शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 18 जुलै 2019 (10:36 IST)

मोदी सरकार लालूंची गरीबरथ एक्स्प्रेस रोखणार!

माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी मध्यमवर्गीयांचं एसी ट्रेनमध्ये प्रवास करण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी 2006 मध्ये गरीबरथ एक्सप्रेसची सुरुवात केली. मात्र, सध्याच्या मोदी सरकारने या गरीबरथ गाड्यांना मेल एक्सप्रेसमध्ये बदण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आता गरीबरथ गाड्या लवकरच बंद होणार आहेत.
 
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासही सुरुवात झाली आहे. उत्तर-पूर्व रेल्वे या रेल्वे मार्गावर धावणारी काठगोदाम-जम्मू आणि काठगोदाम-कानपूर सेंट्रल गरीबरथ या गाड्यांना 16 जुलैपासून मेल-एक्सप्रेसमध्ये रुपांतरीत करण्यात आलं आहे. म्हणजेच या मार्गावर आता गरीबरथचा स्वस्त प्रवास बंद झाला आहे.
 
रेल्वेच्या मते, गरीबरथचे डबे बनवणं आता बंद झालं आहे. त्यामुळे सध्या रुळावर जे डबे धावतात ते सर्व जवळपास 14 वर्ष जुने आहेत. त्यामुळे आता गरीबरथच्या डब्यांना एक-एक करुन मेल एक्सप्रेसमध्ये रुपांतरीत केलं जाईल. याची सुरुवात करण्यात आली आहे.
 
गरीबरथ गाड्यांनी मेल किंवा एक्सप्रेस गाड्यांमध्ये बदलताच त्यांचं प्रवासी भाडंही वाढेल आणि गरीबरथचा स्वस्त प्रवास थांबेल. देशात एकूण 26 गरीबरथ गाड्या आहेत. या सर्व गाड्यांना एक-एक करुन मेल एक्स्प्रेसमध्ये रुपांतरीत केलं जाणार आहे.
गरीबरथ मेध्ये 12 डबे असतात आणि हे सर्व 3AC कोच असतात. या गाडीला मेल गाडीमध्ये रुपांतरीत करताना गाडीच्या डब्यांची संख्या ही वाढून 16 होऊ शकते. या 16 डब्यांमध्ये थर्ड एसी, सेकंण्ड एसी, स्लीपर आणि जनरल कोच असतील.
 
लालू यादव रेल्वे मंत्री असताना  2005 मध्ये त्यांनी गरीबरथ गाड्या सुरु करण्याचं जाहीर केलं होतं. गरीबांना एसीतून प्रवास करता यावा यासाठी या गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या. यामुळे लालू यादव यांचं कौतुकही करण्यात आलं होतं.
 
गरीबरथ ही जास्तीतजास्त 140 किमी प्रति तासाच्या वेगाने धावण्यास सक्षम आहे. या गाडीचे सर्व डबे थर्ड एसी असतात. पण, याचं प्रवासी भाडं हे इतर थर्ड एसीच्या तुलनेत जवळपास 40 टक्के कमी असतं. तर, प्रवाश्यांना खाण्यापिण्यासाठी तसेच बेड रोलसाठी पैसे द्यावे लागतात.
 
पहिली गरीबरथ गाडी सहरसा-अमृतसर एक्सप्रेस होती. ही गाडी 5 ओक्टोबर 2006 रोजी बिहारच्या सहरसा ते पंजाबच्या अमृतसर दरम्यान चालवली गेली होती.