Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारत पाकिस्तान पुन्हा आमने-सामने, जाडेजाची जागा कोण पटकावणार?

Updated: रविवार, 4 सप्टेंबर 2022 (15:41 IST)
 
बाबर आझम वि. विराट कोहली
भारत आणि पाकिस्तानच्या या सामन्यात मुख्य आकर्षण असेल बाबर आझम वि. विराट कोहली. आतापर्यंत झालेल्या 2 मॅचेसमध्ये बाबर आझमने म्हणावी तितकी खास कामगिरी केलेली नाही.
 
भारताच्या भुवनेश्वर कुमारने बाऊन्सर टाकून बाबर आझमला आऊट केलं होतं, तेच हाँगकाँगचा स्पिनर इशान खानने आपल्या कॅचने आझमची विकेट पाडली होती. एशिया कपच्या आधी तर बाबर आझमची धुवांधार बॅटिंग सुरू होती.
 
क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने धावांचे डोंगर रचलेत. यावर्षी जुलैमध्ये पाकिस्तान वि. श्रीलंका टेस्ट मॅच झाली होती. यात त्याने 228 धावा काढल्या. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अशा दहा हजार धावांचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला.
 
याआधी हा रेकॉर्ड पाकिस्तानच्या जावेद मियांदादच्या नावावर होता. त्यांनी 248 धावा काढून हा विक्रम रचला होता. पाकिस्तानचा माजी ओपनर सईद अन्वरने 255 आणि मोहम्मद युसूफने 261 धावांमध्ये हा करिष्मा साधला होता. तर इंझमाम-उल-हकला यासाठी 281 धावा काढाव्या लागल्या होत्या.
 
ही यादी बघता बाबर आझमच्या चांगल्या गेमची कल्पना करता येते.
 
वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहली बादशाहा होता. ऑगस्ट 2017 पासून एप्रिल 2021 पर्यंत विराट क्रिकेटमधील टॉप प्लेयर होता. आयसीसीच्या वर्ल्ड रँकिंगमध्ये तब्बल 1,258 दिवस टॉपला राहणाऱ्या विराटची लिगसी बाबर आझमने मोडली.
 
सध्या फॉर्ममध्ये येण्यासाठी विराट कोहली धडपडतोय. तीन वर्ष झाले असतील त्याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये शतक झळकावलेलं नाहीये. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 35 रन्स केल्या होत्या तर हाँगकाँगविरुद्ध 43 बॉल्सवर नॉटआऊट 59 रन्स काढल्या. यामुळे त्याचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय.
 
बघायला गेलं तर विराट आणि बाबर आझमची तुलना खूप आधीपासूनच केली जाते आहे. जेव्हा बाबर आझम अंडर 19 मध्ये खेळत होता तेव्हा त्याची कामगिरी बघता, विराटशी त्याची तुलना केली जायची. 2015 पासूनच ही तुलना सुरू आहे.
 
तसं तर बाबर आझमने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एंट्री करेपर्यंत विराटच्या 150 हुन जास्त वनडे मॅचेस खेळून झाल्या होत्या. त्याच्या नावावर 20 हुन जास्त शतकांचे विक्रम होते. पण नंतर मात्र बाबर आझमने आपला गेम दाखवून दिला.
 
2022 मध्ये बाबर आझमने सर्वात वेगवान 2,000 धावा पूर्ण करण्याचा रेकॉर्ड केला. हा रेकॉर्ड त्याने अवघ्या 47 मॅचेस मध्ये रचला होता. तर कोहलीला हा विक्रम रचण्यासाठी 56 मॅचेस खेळाव्या लागल्या होत्या.
 
आता हिशोबाची वेळ
मागच्या रविवारी भारत आणि पाकिस्तान अशी मॅच झाली त्यात भारतीय संघावर प्रेशर होतं. कारण 2021 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने दहा विकेट राखून भारताचा पराभव केला होता. आता तोच पराभव खोडून काढण्याचं आव्हान भारतीय संघासमोर होतं.
 
भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभव पत्कारावा लागल्यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम चारमध्ये जागा मिळाली नाही. आता एशिया कपमध्ये पहिलाच सामना भारताने जिंकल्यामुळे दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या संघावर दडपण आलंय.
 
रोहित शर्मा आणि टीममधल्या इतरही खेळाडूंचं मनोबल वाढलं आहे. टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या तुलनेत भारताचं पारडं जड आहे. आतापर्यंत झालेल्या 10 सामन्यांपैकी भारताने 8 सामने जिंकलेत.
 
भारतासाठी दिलासादायक गोष्ट काय असेल तर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी अनफिट असल्याने टूर्नामेंटच्या बाहेर आहे. टी-20 वर्ल्ड कपपूर्वी आपला फिटनेस परत मिळावा या हेतूने त्याने लंडन गाठल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे.
 
दुसरीकडे भारताचा ऑलराउंडर खेळाडू रवींद्र जडेजाही अनफिट आहे. त्याच्या जागी आता अक्षर पटेलने संघात एंट्री केली आहे. जडेजा टी-20 वर्ल्ड कपपूर्वी संघात परत येण्याची शक्यता कमी आहे. कारण गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो मार्च ते जून असा पूर्णवेळ संघाबाहेर होता.
 
तसं तर जडेजा नसल्यामुळे एशिया कपमध्ये सुद्धा भारताच्या अडचणीत वाढ झालीय. जडेजाने बॅट आणि बॉल अशा दोन्हीवर आपली पकड कायम असल्याचं वेळोवेळी सिद्ध केलंय. तो संघात असला की एकप्रकारचं संतुलन निर्माण होतं, सोबतच विरोधी संघांवरही दबाव असतो.
 
एशिया कपमध्ये सहभागी होताना भारताच्या टीममध्ये जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल नव्हते. मात्र आता जडेजा नसल्याने रोहित शर्माला आपल्या खेळाडूंचा काळजीपूर्वक वापर करावा लागणार आहे.
 
मात्र, पाकिस्तानच्या विरोधात हार्दिक पांड्याने ज्याप्रकारे आपला गेम दाखवला ते पाहता भारतीय टीम कोणतंही आव्हान पेलायला तयार असल्याचं दिसतं.
 
आता प्रश्न उरतो तो म्हणजे या सामन्यात ऋषभ पंतला खेळवलं जाणार का? हे अवलंबून आहे रोहित शर्मा आणि प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडवर. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पंतच्या जागी दिनेश कार्तिकला घेण्यात आलं होतं. मात्र हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात पंतला संधी मिळाली होती.
 
ऋषभ पंतची ओळख आता मॅच विनर प्लेयर अशी व्हायला लागली आहे. मागच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याचा समावेश नसल्यामुळे बरीच टीका झाली होती.
 
शिवाय भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादववरही लोकांच्या नजरा आहेत. त्याने त्याने हाँगकाँगविरुद्ध 26 चेंडूत नॉटआऊट 68 धावांची खेळी केली.
 
त्याने आतापर्यंत टी-20 च्या 25 मॅचेस खेळल्या असतील. मात्र त्याने यात एक शतक आणि सहा अर्धशतके झळकावली आहेत. त्याच्या बॅटिंगचा स्ट्राइक रेट 177 पेक्षा जास्त आहे. टी-20 वर्ल्डकपसाठी बेस्ट खेळाडू अशी त्याची ओळख तयार झाली आहे.
 
काही विश्लेषकांना वाटतं की विराट ऐवजी त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळवलं पाहिजे. कारण पेस आणि स्पिन बॉलिंगवर सेम फॉर्ममध्ये खेळून रन्स जमा करणारा दुसरा बॅट्समन संघात नाहीये.
 
2018 च्या एशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान दोनवेळा आमने सामने आले होते. या दोन्ही वेळेस भारतानेच विजय मिळवला आहे. त्यामुळे चालीरीतीप्रमाणे यंदा भारताने पहिला सामना खिशात घातला आहे तर दुसरा सामना जिंकण्यासाठी भारत सज्ज झालाय.
 
 
 
 
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

देवदत्त पडिक्कलने श्रीलंकेविरुद्ध आपले पहिले कसोटी शतक झळकावले

ऋषभ पंत ॲडम गिलक्रिस्टला मागे टाकत कसोटी क्रिकेटमधील नंबर १ यष्टीरक्षक-फलंदाज बनले

First match of the Test series भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यापूर्वी टीम इंडियाने गॉलमध्ये तिरंगा फडकवून आणि राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला

भारताचे माजी खेळाडू विनय कुमार याची कर्नाटक संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

पुढील लेख
Show comments