शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 15 जानेवारी 2022 (20:16 IST)

किरण माने : 'कसाबचंही आपण ऐकून घेतलं, पण माझी बाजू मांडण्याची संधीच मला दिली नाही'

मला मालिकेतून काढण्यामागे राजकीय कारण नाही हे सांगायला इतका वेळ का लागला? असा सवाल अभिनेते किरण माने यांनी केला आहे. बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
 
ते म्हणाले, "सिरिअलमध्ये माझी भूमिका महत्त्वाची आहे. तू उद्यापासून नाही असं सांगण्याइतका मी नगण्य नाही. मला बोलण्याची संधी दिली नाही. माझं ऐकून घेण्यात आलं नाही. सिरीअलमधून कलाकारांना काढलं जातं. पण काम बरोबर नाही, वेळेवर येत नाही अशी इतर कारणं असतात. पण कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून मला काढण्यात आलं. नक्की काय झालं?
 
"मी विचारणा केली. मला सांगण्यात आलं की तुझ्याविरोधात एका महिलेने केलेली तक्रार आणि राजकीय पोस्टमुळे काढण्यात आलंय. कसाबवर आपण खटला चालवला. इथे मी तुमच्यातलाच कलाकार आहे. माझी बाजू मांडण्याची संधीच दिली नाही. माझ्या पोस्टमध्ये कोणत्या पक्षाचं आणि नेत्यांचं नाव नव्हतं."
किरण माने पुढे म्हणाले, "मला ट्रोल करण्यात आलं. कुटुंबीयांबाबत अश्लील शब्द वापरण्यात आले. स्टार प्रवाहच्या पेजवर किरण माने यांना काढून टाका असं कॅम्पेन चालवण्यात आलं. शिवसेना, मनसे इतर नेत्यांशी चर्चा झालीये. त्यांनी पाठीशी उभं राहू असं सांगितलंय. मी थांबणार नाही. माझी न्यायासाठी लढाई सुरू राहील."
 
यासंदर्भात निर्मात्यांची बाजू घेण्यासाठी बीबीसी मराठीने मालिकेच्या निर्मात्या सुझाना घई यांच्याशी संपर्क केला होता.
 
तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, ''किरण माने यांच्या राजकीय भूमिकेचा आणि त्यांना काढून टाकण्याचा काही संबंध नाही. माने यांना रिप्लेस करण्याचा निर्णय हा प्रोफेशनल होता.''
 
दरम्यान, किरण माने यांनी आज (15 जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना याप्रकरणाची माहिती दिली आहे.
 
प्रकरण काय?
स्टार प्रवाहवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेत 'विलास पाटील' ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आलं आहे.
 
किरण माने हे विविध मुद्द्यांवर फेसबुकवर राजकीय भूमिका घेतात, या कारणामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
 
किरण माने यांनी यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्टदेखील लिहिली आहे.
 
फेसबुकवरील पोस्टमध्ये माने म्हणतात, 'काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा...गाड दो, बीज हू मैं, पेड बन ही जाऊंगा !'
किरण यांना काढून टाकण्यात आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्या समर्थनार्थ 'आय स्टॅण्ड विथ किरण माने' हा हॅशटॅग ट्विटर आणि फेसबुकवर सुरु केला आहे.
 
किरण माने यांच्या फेसबुक पोस्ट चर्चेत आल्या होत्या. ते राजकीय पोस्ट लिहीत असल्याने त्यांना अनेक धमकीचे मेसेज येत असल्याचे देखील त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते. फेसबुकवर त्यांनी अनेकदा राजकीय भूमिका घेतली होती.
 
किरण माने यांनी बीबीसी मराठीशी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. माने म्हणाले होते, ''काल शूटिंग संपल्यानंतर मला प्रॉडक्शन हाऊसकडून फोन आला. तुम्हाला आम्ही रिप्लेस करतोय, तुम्ही उद्यापासून या मालिकेत काम करणार नाही. काही लोक तुमच्यावर नाराज आहेत असं त्यांनी मला सांगितलं. चॅनेलमध्ये काम करणाऱ्या एका मित्राने सांगितलं की, एका महिलेने तुम्ही राजकीय पोस्ट करता म्हणून तुमच्या विरोधात तक्रार केली आहे.''
 
''अभिनेता म्हणून माझं काम पाहायला हवा. मी कधीही असुविधांबाबत प्रॉडक्शनला तक्रार केली नाही. मी माझं काम प्रामाणिकपणे करत होतो. ते सर्व बाजूला ठेवून मी फेसबुकला काय लिहितो, यावरुन मला कसं काय काढता येऊ शकतं. फेसबुकवर मी पुरोगामी विचार मांडतो. तुकारामांचे अभंग घेऊन ते आजच्या काळाशी जोडून त्याचे निरुपन करतो. ते विरुद्ध विचारांच्या लोकांना झोंबतं. मला अनेकदा ट्रोल करण्यात आलं. मला अर्वाच्य शिवीगाळ देखील करण्यात आली.''
यासंदर्भात बीबीसी मराठीने मालिकेच्या निर्मात्या सुझाना घई यांच्याशी संपर्क केला. सुरुवातीला त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. परंतु त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
 
घई म्हणाल्या, ''माने यांच्या राजकीय भूमिकेचा आणि त्यांना काढून टाकण्याचा काही संबंध नाही. माने यांना रिप्लेस करण्याचा निर्णय हा प्रोफेशनल होता. काही प्रोफेशनल कारणं होती त्याबाबत माने यांना माहिती आहे. त्यांना त्याबाबत अनेकदा कल्पना देखील दिली होती. त्यांना अनेकदा सूचना देऊनही त्या कारणांचे समाधान न झाल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.''
 
किरण माने यांना काढून टाकण्याची घटना समोर आल्यानंतर काहींनी किरण माने हे देखील असभ्य भाषेत रिप्लाय करत असल्याचे स्क्रिनशॉट ट्विटरवर शेअर केले. त्याबाबत विचारले असता माने म्हणाले, ''मला नाठाळपणे कोणी बोलत असेल तर मी तशाच पद्धतीने उत्तर देतो. मी कुठल्याच पोस्टमध्ये असभ्य भाषा वापरली नाही.''
 
किरण माने यांना काढून टाकण्यात आल्यानंतर त्यांना राजकीय क्षेत्रातून देखील पाठिंबा दर्शवण्यात येत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर पोस्ट लिहीत माने यांना पाठींबा दिला आहे.
'स्टार प्रवाहावरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणाऱ्या किरण माने या अभिनेत्यास फुले, शाहू, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मीडियावर लिहितो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणून अचानक मालिकेतून काढून टाकले गेले.
 
या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु. ल. देशपांडे, निळू फुले या कलाकारांनी कधी टीका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला. याद राखा, हा महाराष्ट्र वैचारिक वारसा जोपासत तुमच्या विरोधात लिहीले म्हणून तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही,'' असं आव्हाड यांनी ट्विटरवर लिहीलं आहे.
कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी देखील हा भाजपाचा सांस्कृतिक दहशदवाद आहे असं म्हणत किरण माने यांना पाठींबा दिला आहे. सचीन सावंत यांनी त्यांच्या ट्विटरवर म्हंटलं आहे की, ''किरण माने या गुणी कलाकाराने सद्य राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केले ते भाजपाला सहन झाले नाही त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले गेले. हा भाजपाचा सांस्कृतिक दहशदवाद आहे. भाजपा विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे