रविवार, 1 फेब्रुवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. चित्रपट समीक्षा
Written By वेबदुनिया|

झूम बराबर झूम

‍चित्रपट परिक्षण झूम बराबर झूम
निर्माता : आदित्य चोप्रा
दिग्दर्शक : शाद अली
संगीत : शंकर-एहसान-लॉय
गीत : गुलजार
कलाकार : अभिषेक बच्चन, प्रीती झिंटा, बॉबी‍ देवल, लारा दत्ता


लंडनमधील रेल्वेस्थानक. माणसांच्या अनोळखी गर्दीत दोन चेहरे आपल्या नियोजित जोडीदारांची वाट बघत आहेत. हळूहळू गर्दी ओसरते. बर्मिंगमहून येणारी गाडी दोन तास उशिरा येणारेय. ती व तो. दोघेही एकमेकांना अपरिचित. अनपेक्षित गाठ पडते व आपापल्या आयुष्यात डोकावताना दोघांत नकळत आकर्षण निर्माण होते. कथानक औत्सुक्य निर्माण करणारे असले ‍तरी चित्रपटीय रूपांतरणात दिग्दर्शक अपयशी ठरला आहे.

शाद अलीने कल्पना तर चांगली मांडली. पण तिचा विस्तार करण्याच्या नादात तो साफ भरटकला आहे. दिग्दर्शक कथानकाच्या पहिल्या भागात गुंतून पडल्याने चित्रपट मध्यंतरापर्यंत पुढे सरकत नाही. दोघांच्याही प्रेमकथांचा प्रवास रखडत होत असल्याने प्रेक्षकांना त्यात औत्सुक्य राहत नाही.

भरीस भर इंग्रजी व फ्रेंच शब्दांची पेरणी करण्याच्या नादात संवाद उच्चारणाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. बहुतेक संवाद प्रेक्षकांना न समजताच संपतात. मध्यंतरानंतर कथानक अनपेक्षित वळण घेत प्रेक्षकांना धक्का देते. दोघांच्या कथांमध्ये गुंतलेल्या प्रेक्षकांना दोघेही एकमेकांची फिरकी घेत असल्याचे समजते.

चित्रपट आता अनपेक्षित घटनांची साखळी कायम ठेवत प्रेक्षकांना खिळवून ठेवणार असे वाटत असातांना दिग्दर्शक शाद अली परत निराशा करतो. उत्कृष्ट चित्रपट बनविण्याची हातची संधी शादने घालवली आहे. चित्रपटाचा शेवटही नेहमीचाच आहे. 'साथिया' सारख्या चित्रपटातून शादने स्वतःविषय़ीच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, त्याने आता या लौकीकाला सुरूंग लावू नये ही अपेक्षा.

कलाकारांकडून उत्कृष्ट अभिनय करून घेण्यात त्याचा हातखंडा आहे. आपल्या कल्पकतेचे दर्शन घडवितांना चित्रपटाच्या पार्श्वसंगीतात त्याने जुन्या गाण्यांचा यथोचित वापर केला आहे. अभिषेक बच्चनने बहारदार अभिनय करत पंजाबी मुलाचे पात्र समर्थपणे उभे केले आहे. प्रिती झिंटाने अभिषेकला चांगली साथ दिली.

अभिनयात बाजी मारली ती लारा दत्ताने. आपणास अभिनयही करता येत असल्याचे तिने सिद्ध केले आहे. लाराने आपली भूमिका बारकाव्यानिशी उभी केली आहे. शंकर-एहसान-लॉय ने जोशपूर्ण संगीत दिले आहे. संवादलेखनात चित्रपट उजवा आहे. हबीब फैजल यांनी अर्थपूर्ण संवाद लिहिले आहेत.