शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. लता मंगेशकर
Written By
Last Updated : रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (11:54 IST)

लता मंगेशकर यांना आदरांजली: 'शतकातून एकदा असा कलाकार जन्म घेतो '

ख्यातनाम गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लतादीदींच्या जाण्याने झालेला शोक शब्दात व्यक्त केला आहे.
 
"लतादीदींचं जाणं हे माझ्याप्रमाणे त्यांच्या जगभरातील कोट्यवधी चाहत्यांसाठी अतिशय दु:खद आहे. त्यांच्या गाण्यातील वैविध्य, दैवी सूर यांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला. त्यांनी आवाजातून भारताचं सौंदर्य मांडलं. भारतरत्न लतादीदींची कारकीर्द कालातीत आहे. शतकातून एकदा असा कलाकार जन्म घेतो. माणूस म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व भारावून टाकणारं होतं. दैवी आवाज आपल्याला सोडून गेला आहे पण त्यांची गाणी चाहत्यांच्या मनात रुंजी घालत राहतील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत", असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.
 
"लतादीदींचं जाणं शब्दातीत आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न येणारी आहे. भारतीय संस्कृतीच्या पाईक म्हणून येणाऱ्या पिढ्या त्यांना स्मरणात ठेवतील. चाहत्यांच्या मनावर गारुड घालणारा त्यांचा मंत्रमुग्ध आवाज स्तिमित करतो. लतादीदींची गाणी आपल्या मनात विविध भावनांची रुंजी घालतात. भारतीय चित्रपटांचं स्थित्यंतर त्यांनी अनुभवलं. चित्रपटांच्या पल्याड, भारताच्या विकासासाठी त्या सदोदित आग्रही असत. विकसित आणि सक्षम भारत त्यांना पाहायचा होता. लतादीदींचा वैयक्तिक स्नेह मला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. त्यांच्याशी झालेलं बोलणं मी कधीच विसरू शकणार नाही. लतादीदींच्या जाण्याने देशवासीयांना झालेल्या दु:खात मी सहभागी आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी बोललो आणि शोकभावना व्यक्त केल्या", अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
"देशाची शान आणि संगीत जगताच्या शिरोमणी स्वरकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन अतिशय दु:खद आहे. पुण्यात्माला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचं जाणं देशाची अपरिमित हानी आहे. संगीत साधकांसाठी त्या सदैव प्रेरणास्थान राहतील" असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

"पिढ्यानपिढ्या त्यांची गाणी लोक ऐकतील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही प्रार्थना. त्यांचं जाणं धक्का आहे. त्याला सहन करण्याची आपल्याला शक्ती मिळो. लता मंगशेकर जगातलं सातवं आश्चर्य. 70व्या वर्षी दिलेला आवाज 22 वर्षाच्या तरुणीचा वाटत असे. आमचा आधार गेला", असं गडकरी यांनी म्हटलं आहे.
"जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परिसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर अनंतकाळ आपल्या मनामध्ये गुंजन करत राहील. गानसम्राज्ञई लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली", असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे.
 
"भारताचा आवाज हरपला, संगीत अमर रहे. ओम शांती", अशा शब्दांत गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
"अनेक दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा भारताचा लाडका आवाज हरपला. त्यांचा मखमली आवाज चाहत्यांच्या मनात चिरंतन गुंजत राहील. त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, चाहते यांच्या दु:खात सहभागी आहे", असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
 
युग संपलं, एक सूर्य, एक चंद्र, एकच लता अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"गहिरं दु:ख. भारताचा मानबिंदू असलेल्या लतादीदी आपल्यात नाहीत. तुम्ही गायलेली गाणी, आठवणी सदैव स्मरणात राहतील. तुम्ही आमच्यासाठी अभिमानास्पद राहाल", असं क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी म्हटलं आहे.