शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

आरुषि हत्याकांडः तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता

नोएडामधील आरुषी-हेमराज हत्याकांड प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. या प्रकरणातून तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सीबीआय कोर्टाने राजेश आणि नुपूर तलवार यांना दुहेरी हत्याकांडात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याच शिक्षेविरुद्ध त्यांनी अलाहाबाद हायकोर्टात धाव घेतली होती.
 
न्यायमूर्ती बीके नारायण आणि न्यायमूर्ती एके मिश्रा यांच्या खंडपीठाने तलवार दाम्पत्याच्या या अर्जावर सुनावणी करत सात सप्टेंबरला आपला निर्णय राखून ठेवला होता. तसेच निर्णय सुनावण्याची तारीख 12 ऑक्टोबर जाहीर केली होती.
 
काय आहे नेमके प्रकरण?
 
2008 साली आरुषी हत्याकांडानं संपूर्ण देश हादरुन गेला होता. 16 मे 2008 या दिवशी नोएडातील जलवायू विहार परिसरातून 14 वर्षीय आरुषीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला होता. त्याच्याच पुढच्या दिवशी छतावरुन तलावर कुटुंबीयातील नोकर हेमराज याचाही मृतदेह सापडला होता.
 
या दुहेरी हत्येप्रकरणी पोलिसांनी आरुषिचे वडील राजेश तलवार यांना अटक केली होती. 29 मे 2008 साली तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं. त्यानंतर सीबीआयनं चौकशी करुन तलवार दाम्पत्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या खटल्यातील सर्व सुनावणीनंतर कोर्टानं 26 नोव्हेंबर 2013 साली नुपूर आणि राजेश तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या शिक्षेविरुद्ध तलवार दाम्पत्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.