शांताराम ही खुद्द ग्रेगरी रॉबर्टस यांच्या आयुष्यावरच आधारीत कादंबरी असल्याची चर्चा आहे. किमान त्यातला काही भाग तरी त्यांच्या आयुष्यावर आधारीत आहे हे नक्की. कादंबरीचा नायक लीन ऑस्ट्रेलियात गुन्हेगार आहे नि हिरॉईनचा व्यसनी. ऑस्ट्रेलियात शिक्षा झालेली असताना तुरूंग फोडून तो बाहेर पडतो आणि भारत गाठतो. मुंबईत आल्यानंतर तो इथेच रहातो. इथलाच टॅक्सी ड्रायव्हर प्रभाकर त्याला मुंबईचे खरे स्वरूप दाखवतो.
प्रभाकरच त्याला धारावीत राहायला घर मिळवून देतो. इथल्या वातावरणाशी तो समरस होऊन जातो. मधल्या काळात कार्लाशी त्याचे प्रेम जमते. पण अनेक उपकथानकांचा प्रवास करून आणि अनेक वळणे येऊनही लीनची गाडी पुन्हा गुन्हेगारी वर्तुळावरच धावू लागते. अखेरीस तो मुंबई पोलिसांच्या हाती लागतो. त्याला तुरूंगात टाकतात. तिथे त्याचा बराच छळही होतो. तिथून सुटल्यानंतर पुन्हा एकदा गुन्हेगारी वर्तुळ त्याला खुणावतो. त्यातूनच तो अफगाणिस्तानात जातो. तिथून पाकिस्तान पुन्हा मुंबई आणि मग श्रीलंका हा सगळा गुन्हेगारी पायवाटेवरच होतो. पण त्यात अनेक भावनिक साथसोबतीही त्याच्याबरोबर असतात. हा संपूर्ण प्रवास थरारक आहे. त्यामुळे शांताराम वाचणे हा वेगळा अनुभव आहे. या कादंबरीवर चित्रपट बनविण्याचे घाटत आहे.