शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (12:48 IST)

लष्कर गाहमध्ये भीषण युद्ध, तालिबानला मिळणार का महत्त्वाचा विजय?

अब्दुल सय्यद
अफगाणिस्तानच्या हेलमंद प्रांतात तालिबानी सैनिक आणि अफगाणिस्तानी सैन्यामध्ये लढा अधिक तीव्र बनला आहे.
 
हेलमंद प्रांताची राजधानी असलेल्या लष्कर गाहमध्ये तालिबाननं प्रवेश केला आहे. त्यांनी याठिकाणी सरकारी रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या विभागीय कार्यालयावर ताबा मिळवला आहे. 20 वर्षांनंतर त्यांनी पुन्हा स्वतःचं प्रसारण सुरू केलं आहे.
 
त्याशिवाय गव्हर्नर हाऊस आणि शहरातील इतर संवेदनशील भागांमध्ये अफगाणिस्तानचं सैन्य आणि तालिबान यांच्यात संघर्ष सुरू आहे.
 
तालिबाननं शहरातील ज्या भागांवर ताबा मिळवला आहे त्याठिकाणी लष्कराच्या हवाई दलाकडून मोठ्या प्रमाणावर बॉम्ब हल्ले केले जात आहेत. त्यात एका विद्यापीठावरही हल्ला झाल्याचं लष्कर गाहच्या स्थानिक रहिवाशांनी सांगितलं आहे.
 
भारत सरकारनं पुरवलेल्या लढाऊ विमानांनी लश्कर गाहमधील एका मोठ्या रुग्णालयावर हल्ला केल्याचा दावा अफगाणिस्तानातील तालिबानचे मुख्य प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहीद यांनी शनिवारी ट्विटरद्वारे केला होता.
 
अमेरिकेच्या हवाई दलाचा बॉम्ब हल्ला
मंगळवारी (3 ऑगस्ट) सकाळी अमेरिकेच्या लढाऊ विमानांनीही लष्कर गाहमध्ये दोन वेळा तालिबानी सैनिक बॉम्बहल्ले केल्याचं अफगाणिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार बिलाल सरवरी यांनी सांगितलं.
 
लष्कर गाहमध्ये असलेले तालिबान मल्टीमीडिया आयोगाचे प्रमुख असद अफगाण यांनी मंगळवारी येथील परिस्थितीबाबत माहिती दिली. गव्हर्नर हाऊस, सेंट्रल जेल, पोलिस, गुप्तचर यंत्रणा आणि लष्कराच्या विभागीय मुख्यालयाबरोबरच लष्कर गाहच्या सर्व सरकारी इमारतींवर तालिबाननं ताबा मिळवल्याचं त्यांनी सांगितलं.
 
स्थानिक नागरिकांनाही असद अफगाण यांच्या या दाव्याला दुजोरा दिला आहे. तालिबाननं या इमारतींना घेराव घातला आहे. त्यामुळं अफगाणिस्तानचं लष्कर एकमेकांना मदत करण्यासाठी पोहोचू शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
 
तालिबाननं लष्कर गाहमध्ये असलेल्या एकमेव विमानतळालाही घेराव घातला आहे. तालिबानी सैनिक एकाही विमानाला उड्डाणाची अथवा उतरण्याची परवानगी देत नसल्याचंही असद म्हणाले.
 
तालिबाननं मंगळवारी सकाळी एका बॉम्ब हल्ल्यात लष्कर गाह तुरुंगावर हल्ला चढवला. त्यामुळं तुरुंगाची एका बाजूची भिंत तुटली असल्याचं, पत्रकार बिलाल सरवरी यांनी बीबीसी उर्दूशी बोलताना सांगितलं.
 
तीव्र युद्ध सुरू असल्यानं स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, लोक घरात कोंडलेले असल्याचं बिलाल सरवरी पुढं म्हणाले.
 
गेल्या काही दिवसांमध्ये तालिबाननं हेलमंदच्या अनेक जिल्ह्यांवर ताबा मिळवल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रांतीय राजधानीतून पलायन केलं. त्यामुळं आता शहरात मोठ्या प्रमाणावर अन्नाची कमतरता जाणवायला सुरुवात झाली आहे.
 
शहरातील मुख्य बाजारपेठेत अर्ध्या भागात अफगाणिस्तानच्या लष्कराचा ताबा आहे, तर उर्वरित अर्धा भाग हा तालिबानच्या ताब्यात आहे. तीव्र युद्धामुळं जखमींना रुग्णालयात नेणंही कठीण होत आहे.
 
तालिबाननं सोशल मीडियावर काही व्हीडिओदेखील पोस्ट केले होते. यात त्यांनी लष्कर गाहमधून पकडलेल्या अनेक अफगाणिस्तानी सैनिकांकडून माहिती घेतल्याचं दिसत आहे. पकडलेले सैनिक आणि अधिकारी लष्कर गाहमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या इतर सैनिक आणि सरकारी अधिकाऱ्यांची माहिती देत असल्याचं, बिलाल सरवरी म्हणाले.
 
लश्कर गाहचे महत्त्व काय?
आजवरच्या इतिहासाचा विचार करता, हेलमंदवर ज्यांचा ताबा असतो त्यांना अफगाणिस्तानच्या दक्षिण आणि पश्चिम भागांमध्ये यश मिळतं, असं तालिबानचे निकटवर्तीय समजले जाणारे अफगाणिस्तानी पत्रकार नसीब जदरान म्हणाले.
 
त्यांच्या मते, लष्कर गाहवर तालिबाननं ताबा मिळवल्यानं अफगाणिस्तानचे दक्षिण आणि पश्चिम प्रांत आणि त्यातही विशेषतः हेरात आणि कंधहार तालिबानच्या ताब्यात येतील. त्यामुळं तालिबान आणि सरकार दोघांमध्येही लष्कर गाहवर ताबा मिळवण्याच्या लढा तीव्र झाला आहे.
 
गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेबरोबर दोहामध्ये युद्धबंदीचा करार झाला होता. तीन महिन्यांपूर्वी 1 मे रोजी जेव्हा युद्धबंदीचा काळ संपला त्यावेळीही तालिबाननं हेलमंदमधून हल्ले सुरू केले होते.
 
राजधानी असलेल्या लष्कर गाहशिवाय तालिबाननं नवा आणि नहर-ए-सिराज या जिल्ह्यांवरही हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांमध्ये तालिबानला सुरुवातीला मोठं यश मिळालं. पण काही दिवसांनी लष्करानं मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले करत तालिबानला मागं हटवलं आणि सोबतच त्यांना मोठी हानीही पोहोचवली. पण आता तालिबाननं हेलमंदच्या सर्व 15 जिल्ह्यांवर ताबा मिळवला आहे.
 
हेलमंद दक्षिण अफगाणिस्तानातील सर्वात मोठा प्रांत आहे. त्याच्या सीमा पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतांबरोबरच अफगाणिस्तानच्या सात प्रांताशी मिळतात. त्यात कंधहार, निमरोज, फराह, गौर, दाइकंदी, अर्झगान आणि झाबुलचा समावेश आहे.
 
हेलमंद हा अफगाण तालिबानचा बालेकिल्ला समजला जातो. 9/11 च्या हल्ल्यानंतर तालिबाननं ज्या भागात वेगानं पाय पसरले त्यापैकी हा एक भाग होता. अमेरिका आणि त्यांच्या सहकारी सैन्याला या भागात तालिबानच्या ऐतिहासिक विरोधाचा सामना करावा लागला होता. हेलमंदचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अफूच्या शेती आणि उत्पादनाचं हे महत्त्वाचं केंद्र आहे.
 
गेल्या 20 वर्षांमध्ये प्रथमच तालिबाननं लश्कर गाहमध्ये प्रवेश करत प्रमुख ठिकाणांवर ताबा मिळवला असल्याचं पत्रकार आणि विश्लेषक डॉक्टर दाऊद आझमी म्हणाले. तालिबानच्या विरोधात काही भागांत अफगाणिस्तानच्या लष्कराला अपयश आलं असलं तरी त्यांना हवाई ह्ल्ल्यांची मदत मिळत असल्याचं ते म्हणाले.
 
हे हवाई हल्ले तालिबानचा वेग कमी करण्यासाठी किंवा त्यांना मागं हटण्यासाठी भाग पाडू शकतात, असं डॉक्टर दाऊद आझमी यांचं म्हणणं आहे.
 
लष्कर गाहची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या शहराचा इतर ठिकाणांशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. तालिबानच्या सध्याच्या हल्ल्यापासून संरक्षण झालं तरीही, जास्तवेळ ताबा टिकवण्याची क्षमता लष्करात नसल्याचं अफगाणिस्तानात इंटरनॅशनल क्राइसिस ग्रुपचे विश्लेषक अँड्रयू वाटकिन्स यांचं म्हणणं आहे.
 
लष्कर गाह ही तालिबानच्या ताब्यात येणारी पहिली विभागीय राजधानी आणि प्रमुख शहर असेल, असं ठामपणे सांगता येणार नाही. मात्र यावर ताबा मिळवणं हे तालिबानसाठी सर्वाधिक प्राधान्याचं आहे, असंही ते म्हणाले.
 
वाटकिन्स यांनी अफगाणिस्तानात संयुक्त राष्ट्रांच्या मिशनमध्ये कामही केलं आहे.
 
लष्कर गाहवर तालिबाननं मिळवलेला ताबा पाहता त्यांनी केलेले दावे फोल ठरत असल्याचं वाटकिन्स यांनी बीबीसी उर्दूशी बोलताना सांगितलं. अफगाणिस्तानच्या जनतेला त्रास होऊ नये म्हणून सध्या मोठ्या शहरांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही, असं तालिबाननं आधी म्हटलं होतं. कारण तसं केल्यानं मोठी हानी होऊ शकते, असं तालिबाननं म्हटलं होतं.