शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (22:35 IST)

अक्षय कुमारची जाहिरात वादाच्या भोवऱ्यात, रस्ते सुरक्षा का हुंड्याला खतपाणी?

सरकारच्या रस्ते सुरक्षेसंदर्भातील एक जाहिरात नकळत हुंड्याला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या जाहिरातात अभिनेता अक्षय कुमारही असून, ही जाहिरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट केली होती. जाहिरातीत अक्षय मुलीच्या वडिलांना ओरडत असल्याचं दिसत आहे. नववधू मुलीला केवळ दोन एअरबॅग्ज असणाऱ्या गाडीतून पाठवणी करणाऱ्या वडिलांना अक्षय कुमार रागे भरत असल्याचं दिसत आहे.
 
काही सोशल मीडिया युझर्सनी सुरक्षेचा मुद्दा मांडल्याप्रकरणी जाहिरातकर्त्यांचं कौतुक केलं आहे. मात्र काही सोशल मीडिया युझर्सनी लग्नात मुलीच्या वडिलांनी गाडी म्हणजे हुंडा दिल्याप्रकरणी टीका केली आहे.
 
हुंडा देण्याची पद्धत ही जुनी प्रथा आहे. मुलीकडचे लग्नात वर आणि त्याच्या कुटुंबीयांना रोख रक्कम, गाडी, दागिने, कपडे अशा भेटवस्तू देतात. कायद्यानुसार हुंडा देणं हा गुन्हा आहे मात्र तरीही आजही ही प्रथा सुरूच आहे.
 
हुंड्यामुळे महिलांना घरगुती हिंसाचाराला सामोरं जावं लागतं. काही वेळेला हुंड्याच्या घटनांमध्ये महिलेचा मृत्यूही ओढवतो.
 
1961 पासून हुंडा घेणं हा गुन्हा झालेला असूनही 95 टक्के लग्नांमध्ये हुंडा दिला जात असल्याचं एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.
 
काय आहे ही जाहिरात?
अक्षय कुमार असलेली हा जाहिरात पहिल्यांदा ट्वीटरवर प्रदर्शित झाली. लाखो नेटिझन्सनी ही जाहिरात पाहिली आहे.
 
लग्न झालेली नववधू रडवेल्या डोळ्यांनी घरच्यांचा निरोप घेते आहे, असं जाहिरातीत दिसतं. अक्षय कुमार पोलिसांच्या भूमिकेत आहे. नवं जोडपं घरी जाताना दोनऐवजी सहा एअरबॅग्ज असणाऱ्या गाडीत अधिक सुरक्षित आहे, असं अक्षय कुमारचं पात्र सांगतं.
 
ही जाहिरात रस्ते सुरक्षा या मुद्यावर लोकांचं लक्ष वेधून घेण्याऐवजी हुंड्याच्या अनिष्ट प्रथेला खतपाणी घालत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
 
ही जाहिरात हुंड्याला खतपाणी घालते. ही तात्काळ काढून टाकण्यात यावी आणि यावर बंदी घालावी असं एका सोशल मीडिया युझरने लिहिलं आहे.
या जाहिरातीचा उद्देश रस्ते सुरक्षा होतं. पण ते या उद्दिष्टापासून भरकटले आहेत. जाहिरात लग्नाबद्दल आहे का? 6 एअरबॅग्ज असलेली गाडी मुलीच्या घरच्यांनी हुंड्यात द्यावी असं त्यांना म्हणायचं आहे का? रस्ते सुरक्षेसंदर्भात संदेश अन्य कुठल्या कथानकाद्वारे देता आला नसता का?
 
उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा काही दिवसांपूर्वी 5 सप्टेंबरला मुंबईत पालघरइथल्या चारोटी गावाजवळ अपघाती मृत्यू झाला. या अपघातात सायरस यांच्याबरोबर असणारा त्यांच्या मित्राचाही मृत्यू झाला. गाडी चालवणाऱ्या डॉ. पांडोले आणि त्यांचे यजमान अपघातात गंभीर जखमी झाले.
 
कायद्यानुसार गाडीत बसलेल्या सगळ्यांना बेल्ट लावणं अनिवार्य आहे. पण भारतात या नियमाची अंमलबजावणी अभावानेच होते. गाडीत पुढे बसलेली माणसं साधारणत: बेल्ट लावतात.
 
दरवर्षी भारतात रस्ते अपघातात हजारो माणसांचा मृत्यू होतो. 2021 मध्ये दीड लाखापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला आहे, असं सरकारने दिलेल्या माहितीत स्पष्ट झालं आहे.
 
सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गाडीत बसलेल्या प्रत्येकाने सीटबेल्ट लावणं अनिवार्य केलं आहे. गाडीत मागच्या सीटवर बसणाऱ्या माणसांनी सीट बेल्ट न लावल्यास दंड ठोठावण्यात येणार आहे. गाडीत मागे बसलेल्या माणसांनी सीटबेल्ट न लावल्यास अलार्म वाजण्याची व्यवस्था गाड्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी करावी असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.
 
गडकरी यांनी लागू केलेल्या नियमांचं आणि प्रस्तावाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. ट्वीटरवरच्या अनेकांनी गडकरींना रस्त्यांच्या भीषण दुर्दर्शेकडे आणि गाड्यांच्या सदोष संरचनेकडे लक्ष द्यावं असं सुचवलं आहे.
 
अनेक नेटिझन्सनी हायवे तसंच शहरातल्या रस्त्यांच्या भीषण अवस्थेचे फोटो शेअर केले आहेत.
 
जाहिरातीत रस्त्यांची स्थिती सुधारण्याऐवजी 6 एअरबॅग्ज उघडणाऱ्या गाड्यांची भलामण केली आहे, असं तृणमूल काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
 
सहा एअरबॅग्ज असणारी गाडी भारतात किती लोकांना परवडू शकते असा सवालही अनेकांनी केला आहे.
 
सरकारने रस्त्यांची स्थिती सुधारावी, गाड्यांची संरचना बदलावी, रस्त्यावर उजेड असावा, स्पष्ट दिसतील अशी चिन्हं असावीत असं एका युझरने म्हटलं आहे. गाडीत आणखी एअरबॅग्स बसवण्याच्या प्रस्तावाची गाडी निर्मिती कंपन्यांनी समीक्षा केली होती. गडकरी यांनी या भूमिकेवर टीका केली होती.