अवैध बांगलादेशींवर मोठी कारवाई ,या राज्यात 27 बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना अटक
देशातील विविध राज्यांमध्ये अवैध बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांची मोहीम सुरू आहे. या क्रमाने केरळमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. केरळ पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की एर्नाकुलम ग्रामीण पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एर्नाकुलम जिल्ह्यातील उत्तर परावूर भागातून 27 बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे बांगलादेशी कोचीमध्ये बेकायदेशीरपणे राहत होते आणि काम करत होते.
केरळ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले बेकायदेशीर बांगलादेशी नागरिक स्वतःला पश्चिम बंगालमधील स्थलांतरित कामगार असल्याचे सांगून अनेक ठिकाणी काम करत होते. पोलिसांनी ऑपरेशन क्लीन नावाची विशेष मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत ही अटक करण्यात आली आहे.
उत्तर परावुरमध्ये बांगलादेशी नागरिक राहत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. यानंतर एर्नाकुलम ग्रामीण पोलिसांच्या पथकाने एटीएसच्या मदतीने शोधमोहीम राबवली. पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी केली असता हे लोक बांगलादेशी नागरिक असून भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे समोर आले. ते स्वतःला भारतीय नागरिक म्हणवून घेत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या लोकांची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
Edited By - Priya Dixit