शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. महिला दिन
Written By अरुणा सबाने|

भोग्या नहीं, दासी नहीं

ND
लोकसंख्येच्या तुलनेत स्त्रियांची लोकसंख्या अर्धी आहे. परंतु आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत अर्ध्या समाजघटकाचा माणुसकीच्या दृष्टिकोनातून अजूनही अजिबात विचार केला गेलेला नाही. त्यांच्यावर अन्याय, अत्याचार अजूनही सुरूच आहेत. शिक्षण, आरोग्य, व्यक्तिमत्त्व विकास इ. बाबतीत त्यांची सतत पिछेहाटच होत राहिली. स्वातंत्र्यानंतर नऊ पंचवार्षिक योजना अंमलात आल्यात. प्रगती झाली, विकासाची गंगा प्रत्येकाच्या दारात नेऊन पोहचविण्याचा विचार झाला. पण योजना आणि त्याची अंमलबजावणी यात फार फरक असतो.

स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय संपत्तीत वाढ झाली. पण वितरण आणि विभाजन न्याय्य होऊ शकले नाही. म्हणून आर्थिक विषमतेची दरी रुंदावत गेली. त्याचप्रमाणे स्त्रीघटकाचे झाले. एकीकडे शहरातून व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेकी हव्यास असणारी स्त्री दिसते, तर दुसरीकडे दारिद्रयरेषेखाली जागणारी, अनेक प्रकारच्या कौटुंबिक, सामाजिक बंधनांनी जखडलेली पुरुषप्रधान संस्कृतीत दुय्यम स्थानावर असणारी आणि अन्याय, अत्याचार, हिंसाचार यामुळे जगण्याची उमेद हरवून बसलेली अबला दिसते. यात समन्वय साधावा, काही मध्य मिळावा यासाठी योजनाबद्ध प्रयत्नांची आवश्यकता आहे.

जगातल्या एकूण कामांपैकी दोन तृतीयांश कामे स्त्रिया करतात. पण त्यांची प्राप्ती एकूण उत्पादनाच्या एकदशांश आहे. भावी पिढी घडविण्यात आई म्हणून त्यांचीच भूमिका महत्त्वाची असते आणि त्याच जर निरक्षर, अन्यायग्रस्त, दुर्बल, दरिद्री राहिल्या तर देशाचा विकार होणार कसा? आजही फक्त 5% स्त्रिया पार्लमेंट किंवा सरकारी ‍समित्यांवर काम करीत आहेत. जगातल्या इस्टेटीपैकी एक शंभरांशापेक्षा कमी इस्टेटीवर स्त्रियांची मालकी आहे. जगात दारिद्र्यरेषेखाली जगणार्‍या 130 कोटी लोकांपैकी सत्तर टक्के स्त्रिया आहेत. अशिक्षितांमध्ये तर दोन तृतीयांश संख्या स्त्रियांची आहे.

एकूण परिस्थितीचा विचार करता स्त्री अजूनही किती उपेक्षित आहे, हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहात नाही. खर तर महिलांचे प्रश्न इतके प्रचंड आहेत की त्या प्रश्नांना मुळापासून हात लावण्याची आवश्यकता आहे. 8 -10 वर्षाच्या मुलीच्या हातातली पाटी-लेखणी काढून तिच्या हातात विळा-कोयता आणि डोक्यावर मोळी येते. 15 वर्षाची होत नाही तो ती पहिल्या बाळाची आई होते. आधी हे प्रश्न भारतातून समूळ नष्ट व्हायला हवेत. यासाठी ‍शासकीय यंत्रणेनेच केवळ प्रयत्न करावेत असे हे प्रश्न नाहीत. हा तुम्हा आम्हा प्रत्येकाचाच प्रश्न आहे.

यासाठी महिलांमध्ये जागृती आणायला पाहिजे. प्रत्येक मुलीला सक्तीचे शिक्षण दिलेच पाहिजे. अठरा नव्हे वीस वर्षाच्या आतील मुलीच्या लग्नाबद्दल आम्हाला माहिती मिळताच आम्ही त्यावर बंधन आणायला हवे. अल्पवयात लग्न करून देणार्‍या आईवडिलांवर गुन्हेगारीचा खटला भरायला हवा. हा प्रश्न आमचा प्रत्येकाचा आहे. कारण शिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यांना व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण देऊन स्वावलंबी बनविणे हे आमचे उद्दिष्ट असायला हवे.


आज गर्भजाल परीक्षा करून सर्रास मुलीचा जन्मच नाकारला जातो आहे. खरे तर डॉक्टरांनीच गर्भजल परीक्षा करण्यास नकार द्यायला हवा. पण त्यांना तर केवळ पैशाचा विचार असतो. जन्माला येण्याआधीच केवळ मी मुलगी आहे म्हणून तिचा जन्मच नाकारायचा मातृत्वासोबत स्वत:च स्वत:तल्या माणुसकीला काळीमा फासायचा. म. फुले, सावित्रीबाई फुलेंनी केशवपन पद्धती बंद करण्यासाठी सगळ्या न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. आज गर्भजल परीक्षा न करण्यासाठी सगळ्या डॉक्टरांनी एकत्र येऊन संप करण्याची गरज आहे.

महिलांचे सबलीकरण हे अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी न्यायव्यवस्थेतही आवश्यक ते बदल करण्यात यावे. महिलांकडे आत्मियतेने बघणारी व व्यकि् तश: हल्ले होणार नाहीत अशी न्यायव्यवस्था निर्माण व्हायला हवी. वैवाहिक कायदे, घटस्फोट आणि पोटगीचे कायदे, मुलांच्या पालकत्वाचे कायदे यात योग्य तो बदल व्हायला पाहिजे. कारण शिक्षण हाच स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा मुख्य पाया आहे. मुलींना केवळ पाठ्यपुस्तकीय शिक्षण देऊन स्वावलंबी बनविणे हे आमचे उद्दिष्ट असायला हवे.

महिलांच्या उन्नतीचा वेगळा विचार करण्याची गरज आहे, हे शासनाला पटले आहे. यासाठी महाराष्ट्र शासन निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. पण याने आमचे प्रश्न सुटणार नाहीत. ना तर शासन आमचे सभळे प्रश्न सोडवू शकत, ना प्रत्येकदा आमच्या स्वयंसेवी संघटना किंवा व्यक्तिश: सामाजिक कार्यकर्ता येऊ शकत. यासाठी प्रत्येक स्त्रीला स्वत:च स्वत:ची मानसिक तयारी करायची आहे की, 'मला काहीतरी करायचंय. मला माझ्या मुलीला शिकवायचं आहे. मला माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडायची आहे. त्याविरुद्ध लढायचं आहे.

नव्हे, मुळात माझ्यावर अन्यायच होणार नाही याची मी काळजी घेतली पाहिजे.' प्रत्येकीने स्वत: स्वत:ची शक्ती ओळखली पाहिजे. जगात अशी एकही गोष्ट नाही की जी आपण करू शकत नाही. पण हे आपणच ओळखले पाहिजे. त्यासाठी आधी आपण आपल्या अंतरंगात डोकावले पाहिजे. 'मी कोण आहे', मी काय करू शकते?' हा प्रश्न आधी आपण आपल्याला विचारला पाहिजे. त्याचे उत्तर मिळाले की आणणच आपले व्यक्तिमत्त्व घडवू शकतो. अत्याचार करणारा जेवढा अपराधी असतो, तेवढेच अपराधी आपण अन्यार सहन करणारेही असतो. खरे तर आपण ‍'निर्मिक' आहोत. मग आपण अबला कशा? पुरुष याचक म्हणून येतो. आपण त्याला पितृत्वाचं दान देतो आणि आयुष्यातलं सर्वात मोठं दान देणारी व्यक्ती अबला असूच शकत नाही.

भोग्या नहीं, दासी नहीं,
नहीं हम देवता समान।
मनुष्य है हम, बन दिखायेंगे
मनुष्यता की पहचान।।