रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 5 जून 2023 (10:09 IST)

ओडिशा रेल्वे अपघात ज्यामुळे झाला ती इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम काय आहे?

odisa train accident
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी (4 जून) रोजी दिलेल्या माहितीनुसार कोरोमंडल एक्स्प्रेस अपघात हा तांत्रिक कारणांमुळे झाला. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिममध्ये त्रुटी असल्याने हा अपघात झाल्याचं त्यांनी सांगितलं.
 
“रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. याचा अहवाल लवकरच सादर केला जाईल. मात्र अपघाताचं मूळ कारण आम्हाला कळलं आहे. यासाठी कोण जबाबदार आहे हेही आम्हाला कळलं आहे. सध्या आम्ही रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यावर भर देत आहोत,” असं त्यांनी ANI ला सांगितलं.
 
इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम काय आहे? त्याने अपघात कसा झाला? या प्रश्नांची उत्तरं या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊ या.
इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग म्हणजे काय?
इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग हे रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेमधील एक महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे. रेल्वेगाड्या एकमेकांवर धडकू नये यासाठी ते फायदेशीर ठरतं.
 
दोन किंवा अधिक ट्रेन एकाच वेळेला एका ट्रॅकवर जाणार नाही याची शाश्वती या तंत्रज्ञानामुळे मिळते.
 
त्यामुळे सगळ्या गाड्या एकमेकींशी समन्वय साधून वेगवेगळ्या मार्गावर धावाव्यात यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे.
 
या तंत्रज्ञानामुळे ट्रेन लाईन सुरक्षित आहे आणि त्या ट्रॅकवर दुसरी कोणतीही गाडी नाही हा सिग्नल या तंत्रज्ञानामुळे मिळतो.
 
यामुळे गाड्या एकमेकांवर धडकण्याचं प्रमाण लक्षणीय कमी होतं. तसंच रेल्वे प्रवास सुरक्षित होतो.
 
ही व्यवस्था कशी काम करते?
इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममुळे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम आणि कॉम्प्युटरचा समावेश आहे. त्यामुळे गाड्यांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवलं जातं.
 
एकेकाळी एक कर्मचारी रॉड आणि लेव्हलर घेऊन ट्रेन समोर व्यवस्थित धावते आहे की नाही यावर लक्ष ठेवायचा. एखादी ट्रेन वळवायची असेल तर त्या कर्मचाऱ्याला ते हाताने वळवावं लागायचं.
 
पण आता मात्र सॉफ्टवेअरच्या मदतीनेच हे काम बहुतांश प्रमाणात होतं. त्यात सेन्सर्स आणि फीडबॅक पद्धतही उपलब्ध असते. त्यामुळे एखादी ट्रेन कोणत्या वेळेला कुठे आहे हे व्यवस्थित कळतं.
 
या व्यवस्थेत सिग्नल, ट्रॅक सर्किट आणि इतर ठिकाणाहून सुद्धा माहिती मिळते.
 
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की या इंटरलॉकिंग सिस्टिममुळे अपघात झाला आहे. मात्र नक्की कशात बिघाड झाला हे अद्याप कळलेलं नाही.
 
याशिवाय रेल्वे विभाग accelerometers and automatic block signaling systems चा वापर करतं.
 
Accel Counters (AC) technology काही विशिष्ट इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर काम करते. यामुळे एखाद्या ट्रॅक दुसरी एखादी गाडी तर नाही ना याचा शोध लागतो.
 
Automatic Block Signaling (ABC) मुळे रेल्वे ट्रॅक वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये विभागला जातो. एका ब्लॉकमध्ये एकच ट्रेन हवी. त्यानुसार योग्य सिग्नल दिले जातात.
 
मानवी चुका कमीत कमी व्हाव्या आणि मनुष्यबळाचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जातं.
कोरोमंडल एक्स्प्रेस लूप लाईनमध्ये गेल्यामुळेही हा अपघात झाला. त्या लूप लाईनवर एक मालगाडी आधीच उभी होती. त्या गाडीचा तेव्हा वेग 126 किमी प्रती तास इतका होता. या वेगामुळेच कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून घसरली.
 
आता समजून घेऊ या की लूपलाईन हा काय प्रकार आहे? अशा लाईन्स का तयार केल्या जातात हेही समजून घेऊ या.
 
लुपलाईन म्हणजे काय?
मुख्य रेल्वे मार्गाजवळ आणखी रेल्वे लाईन उभारण्यात येतात. त्यामुळे अनेक ट्रेन स्टेशनवर एकाच वेळी थांबू शकतात. तसंच इतर ट्रेन्सला मार्ग देण्यासाठीसुद्धा त्यांचा उपयोग होतो. काही अंतरावर लूप लाईन मुख्य रेल्वे लाईनशी जोडल्या जातात.
 
लूप लाईन साधारणपणे 750 मीटरची असते. या मार्गावर दोन इंजिन घेऊनसुद्धा रेल्वे व्यवस्थित थांबू शकते.
 
आता 1500 मी ची लूप लाईन उभारण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्यामुळे लूप लाईनची लांबी दुप्पट होईल.
 
कवच तंत्रज्ञान काय आहे?
काही तज्ज्ञांच्या मते कवच तंत्रज्ञान वापरलं असतं तर हा अपघात टळला असता. हे तंत्रज्ञान काय आहे?
 
Train Collision Avoidance System (TCAS) लाच कवच असं म्हणतात. 2011-12 मध्ये हे तंत्रज्ञान आणण्यात आलं होतं.
 
या तंत्रज्ञानाचा भाग म्हणून ट्रेन, सिग्नलिंग सिस्टिम आणि रेल्वे ट्रॅकवर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाईस लावण्यात येतात.
 
हे एकमेकांश अल्ट्रा हाय रेडिओ फ्रिक्वेन्सीने जोडलेले असतात. ते ट्रेनच्या ब्रेकवर नियंत्रण मिळवतात. तसंच ड्रायव्हरला सुद्धा इशारा देतात.
 
या तंत्रज्ञानात ट्रेनची माहिती सातत्याने रिफ्रेश करण्यात येते. ड्रायव्हरने सिग्नल तोडल्यास ड्रायव्हरला इशारा जातो. सिग्नल तोडल्यानेच अनेकदा रेल्वे अपघात होतात.
 
ही व्यवस्था सध्या हावडा चेन्नई या मार्गावर उपलब्ध नाही. कोकण रेल्वे मार्गावर मात्र तिचा वापर केला जातो.
 
Published By- Priya Dixit