1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Naseeruddin Shah outraged by the lathi-charge on students

"मास्क घालून विद्यार्थ्यांवर अत्याचार?" NEET आंदोलनावरील लाठीमारावर संतापले नसिरुद्दीन शाह; म्हणाले– लढा सुरूच ठेवा!

NEET च्या कथित पेपर लीक प्रकरणावरून देशाची राजधानी दिल्लीच्या रस्त्यांवर वातावरण चांगलेच तापले आहे. विद्यार्थी आणि तरुणांचा संताप थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अलीकडेच CJP च्या 'चलो संसद' मार्चदरम्यान आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर आता चित्रपटसृष्टीतूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
 
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी एक भावूक आणि कडक व्हिडिओ संदेश जारी करून पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. यासोबतच रस्त्यावर उतरलेल्या तरुणांना पाठिंबा देत त्यांनी आपले आंदोलन असेच सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.
 
काय म्हणाले नसिरुद्दीन शाह?
नसिरुद्दीन शाह म्हणाले, "नमस्कार, आदाब... मी नसिरुद्दीन शाह तुमच्याशी दोन गोष्टी बोलू इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे, जर एखादा अडाणी/अज्ञानी माणूस या देशाचे नेतृत्व करत असेल, तर संपूर्ण देश त्याच्यासारखाच अडाणी, बावळट, अकार्यक्षम आणि निर्दयी बनावा असेच त्याला वाटेल."
 
त्यांनी पुढे सांगितले, "अभिनयाचे दोन वेगवेगळे कोर्स – नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) आणि पुणे फिल्म इन्स्टिट्यूट (FTII) मधून पूर्ण करूनही, मी अभिनयाबद्दल सर्वात जास्त काही शिकलो असेल, तर ते त्या मुलांकडून ज्यांना मी शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. माझी संपूर्ण सहानुभूती त्यांच्यासोबत आहे. मी माझ्या प्रत्येक श्वासासोबत त्यांना हजारो आशीर्वाद देतो आणि प्रत्येक शिक्षक दिनी त्यांना सलाम करतो."
 
पोलिसांच्या कारवाईची तुलना 'आइस एजंट्स'शी केली
CJP च्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये नसिरुद्दीन शाह अत्यंत भावूक आणि संतापलेले दिसून आले. उर्दू भाषेत संदेश देताना त्यांनी सत्ताधारी आणि व्यवस्थेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले.
 
दिल्लीत विद्यार्थ्यांसोबत झालेल्या वर्तणुकीवर दु:ख व्यक्त करताना ते म्हणाले की, या घटनेने माझे मन दुखावले आहे. आंदोलक तरुणांवर बळाचा वापर करणाऱ्या तोंडावर मास्क लावलेल्या पोलिसांची तुलना त्यांनी अमेरिकेच्या 'आइस एजंट्स' (ICE Agents) शी केली. तोंडावर नकाब आणि हातात काठी घेऊन हे लोक अत्याचार करत आहेत. अशा लोकांची स्वतःची मुले नाहीत का? असा सवालही त्यांनी विचारला.
 
आपल्या संदेशाच्या शेवटी तरुणांना धीर देत ते म्हणाले, "मला या देशाच्या तरुण पिढीकडून नेहमीच मोठ्या आशा राहिल्या आहेत. तुम्ही लोकांनी हिंमत हारू नका आणि आपला लढा चालू ठेवा. अनेकांची सहानुभूती आणि पाठिंबा तुमच्यासोबत आहे."
 
दिल्लीत काय घडले होते?
नवी दिल्ली परिसरात जेव्हा आंदोलक विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या. आंदोलक हिंसक झाले होते आणि इशार्यानंतरही मागे हटत नव्हते, असा दावा पोलिसांनी केला आहे. तर दुसरीकडे, साध्या कपड्यात आलेले लोक आणि पोलिसांनी आपल्यावर अंधाधुंध हल्ला केला, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
 
सध्या सरकार आणि आंदोलकांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, मात्र अद्याप तोडगा न निघाल्याने दिल्लीच्या रस्त्यांवर अजूनही कोंडी कायम आहे. दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या पाठिंब्यानंतर आता या विद्यार्थी आंदोलनाला अधिक धार येताना दिसत आहे.
पुढील लेख
18 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू