बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. फ्लॅशबॅक-26/11
Written By वेबदुनिया|

मुंबईत पुन्हा 26/11 होऊ शकेल काय?

ND
ND
मुंबईत पुन्हा 26/11 होऊ शकेल काय? याचे उत्तर ठामपणे नाही असे देता येणार नाही. याचा अर्थ गेल्या वर्षभरात मुंबईच्या सुरक्षिततेकरीता काही झाले नाही, असा याचा अर्थ घ्यायचा काय? तर तसे नाही. वर्षभरात पोलिस दल मजबूत करण्यासाठी नक्कीच प्रयत्न झाले, पण तरीही मुंबई सुरक्षित आहे असे म्हणणे धाडसाचेच ठरेल.

निवृत्त मेजर जनरल दत्ता यांनीही एका मुलाखतीत मुंबईत 26/11 कधीही घडू शकतं असं सांगितलं होतं. याचा अर्थ सुरक्षा व्यवस्थेवर त्यांचाही विश्वास नाही हेही स्पष्ट होतं. इतकंच कशाला राज्याचे पोलिस महासंचालक अनामी रॉय यांनाही मुंबईतील दक्षता वाढविणे आणि दहशतवादविरोधी उपाय मजबूत करणे गरजेचे वाटते.

मुंबई हल्ल्यानंतरही पोलिस दलात काही सकारात्मक बदल नक्कीच झाले. त्यात लक्षणीय म्हणजे, नॅशनल सिक्युरिटी गार्डचे विकेंद्रीकरण होऊन देशातील चार शहरांत त्याची स्थापना करण्यात आली. त्यातले अडीचशे जणांचे पथक मुंबईत ठेवण्यात आले. पण याशिवाय महाराष्ट्र आणि मुंबई ोपलिसांनी स्वतःचे रॅपिड एक्शन फोर्सचे दलही तैनात केले आहे. मुंबई पोलिसांची कंट्रोल रूमही अद्ययावत करण्यात आली आहे. शहरभर अनेक ठिकाणी सिक्युरिटी कॅमेरे बसविण्यात आले असून या कंट्रोल रूममध्ये बसून शहरावर नजर ठेवता येणार आहे. एनएसजी कमांडोसारखे एक पथक सरकारनेही विकसित केले असून त्याला फोर्स वन असे नाव दिले आहे. त्याला कमांडो स्तरावरचे ट्रेनिंग देण्यात आले आहे.

पोलिस दलाला मिळालेल्या मजबूतीसाठी करण्यात आलेले प्रयत्न पहाता, गेल्या वर्षभरात मुंबईतच काय देशातही बॉम्बस्फोट झालेले नाहीत, याचा अर्थ देशाची सुरक्षा व्यवस्था बळकट झाली आहे, असाच त्याचा अर्थ होतो, असे काहींचे म्हणणे आहे. पण ते तितके खरे नाही. भारताला अस्थिर करण्यात पाकिस्तानी लष्कर, त्यांची गुप्तचर संस्था आयएसआय यांचा मोठा हात आहे. पण गेल्या वर्षभरात पाकमध्येच अतिरेक्यांनी थैमान घातले असून सुरक्षा व्यवस्था पार खिळखिळी करून टाकली आहे. अशा धामधुमीच्या काळात या दोन्ही संस्थांना आणि अतिरेक्यांनाही भारताकडे लक्ष देण्यास वेळ नाही. म्हणूनच त्यांनी आपले लक्ष भारताकडे वळविलेले नाही, असे कारण या क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहेत.

सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली असली हा पोलिसांचा दावा असला तरी वस्तुस्थिती तशी नाही, असे या क्षेत्रातीत तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खुद्द पोलिस महासंचालक अनामी रॉय यांनीही मान्य केले आहे. गेल्या वर्षी झालेल्या हल्ल्यापेक्षा सुरक्षा व्यवस्था सुधारली आहे हे नक्की, पण तंत्रज्ञान, संपर्क साधने आणि मनुष्यबळ यात अतिरेक्यांपेक्षा मुंबई पोलिस कोसो दूर आहेत, हेही रॉय यांनी मान्य केले आहे. पोलिसांच्या फोर्स वन पथकाला अत्याधुनिक शस्त्रे मिळाली असली तरी बाकीचे पोलिस आजही रायफलधारीच आहेत. त्यांच्याकडची संपर्क साधने तुलनेने जुनीच आहेत.

मुंबई पोलिस विभागाला अनुभवी पोलिस अधिकार्‍यांची गरज आहे. सध्या एक कोटी चाळीस लाखाच्या लोकसंख्येला अवघे ४८ हजार अधिकारी आहेत. केंद्र सरकारने देशभरातील पोलिस खात्यात दीड लाख पोलिस शिपायांची भरती करणार असल्याचे सांगितले आहे. पण अत्याधुनिक प्रतिकार साधने हातात असलेले पोलिस असणे ही आत्ताही गरजच आहे. गेल्या वर्षी आपण जितके आत्मविश्वासू होतो, त्याहून अधिक आत्मविश्वास आत्ता आपल्याला हवा. पण आपण अजूनही तो कमावलेला नाही, असे उद्गार रॉय यांनीच काही दिवसांपूर्वी झालेल्या सुरक्षा परिषदेत काढले होते.

सागरी हद्दीच्या संरक्षणासाठीही काही बाबी महत्त्वाच्या आहेत. सागरी हद्दीत गस्त घालण्यासाठी पोलिस दलाने आठ अत्याधुनिक नौका परदेशातून आणल्या आहेत. पण ७२० किलोमीटरची किनारपट्टी लाभलेल्या महाराष्ट्रासाठी त्या पुरेशा आहेत काय? शिवाय गुजरातमध्ये उतरूनही अतिरेकी महाराष्ट्रात येतात की त्यामुळे सागरी हद्द हा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न उरत नाही. गुजरात सरकारनेही याकडे लक्ष द्यायला हवे.

हे सगळे पहाता, खरोखरच मुंबई सुरक्षित आहे काय? असा प्रश्न पडतो. या विषयी तुम्हाला काय वाटते?