गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (18:23 IST)

पुछता हैं अर्णब...

आज सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी यास अनुमती दिली आहे. लेख सुरू करण्यापूर्वी मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की सुशांत सिंहच्या प्रकरणावर मी शांतपणे अनेक लेख, बातम्या, ट्विट्स खुलासे या सर्व गोष्टी वाचत आहे. पण ते आरोप प्रत्यारोप आहेत आणि माझा न्यायदेवतेवर तसेच बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानावर श्रद्धा असल्यामुळे मी न्यायाधीश न होता केवळ न्यायाची प्रतीक्षा करीत आहे. म्हणून सुशांत सिंह विषयी मी लिहायचे टाळले आहे व आताही टाळतोच आहे. हा लेख केवळ अर्णब गोस्वामीच्या धाडसीपणावर लिहीत आहे हे कृपया वाचकांनी लक्षात ठेवावे...
 
अर्णब गोस्वामी हा पत्रकारितेतला मोदी होईल असं वक्तव्य मी दोन वेळा केलं होतं... अनेकांना ते वक्तव्य समजलं नाही म्हणून लोकांनी त्यावर टीका केली वात्रट विनोद केले... अर्णब पत्रकारितेतला मोदी होईल म्हणजे काय? हे समजून घ्यायचे असेल तर आधी नरेंद्र मोदी थोडक्यात समजून घेऊ. नरेंद्र मोदींना विरोधकांनी घडवलं आहे असं मी बऱ्याचदा म्हटलेलं आहे... या संस्कृतीने आपल्या स्वदेशी विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. ही परंपरा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापासून सुरू झाली आहे. नेताजींना राजकीयदृष्टया संपवण्याचा प्रयत्न या संस्कृतीने केला होता. ती परंपरा सुरू ठेवत नरेंद्र मोदीपर्यंत आली पण पौराणिक भाषेत सांगायचं झालं तर तोपर्यंत शिशुपालाचे शंभर अपराध भरले होते... मोदींना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा असुरी प्रयत्न झाला पण मोदी त्यांना पुरून उरले आणि 70 वर्षांचा खोटारडेपणा आणि खुनशीपणा लोकांना कळला होता. सुब्रह्मण्यम स्वामी खूप छान शब्द वापरतात, नेहरूवियन... असो.
 
मोदींचा इतका मानसिक आणि राजकीय छळ झाला की एक नवा बंडखोर जन्माला आला. जेव्हा जेव्हा एक प्रस्थापित संस्कृती दुसर्या विस्थापित संस्कृतीचा छळ करते तेव्हा त्यातून एक कृष्ण जन्माला येतो, एक रॉबिनहूड जन्माला येतो... मोदींच्या बाबतीतही तेच झालं आणि आता पत्रकारितेत अर्णबच्या बाबतीतही तेच होतंय... काँग्रेसने मोदीना शिव्या तर दिल्याच पण प्रभू रामासारखं आयुष्य जगणाऱ्या सावरकरांनावरही गलिच्छ आरोप केले. संबंध भारताचा आत्मा आलेल्या श्रीरामाच्या अस्तित्वावर सुद्धा यांनी आक्षेप घेतला आहे... हे आपण कधीच विसरून चालणार नाही. पण अर्णबने जेव्हा सोनियाबाईना त्यांच्या माहेरच्या नावाने हाक मारली तर त्याना राग आला आणि अर्णबवर हल्ला करण्यासाठी गुंड पाठवण्यात आले... या गोष्टी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे सुपुत्र हिंदूना आतंकवादी म्हणणाऱ्यांसोबत सत्तेवर असताना व मुख्यमंत्री असताना घडल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने सत्तेचा वापर करून अर्णबवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावर हल्ले करणारे मजेत होते पण ज्याच्यावर हल्ला झाला त्याचीच कसून चौकशी केली गेली. या लोकशाहीचा खूनच होता. 
 
ज्या तीन शक्तीचे महाराष्ट्रात सरकार आहे त्यांचा इतिहास चांगला नाही. सत्तेचा वापर करून  न्यायला अन्यायात बदलणे आणि सामान्य लोकांना त्रास देण्याचा त्यांचा पूर्वेतिहास आहे. मग 70 वर्षांचा पराकोटीचा आर्थिक किंवा वैचारिक भ्रष्टाचार असो, ह्यांच्या काळात घडलेले संशयास्पद मृत्यू असो, कसाबच्या पाकिस्थानी जिहादी हल्ल्याला हिंदूच्या माथी मरून निष्पाप हिंदू आतंकवादी ठरवण्याचं पाप असो, भीमा कोरेगाव प्रकरण सुद्धा हिंदूंच्या माथी मारण्याचं कारस्थान असो, दाऊदने केलेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न असो, अनंत करमुसेला मंत्र्याच्या बंगल्यावर नेऊन केलेली अमानुष मारहाण असो किंवा पालघर साधू हत्याकांडात राजकीय हस्तक्षेप असो किंवा कोरोनाच्या काळात केलेला गलथान कारभार असो... सत्तेचा गैरवापर करण्यात हे तरबेज आहेत आणि गंमत म्हणजे हेच लोक महात्मा गांधींचं नाव घेऊन सत्य आणि अहिंसेवर प्रवचन देत फिरतात.
 
आता अर्णबच्या विषयावर बोलूया. अर्णबने जी शोध पत्रकारिता केली आहे त्यास तोड नाही. भाऊ तोरसेकर म्हणतात त्याप्रमाणे अर्णबला शिवसेनेतील कुणी घरभेदीच माहीत पुरवत असावा. (भाऊ तोरसेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि प्रामाणिक पत्रकाराला, शिवसेनेतला घरभेदी अर्णबला माहिती पुरवतो याची चिंता आहे, पण त्यांच्या विश्लेषणानुसार न्याय मिळावा अस वाटत नाही याचं दुःख वाटतंय. असो.)
काही असो आज अर्णब जिंकला आहे. त्याची मागणी पूर्ण झाली आहे, सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे तपास सोपवला आहे...
 
या सरकारमधील घटक मोदींवर असहिष्णू असल्याचा आरोप करत होते, पण त्यांचं सरकार आल्यावर त्यांनी असहिष्णुता काय असते हे दाखवलं आणि लोकशाहीचा गळा दाबला. सरकारवर टीका करणाऱयांची मुस्कटदाबी केली, गुंडगिरी करून आणि सत्तेचा गैरवापर करून. कितीतरी विरोधकांवर एफआयआर दाखल करून अडकवण्याचा प्रयत्न केला, बंगल्यावर बोलवून मारण्याचा प्रयत्न केला, सरकारी पक्षातील गुंडांनीही लोकांना धमकवण्याचा प्रयत्न केला. तरी लोक टीका करतच राहिले. कालच सरकारी पक्षातील एका नेत्याने गृहमंत्रांकडे अर्णबवर कारवाई करण्याविषयी पत्र लिहिलं आणि गृहमंत्र्यांनी लगेच कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. पण पालघर किंवा करमुसे प्रकरणात गृहमंत्र्यांना काहीच करावंसं वाटलं नाही. लॉकडाऊनमध्ये वाधवान मोकाट फिरत होते, त्याच उत्तर नाही, अव्वाच्या स्ववा विजबिल पाठवलं जातंय, त्यासाठी कुणीतरी आत्महत्या करतंय आणि ऊर्जामंत्री जनतेची थट्टा करणार विधान करतात... वर या सरकारने  व त्यांच्या समर्थकांनी लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, अर्णबचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. तरी अर्णब या मोठया शक्तीसमोर पहाडासारखा उभा राहिला मुख्यमंत्री काय पण महाराष्ट्रातल्या पत्रकाराची हिंमत होणार नाही अशा शरद पवार यांनाही त्याने उघडपणे आवाहन दिले. मोदीसोबत जे करण्याचा प्रयत्न केला तीच चूक हे तथाकथित अहिंसावादी अर्णबसोबत करण्याचा प्रयत्न करत आहेत... पण अर्णब वेगळ्या मातीतला आहे... तो इतरांप्रमाणे दबणार नाही...
 
अर्णबने खुलेआम सांगितलंय की तो आवाज उठवणार... काही झालं तरी. आज अर्णबच्या प्रयत्नांना पाहिले यश लाभले आहे... आतापर्यंत महाराष्ट्र सरकारच्या हालचाली संशयास्पद होत्या. खुद्द मंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राचे नाव या प्रकरणात घेतले गेले आहे... खरे खोटे सीबीआय तपासात आणि न्यायालयात सिद्ध होईल... आपण सामान्य जनतेने कायद्यावर विश्वास ठेवला पाहिजे.
 
तुर्तास अर्णबला तुम्ही थांबवू शकत नाही... आणि तुम्ही ज्या संविधानाचं आणि लोकशाहीचं नाव तुमच्या तोंडातून घेत असता, त्याच लोकशाहीने आणि माझ्या भीमरावांच्या संविधानाने अर्णबला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिलेला आहे... तो बोलणारच... प्रश्न विचारणारच... लोकांचाही त्याला भरभरून पाठींबा आहे... क्योंकि लोगो की जुबान बोलता हैं अर्णब, पुछता हैं अर्णब...
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री