रविवार, 22 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कथा
Written By वेबदुनिया|

स्वप्नाळू दिगू

- मनोहर धडफळे

स्वप्नाळू दिगू
WDManohar
दिगू स्वप्नाळू आहे. त्याला केव्हाही स्वप्न पडते. मग ते घर असो, ऑफिस असो, सिनेमा टॉकीज असतो, बाग असो किंवा कुठलीही जागा असो, जराशी झपकी लागली तरी त्याला तेवढ्यात स्वप्न पडतं. मग ही झपकी सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा रात्र केव्हाही लागो, स्वप्न हमखास पडतं.

असंच एकदा दिगूला स्वप्न पडलं-आपण कवी झालो आहोत. चारोळ्यापासून खंडकाव्यापर्यंतचा आपला प्रवास पूर्णझाला आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर बृहन्महाराष्ट्रातसुद्धा, म्हणजे आसेतु-हिमाचल, मराठी कवितेच्या क्षेत्रात, फक्त आपलंच नाव मराठी काव्यरसिकांच्या तोंडी ध्यानी, मनी आहे.

'नसता कवींचा व्यापार
तरी कैचा असता जागोद्धार
म्हणोनी कवी हे आधार,
सकळ सृष्टीसी।'

समर्थ रामदासस्वामींच्या या वचना-प्रमाणे ‍आणि वसुदेवानं कृष्णाला डोक्यावर वाहून यमुनापार नेलं त्याप्रमाणं आपण काव्यसृष्टीचा महामेरू आपल्या मस्तकी धारण करून जनमानसाचा भवसागर पार करीत आहोत असंही दृष्य त्याच्या दृष्टिपटलासमोरून सरकून केलं. पुढच्या एका विशाल स्टेडियमवर उंचावर बनवलेल्या मंचकावर उभे राहून ध्वनिक्षेपकातून आपण समोर बसलेल्या काव्यरसिकांवर कवितांचं शिंपण करीत आहोत, नवरसांचे तुषार उडवीत आहेत, काव्यजलाचा सडा टाकीत आहोत, असा त्याला साक्षात्कार झाला. आपली स्वाक्षरी घेण्याकरिता तरूण-तरूणींची झुंबड उडाली आहे, हे ही त्यानं पाहिलं.

WDManohar
स्वप्नसृष्टीतून जागा झाल्यानंतर त्याच्या मनात विचार आला की हे स्वप्न म्हणजे दैवीसंकतेच आहे. आपली काव्यप्रतिभा सुप्त अवस्थेत आहे. तिला वेळीच जागृत केले पाहिजे. कवन महासागराशी आपल्या काव्यगंगेचा मिलाप झालाच पाहिजे. अढळपद प्राप्त करण्यासाठी भक्त ध्रवानं जसा दृढनिश्चय केला होता तसाच निश्चय 'महाकवी' होण्याकरिता आपणही केला पाहिजे, हे त्याला जाणवलं. एका भल्या पहाटे, गराच्या गच्चीवर उगवत्या सूर्याला साक्षी मानून त्यानं 'महाकवी' होईनच अशी प्रतिज्ञा केली सुद्धा. 'महर्षी वाल्मीकी' पासून 'रमण रोहे' पर्यंत समस्त कवींच्या समस्त कवितांची पारायणे सुरू केली. काव्य स्फुरावं, प्रस्फुटित व्हावं याकरिता ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतांत त्या तया सर्व गोष्टींचं अगदी बारकाईने अध्ययन केलं.

काही कृती आत्मसात केल्या आणि तो काव्य-प्रसूतीची प्रतीक्षा करू लागला. परंतु बराच काळ लोटला तरीही त्याला काव्य स्फुरलं नाही. शेवटी त्यानं ज्ञानेश्वरमाऊलीचं स्मरण केलं. श्री गजाननाला आळवलं आणि अकस्मात त्याच्या डोक्यातून सणका निघू लागल्या. तो हादरला त्या कवितेच्या प्रसववेदनाच होत्या. त्या इतक्या तीव्र असतील ही कल्पनाच त्याला नव्हती. शब्दांची कारंजी ळडू लागली. शब्द गुंफले जाऊ लागले, कवितेच्या ओळींची रास लागली.

WDManohar
तरूवर झुलती वायूसंगे, चंन्द्रनभीचा कां झुरतो, स्पर्शाताले तुझ्या गूज मज आठवते.... अशा एकामागून एक ओळी त्याच्या मन:पटलावर आदळू लागल्या. बराच वेळ त्याला या ओळींना कसे गुंफावे हेच समजेना. पण मग त्याच्या लक्षात आलं की प्रत्येक ओळ ही एका कवितेचीच ओळ आहे. म्हणजे जितक्या ओळी सुचल्या तितक्या कविता लिहिल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे ही जणू समस्यापूर्तीची स्पर्धाच आहे.

त्यानं प्रत्येक ओळ वेगवेगळया पानावर लहून काढली. त्र्याण्णव पानावर एक एक ओळ, म्हणजे त्र्याण्णव कविता लिहायच्या आहेत. हा विधिसंकेत आहे. दुसर्‍या दिवसापासून तो रोज एक कविता लिहू लागला. लागोपाठ त्र्याण्णव दिसवांत त्यानं त्र्याण्णव कविता लिहून काढल्या. तो स्वत: वर खुश झाला. त्याचं स्वप्न साकार होऊ लागल्याची चिन्हं दिसू लागली त्याला. त्यानं शंभर गुलाबी पाकिटं विकत आणली. टिळक पुस्तकालयांत दोन दिवस चार-चार तास बसून शंभर नियतकालिकांचे पत्ते नोंदून घेतले. पण विचाराअंती ठरविलं की एकाच नियतकालिकाला, जे साप्ताहिक आहे, आपण प्रत्येक आठवड्यात दोन या दराने एक वर्षभरात सर्व कविता पाठवाच्या. या दरम्यान तीन कविता आणखी लिहायच्या. वर्षभरात शहाण्णव कविता प्रकाशित झाल्यावर तर आपलं नांव प्रत्येक काव्यरसिकाला तोंडपाठ होईल.

अशाप्रकारे आपलं स्वप्न साकार होईल. लागोपाठ चार महिने त्याने तिजोरी नावाच्या साप्ताहिकाला आपल्या बत्तीस कविता पाठविल्या. पण एकही कविता अद्याप प्रकाशित झाली नव्हती. तरी त्यानं आपली चिकाटी सोडली नाही. शहाण्णवावी कविता पाठविल्यानंतरच त्यानं दम घेतला. त्या दिवशी त्याला पुन्हा एक गोड स्वप्न पडलं. तिजोरी साप्ताहिकाच्या संपादकानं त्याच्या शहाण्णव कविताचं पुस्तक प्रकाशित करण्याचे हक्क द्यावेत म्हणून अर्ज केला होता. ही अलौकिक संधी दैवयोगानंच आपल्याला मिळाली आहे हे त्याच्या लक्षात आलं. जागृत झाल्यानंतर तो संपादकाच्या पत्राची वाट पाहू लागला.

WDManohar
बरेच दिवसांनंतर त्याला अकस्मात पंचवीस रूपयांची मनिआर्डर आली. मजकुरात कहीच लिहिले नव्हते. पण संपादक 'तिजोरी' असा रबरी शिक्का आणि संपादकाची सही होती. त्यांन संपादकाला एक पत्र पाठवून विचारलं 'किमर्थम् एतद् वित्तम'? हे पैसे कशाचे? आठ दिवसानंतर त्याचं उत्तर आलं. 'रद्‍दीम विक्री' म्हणजे या तिजोरी साप्ताहिकाच्या संपादकानं दिगूच्या शहाण्णव कवितांची अशी विल्हेवाट लावली होती. साहजिकच दिगूचा सगळा उत्साह मावळला. त्यांच पहिलं आणि दुसरं स्वप्न असंच विरून गेलं. दिगूला पुन्हा कधी असं 'साहित्यिक स्वप्न' पडलंच नाही. एक नवोदित होऊ पाहणारा कवी 'उदयपूर्वीच अस्त' पावला. पण दिगूला अजूनही वाटेल तेव्हा, वाटेल तिथे झपकी लागते आणि तेवढ्यात स्वप्न हमखास सापडते.