जे काही घडतंय, ते कधीच घडायला नको होतं. हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे. याकडे अत्यंत निष्पक्षपणे आणि पारदर्शकपणे पाहायला हवं. संबंधित प्राधिकारणाने यावर ताततडीनं कारवाई करत, न्याय देण्याचा विश्वास दिला पाहिजे."
 
माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनीही जंतर-मंतरवर आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंचं समर्थन केलं आहे.
 
त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकांउंटवर आंदोलक कुस्तीपटूंचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे, “यांना न्याय मिळेल का?”
 
हा फोटो शेअर करताना त्यांनी विनेश फोगाट आणि बजरंग पुनियालाही टॅग केलं आहे.
 
रस्त्यावर आंदोलन केल्यानं देशाची प्रतिमा मलिन होतेय - पीटी उषा
राज्यसभा खासदार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत म्हटलं की, "पैलवानांनी रस्त्यावर आंदोलन करणं अनुशासनहीनता आहे आणि यामुळे देशाची प्रतिमा मलिन होतेय."
 
पीटी उषा यांना पैलवान बजरंग पुनिय यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, "त्या स्वत: महिला आहेत. हे ऐकून दु:ख झालं. आम्ही तीन महिने वाट पाहिली. आम्ही त्यांच्याकडेही गेलो. मात्र, आम्हाला न्याय मिळाला नाही आणि त्यामुळे आम्ही इथे यावं लागलं."
 
तर पैलवान साक्षी मलिक म्हणाली की, "महिला खेळाडू असूनही त्या अशा बोलत आहेत. हे ऐकून खरंच दु:ख झालं. आम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घेतो. आम्ही कुठे अनुशासनहीनता केली? आम्ही शांततेत आंदोलन करतोय. आम्हाला हे अपरिहार्यपणे करावं लागतंय."
कुस्तीपटू जंतर-मंतरवर
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून महिला पैलवानांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली आहे. बृजभूषण यांनी लैंगिक शोषण केल्याचे आरोप या महिला खेळाडूंनी केले आहेत.
 
बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून विनेश फोगाट, साक्षी मलिक या महिला खेळाडू दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करत आहेत. अनेक पुरुष पैलवानांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला आहे.
 
जानेवारी महिन्यात या खेळाडूंनी बृजभूषण यांच्याविरोधात आंदोलन केले होते. त्यांच्यावर कारवाई होईल असं आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं होतं पण मध्ये बराच काळ जाऊनही बृजभूषण यांच्यावर कारवाई न झाल्यामुळे हे आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
 
रविवार दुपारपासून हे खेळाडू आंदोलन करत आहेत. बृजभूषण यांच्याविषयी तक्रार करून तीन महिने लोटले तरी देखील अद्याप आम्हाला न्या मिळाला नाही असं खेळाडूंचं म्हणणं आहे.
 
जानेवारी महिन्यात जेव्हा हे आरोप झाले होते तेव्हा बृजभूषण यांनी हे आरोप फेटाळले होते.
 
 
जानेवारी महिन्यात काय घडलं होतं?
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.
 
बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटू जंतरमंतर मैदानावर आज (18 जानेवारी) धरणे आंदोलनास बसल्या होत्या.
 
यावेळी महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.
 
कुस्तीपटू विनेश फोगाटने पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं, “प्रशिक्षक महिलांना त्रास देत आहेत. महासंघाचे काही आवडीचे प्रशिक्षक तर महिला प्रशिक्षकांनाही असभ्यतेने वागवतात. ते महिला खेळाडूंना त्रास देता. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनीही अनेक मुलींचं लैंगिक शोषण केलं आहे.”
 
फोगाट पुढे म्हणाली, “ते आमच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करतात आणि त्रास देतात. ते आमचं शोषण करत आहेत. आम्ही ऑलिम्पिक खेळण्यासाठी जातो त्यावेळी आमच्याकडे ना फिजिओ असतो ना प्रशिक्षक. आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र त्यांनी आम्हाला धमकावणं सुरू केलं.
 
विनेश फोगाट ही 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतील 53 किलो वजनी गटातील सुवर्ण पदकविजेता आहे.
 
विनेश फोगाट पुढे म्हणाली, “माझा इतका मानसिक छळ करण्यात आला आहे की मी एके काळी आत्महत्या करण्याचा विचार करत होते. दररोज माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे. प्रत्येक खेळाडूला आमच्यासोबत काय घडत आहे, याची कल्पना आहे.”
“मला काही झालं, तर माझ्या कुटुंबाचं काय झालं असतं, याची जबाबदारी कुणी घेतली असती? आपल्या कोणत्याही खेळाडूला काही झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी कुस्ती महासंघाची असेल. आमचा इतका मानसिक छळ होतो. वरून मला म्हटलं जातं की मीच मानसिकरित्या कमकुवत आहे.”
 
यादरम्यान विनेश फोगाटच्या डोळ्यात अश्रूही तरळल्याचं दिसून आलं.
 
कुस्तीपटूंनी पुकारलेल्या धरणे आंदोलनात अनेक दिग्गज खेळाडू उतरल्याचं दिसून येत आहे.
 
दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिकसह इतर अनेक खेळाडू ठाण मांडून बसले आहेत.
 
कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला, “कुस्ती महासंघामध्ये बदल व्हावा, अशी आमची मागणी आहे. या लोकांना कुस्ती खेळाबाबत काहीएक माहिती नाही.”
 
बृजभूषण सिंह यांचं स्पष्टीकरण
महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी तत्काळ समोर येऊन या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.
 
बृजभूषण यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून असं काही घडलं असल्यास मी स्वतः फाशी घेईन, असं ते म्हणाले.
 
ANI वृत्तसंस्थेशी बोलताना बृजभूषण सिंह म्हणाले, “दिल्लीत कुस्तीपटूंनी महासंघाविरुद्ध धरणे आंदोलन पुकारल्याची माहिती मिळताच मी तत्काळ आलो. माझ्यावर सगळ्यात मोठा आरोप विनेशने लावला आहे. महासंघाच्या अध्यक्षांनी या खेळाडूचं शोषण झालं, असं म्हणणारा कुणी खेळाडू समोर आला आहे का?”
 
ते पुढे म्हणाले, “लैंगिक शोषणाचा कोणताही प्रकार झालेला नाही. तसं काही घडलं असल्यास मी स्वतःला फाशी लावून घेईन.”
 
बृजभूषण सिंह कोण आहेत?
बृजभूषण सिंह हे भारतीय जनता पक्षाचे केसरगंजचे खासदार आहेत. केसरगंज लोकसभा मतदारसंघ हा गोंडा जिल्ह्याच्या तरबगंज, कटराबाजार आणि करनैलगंज तर बहराईच जिल्ह्याच्या पयागपूर आणि केसरगंज या तालुक्यांनी मिळून बनलेला आहे.
 
1991 साली पहिल्यांदा गोंडामधून खासदार बनलेले बृजभूषण सिंह भाजपचे उत्तर प्रदेशातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. 2019 साली ते सहाव्यांदा खासदार बनले.
 
एके काळी गोंडा शहरातील स्थानिक नेते म्हणून ओळखले जाणारे आता बृजभूषण शरण सिंह भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत.
 
बृजभूषण 2008 मध्ये भाजप सोडून काही काळ समाजवादी पक्षातही गेले होते. मात्र 2014 ला पुन्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सलग दोन निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला.
 
राज ठाकरे यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात अयोध्येला जाण्याचं नियोजन केलं होतं. त्यावेळी राज यांच्या दोऱ्याला बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. तसंच राज ठाकरे यांना त्यांनी उंदीर असंही संबोधलं होतं.
 
राज ठाकरेंना अयोध्येत पाय न ठेवू देण्याचा इशारा त्यावेळी बृजभूषण शरण सिंह यांनी दिला होता.
 
अयोध्येला येण्याआधी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.
 
"राज यांनी सार्वजनिक माफी मागितली नाही तर मी त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही," असं ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं होतं.
 
"योगी आदित्यनाथ यांनी जनभावना लक्षात घेता जोपर्यंत राज माफी मागत नाही तोपर्यत त्यांना भेटू नये," अशी मागणीसुद्धा ब्रिजभूषण यांनी केली होती.
 
मात्र, नंतर एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंशी आपलं वैयक्तिक वैर नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.
 
स्थानिकांच्या मते, बृजभूषण सिंह हे राजकारणात येण्याच्या आधीपासून कुस्ती स्पर्धा आयोजित करत होते. त्यांना महागड्या एसयूव्ही गाड्यांचाही छंद आहे.
 
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये लक्ष्मणपुरी भागात त्यांचा एक आलिशान बंगलाही आहे. तिथे गाड्या उभ्या करण्यास जागाही कमी पडते, असं लोक सांगतात.
 
भूतकाळात बृजभूषण सिंह यांच्यावर हत्या, जाळपोळ, तोडाफोडी यांसारखे आरोपही लावण्यात आले होते.
 
Published By - Priya Dixit