1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. Close Proximity Between BJP and the Thackeray Faction Sparks After Call from Matoshree to Devendra Fadnavis

'मातोश्री'वरून थेट देवेंद्र फडणवीसांना फोन? भाजप आणि ठाकरे गटातील जवळीकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

Phone Call from Matoshree to CM Fadnavis
शिंदे गटाला धक्का बसण्याची शक्यता
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या पडद्यामागे वेगाने घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. महायुती सरकारमधील घटक पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चिन्हे असून, निधी वाटप, काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये झालेली एकतर्फी फेरबदल आणि आगामी निवडणुकीतील जागावाटप यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात अंतर वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच दरम्यान, सत्तेत नसलेला उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यात नवी जवळीक निर्माण होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
 
विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदे गटाच्या अतिरिक्त जागांच्या मागणीसमोर नमते घेण्यास तयार नव्हते, असे दिसत असतानाच; दुसरीकडे 'मातोश्री'वरून आलेल्या एका फोननंतर त्यांनी तातडीने पावले उचलत एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
 
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का?
मुंबई महानगरपालिकेत (BMC) सध्या प्रशासकीय राजवट असली, तरी तेथील सुधार समितीमध्ये सत्ताधारी शिवसेनेच्या पाठिंब्याने आणण्यात आलेल्या चार महत्त्वाच्या प्रस्तावांना आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन तीव्र विरोध दर्शवला होता. या विरोधानंतर रात्री उशिरा 'मातोश्री'वरून मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हालचाली करत संबंधित प्रस्तावांचा सविस्तर अहवाल मागवला आणि त्यांना मंजुरी न देण्याचे स्पष्ट आदेश दिले. मातोश्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील हा वाढता समन्वय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
 
नेमकं काय घडलं?
मुंबईतील खुली जागा, रुग्णालय आणि रक्तपेढ्या कंत्राटी पद्धतीने खाजगी क्षेत्राला देण्याच्या प्रस्तावांवर आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला होता. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज पाठवून या प्रस्तावांबद्दल माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनीही पहाटेच्या वेळी या मेसेजला उत्तर दिले. त्यानंतर सकाळी ११ वाजता सुधार समितीच्या बैठकीत आलेले हे सर्व वादग्रस्त प्रस्ताव पुनर्विचारासाठी परत पाठवण्यात आले. हे प्रस्ताव मागे घेतल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांचे आभार मानले. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रस्तावांबाबत स्वतः आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली होती. मात्र, दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी अशा कोणत्याही संभाषणाचा किंवा फोन कॉलचा अधिकृतपणे इन्कार केला आहे.
 
आदित्य ठाकरे यांनी कोणत्या प्रस्तावांना विरोध केला होता?
१. सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव.
२. उपनगरातील पाच रुग्णालयांच्या रक्तपेढ्या 'पीपीपी' (PPP) मॉडेलवर देण्याचा प्रस्ताव.
३. वांद्रे रेक्लमेशन येथील एक्झिबिशन सेंटर आणि मलबार हिलमधील 'ग्रीन झोन'च्या (हरित क्षेत्र) नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव.
 
दरम्यान, सध्या दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ठाकरे गटाकडून त्यांच्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही आणि त्यांना असा कोणताही फोन आलेला नाही. मात्र, या पडद्यामागील घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणे आकारास येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
NCP मध्ये सर्व काही आलबेल नाही! छगन भुजबळांचे २०२९ च्या निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य