suvichar

आईवडिलांनी दुसरं लग्न केलं तर मुलांना काय वाटतं?

Updated: शनिवार, 24 ऑगस्ट 2019 (12:23 IST)
 
दिल्लीत शिकणाऱ्या अनुराग यांनाही असाच काहीसा अनुभव आला आहे. त्यांच्या मते कोणतंही नवीन नातं स्वीकारणं इतकं सोपं नसतं कारण अशी नवी नाती जुन्या नात्यांची जागा घेत आहेत.
 
अनुराग जेव्हा सातवीत होते तेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला. तीन बहिणींमध्ये सगळ्यात मोठे असलेले अनुराग सांगतात की आई गेल्यानंतर त्यांच्या वडिलांनी दोन महिन्यांनी लग्न केलं.
 
आपल्या नवीन आईच्या पहिल्या भेटीची आठवण अनुराग सांगतात, "बाबा जेव्हा त्यांच्याबरोबर पहिल्यांदा घरी आले तेव्हा मी माझ्या भावा बहिणींबरोबर टीव्ही पाहत होतो. ते म्हणाले की ही तुझी आई आहे. आम्ही काही म्हटलं नाही. त्यांच्याशी काही न बोलता ही बाई दुष्ट आहे असं माझ्या मनानं ठरवलं. त्यांच्यामुळेच माझी आई गेली असेल, असंही मला वाटून गेलं."
 
आता त्या दोघांमध्ये नात इतर कुटुंबीयांसारखंच आहे. मात्र एका मोठा काळ अनुराग यांच्या मनावर द्वेष, राग यांचा पगडा होता.
 
दिल्लीत राहणाऱ्या आकांक्षाचे आईवडील परस्पर सहमतीने वेगळे झाले होते.
 
ती सांगते, "मला समजावलं होतं की आमच्यात कोणत्याच प्रकारचं भांडण नाही मात्र आम्ही एकत्र राहू शकत नाही. मी बाबांबरोबर राहिले, मात्र सात महिन्यानंतर बाबांनी एका बाईशी माझी भेट घालून दिली. नंतर बाबांनी लग्न केलं. ती चांगली होती. मात्र मला असं वाटायचं की ती मला आणि बाबांना दूर करतेय ती दोघं बोलायची तेव्हा मला वाईट वाटायचं. मला असं वाटायचं की माझं सगळं निसटून जात आहे."
 
आकांक्षा सांगते की ही गोष्ट तिने तिच्या आईशी शेअर केली तेव्हा तिने आकांक्षाला समजावलं. मात्र सगळ्या प्रकारामुळे तिच्या आयुष्यातला मोठा काळ एकटेपणात गेला.
 
आकांक्षाच्या मते एखादी व्यक्ती आपलं नातं किती लवकर आणि कशा पद्धतीने स्वीकार करतं हे बऱ्याच अंशी समाजावर अवलंबून आहे.
 
"आपल्या समाजात काही गोष्टींबाबत एक ठराविक व्यवस्था तयार झाली आहे. माझ्या मनात हे बसलं होतं की सावत्र आई किंवा सावत्र वडील आहेत म्हणजे ते वाईटच असणार. बाबांचं लग्न झाल्यावर बराच काळ तिच्या मित्रमैत्रिणीच्या घरचे नवीन आई कशी आहे असा प्रश्न विचारायचे," ती सांगते.
 
आकांक्षा सांगते की, "मी काहीही उत्तर दिलं तरी ते म्हणायचे की आपली आई तर आपलीच असते. तू तिच्याकडे रहायला जा."
 
ही नाती इतकी अवघड का?
आयुष्यातील सावत्र नात्यांमध्ये इतका कडवटपणा का असतो हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. सावत्र नात्यांचा अनुभव घेतलेल्या लोकांच्या मनात अगदी येतोच.
 
याविषयी सायकॉलॉजिस्ट प्रवीण त्रिपाठी म्हणाले, "अशा नात्यांमध्ये अडचणी येतात. मात्र चर्चेने हे प्रश्न सोडवता येतात. एखाद्या नवीन नात्याबद्दल मुलांना स्पष्टपणे सांगितलं जात नाही ही एक मोठी समस्या आहे."
 
ते म्हणतात, "अनेकदा मुलांना पूर्ण सत्य सांगितलं जात नाही. पण गोष्टी जितक्या स्पष्टपणे सांगितल्या जातील तितकं ते चांगलं आहे. पुढे काय होणार आहे याची कल्पना दिली तर ते पण स्वत:ला तयार करू शकतील."
 
प्रवीण सांगतात, "मुलांना त्यांची भूमिका, त्याची कर्तव्य माहिती असतील तर नातं दृढ व्हायला मदत होईल. कोणालाही रिप्लेस केलं जात नाहीये हे सांगितलं पाहिजे. त्या ऐवजी एक नवीन सदस्य येतोय असं सांगणं जास्त योग्य ठरेल. कारण त्यांना जर योग्य पद्धतीनं सांगितलं नाही तर निश्चितच त्यांना वाईट वाटेल."
 
"एखाद्या मुलाला किंवा मुलीला नातेसंबंधात अडचणी आल्या तर त्यांचा स्वभाव रागीट किंवा चिडचिडा होऊ शकतो. आपली फसवणूक झाली असं मुलाला वाटलं तर नैराश्य येऊ शकतं," ते म्हणाले.
 
नवीन सदस्यासमोरची आव्हानं
मानसशास्त्रज्ञांच्या मते या अडचणी येण्याचं कारण म्हणजे घरातील नवीन सदस्य लगेच अधिकारवाणीने वागू लागतो. हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे मूल घाबरू शकतं.
 
सगळी आव्हानं मुलांनाच असतात अशातलाही भाग नाही. नवीन सदस्यांनासुद्धा अनेक अडचणी येऊ शकतात.
 
एका नवीन वातावरणाशी जुळवून घेणं, त्यानुसार आपली कामं ठरवणं, प्राथमिकता बदलणं, अशा अनेक गोष्टी नवीन सदस्यांना कराव्या लागतात.
 
अशाच प्रकारच्या तडजोडी लग्न होऊन घरात आलेल्या सुनेलाही कराव्या लागतात. मात्र समोर सावत्र हे बिरुद लागलं की या अडचणी आणखी मोठ्या होतात.
 
सावत्र आईपेक्षा सावत्र वडील होणं जास्त आव्हानात्मक आहे, असं डॉ. प्रवीण सांगतात.
 
"पुरुष कायम कुटुंबप्रमुख म्हणून भूमिका बजावू इच्छितात. म्हणून दुसऱ्यांचा विचार करणं त्यांना सहजासहजी जमत नाही. म्हणून त्यांना नवीन कुटुंबात येणं कठीण जातं," असं ते सांगतात.
 
समाज नवीन नाती का स्वीकारत नाहीत?
नातेसंबंध तज्ज्ञ निशा खन्ना म्हणतात की सावत्र नातं जुनं नातं संपल्यावरच येतं. मात्र आपल्या समाजात पहिल्या नात्यालाच जास्त मान मिळतो.
 
आपल्याकडे लग्न हे सगळ्यात पवित्र आणि आयुष्यभराचं नातं मानलं जातं. अशातच दुसऱ्या लग्नाला तितकी मान्यता मिळत नाही. समाजही दुसऱ्या लग्नाचा मोकळेपणाने स्वीकार करत नाही. त्यामुळे आव्हानं वाढत जातात, असं त्या सांगतात.
 
"असं झालं तर नात्यांमध्ये नकारात्मकता येण्याची शंका असते. नवीन सदस्याला तुलनात्मक नजरेनं पाहिलं जातं. अशात आव्हानं वाढण्याची शक्यता जास्त असते. मुलंसुद्धा ही तुलना करतात आणि हाच सगळ्यात मोठा धोका असतो."
 
"मुलांना विश्वासात घेऊन नवीन नात्याची सुरुवात केली, त्यांना लहानसहान निर्णयात सामील करून घेतलं तर या अडचणी दूर होऊ शकतात," असं निशा सांगतात.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments