शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :मुंबई , सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (22:56 IST)

महाराष्ट्रातील ६ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान; उद्योजक आनंद महिंद्रा यांना ‘पद्मभूषण’प्रदान

सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे आज सायंकाळी वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना पद्म पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. यामध्ये उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
पद्म पुरस्कार वितरण सोहळयास उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
 
दरवर्षी  प्रजासत्त्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये आज सकाळी वर्ष 2020 च्या काही पद्म पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. सकाळी पार पडलेल्या समारोहात 4 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. वर्ष 2020 च्या उर्वरित पद्म पुरस्काराचे वितरण  सायंकाळी करण्यात आले. यामध्ये एकूण 6 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 
महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक श्री. आनंद महिंद्रा यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. श्री महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे चेयरमन आहेत. जगभरातील 100 देशांमध्ये त्यांचा उद्योगसमूह कार्यरत आहे.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या 5 मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये कला क्षेत्रातील योगदानासाठी 3 मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने आज दुसऱ्या टप्प्यात सन्मानित करण्यात आले. यामध्ये सुरेश वाडकर यांना मराठी, हिंदीसह अन्य भाषेतील गायनासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदासाठी एकता कपूर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दूरचित्रवाणी तसेच चित्रपट सृष्टीतील वैविध्यपूर्ण मालिका तसेच चित्रपट निर्माता म्हणून  श्रीमती कपूर यांची स्वतंत्र ओळख आहे. दूरचित्रवाणीवरील त्यांच्या मालिकांनी घराघरात लोकप्रियतेचा कळस गाठलेला आहे.
करण जोहर यांनाही कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिंदी सिने जगतात त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत. मागील 2 दशकांमध्ये  त्यांनी अनेक मनोरंजनपूर्ण हिंदी चित्रपट बनविले आहेत.
 
पोपटराव पवार यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बीजमाता म्हणून ओळखल्या जाणा-या अहमदनगर जिल्ह्याच्या राहीबाई पोपेरे यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील अभिनव कार्यासाठी गौरविण्यात आले.
 
वर्ष 2020 मध्ये विविध क्षेत्रातील 7 मान्यवरांना पद्म विभूषण, 16 मान्यवरांना पद्मभूषण आणि 118 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील 13 मान्यवरांचा समावेश आहे. आज झालेल्या पुरस्कार वितरणामध्ये महाराष्ट्रातील एकूण 10 मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.