1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (17:15 IST)

IPL 2022 Date: IPL चा 15वा सीझन 26 मार्चपासून सुरू होणार, स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश मिळणार, जाणून घ्या कुठे होणार सामने

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 15वा हंगाम 26 मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याआधी स्पर्धेचा उद्घाटन सामना 27 मार्चला होणार असल्याचे बोलले जात होते, मात्र ब्रॉडकास्टरच्या मागणीनुसार बीसीसीआयने 25 मार्च ही तारीख निश्चित केली.
 
आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ही स्पर्धा 26 मार्चपासून सुरू होणार आहे. अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. यावेळी रिकाम्या स्टेडियममध्ये सामने होणार नाहीत. म्हणजेच सामन्यादरम्यान प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाईल. साखळी फेरीदरम्यान त्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार घेतला जाईल. स्टेडियममध्ये जवळपास 40 टक्के प्रेक्षक उपस्थित असतील. जर कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात राहिली तर स्पर्धेच्या उत्तरार्धात 100 टक्के प्रेक्षकही पाहायला मिळतील.
 
मुंबई आणि पुण्यात लीग फेरीचे सामने, प्लेऑफबाबत निर्णय नाही
व्हर्च्युअल बैठकीत गव्हर्निंग कौन्सिलने आयपीएलची लीग फेरी महाराष्ट्रात होणार असल्याची पुष्टी केली आहे. मुंबईत 55 आणि पुण्यात 15 सामने होणार आहेत. लीगचे सर्व सामने चार स्टेडियममध्ये खेळवले जातील. वानखेडे स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर 20 सामने, ब्रेबॉर्न स्टेडियमवर 15 सामने आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 15 सामने होणार आहेत. प्लेऑफचे सामने अहमदाबादमध्ये होऊ शकतात, परंतु अंतिम निर्णय झालेला नाही.
 
सर्व सामने भारतातच होतील
यावेळी प्रथमच बीसीसीआयने फ्रँचायझींना स्पष्टपणे सांगितले की, यावेळी आयपीएल परदेशात होणार नाही. याआधी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांना पर्याय म्हणून तयार ठेवण्यात येईल, असे सांगण्यात येत होते, परंतु आता कोणत्याही परिस्थितीत ही स्पर्धा भारतात आयोजित करायची आहे. पूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.
 
बीसीसीआयने सरावासाठी चार मैदाने निवडली आहेत. यावर गव्हर्निंग कौन्सिल बराच काळ विचार करत होती. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील बीकेसी मैदान, दक्षिण मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील मैदान आणि कांदिवली किंवा ठाण्यातील एमसीए मैदानावर संघ सराव करू शकतात. यासाठी सर्व संघांना ठराविक कालावधी देण्यात येणार आहे.