1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 जानेवारी 2022 (08:02 IST)

संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत वीज मनोऱ्यावर चढत आंदोलन केले, आज पु्न्हा एकदा चर्चा होणार

नाशिक जिल्ह्यातील सय्यद पिंपरी परिसरात शेतकऱ्यांना पूर्वसुचना न देता वीज तोडणी केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत रविववारी वीज मनोऱ्यावर चढत आंदोलन केले. वीज जोडणी पूर्ववत करा ही मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सोमवारी या विषयावर शेतकऱ्यांसोबत बैठक बोलवण्यात आली  आहे.
 
आडगाव नजीक असलेल्या सय्यद पिंपरी परिसरातील हजाराहून अधिक शेतकऱ्यांना महावितरण कंपनीच्या वतीने कुठलीही पूर्वसुचना न देता थ्री फेज जोडणी तीन दिवसांपासून तोडण्यात आली आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झालेत. शेतीला पाणी नाही, महिलांना घरात पिण्यासाठी पाणी नाही. महावितरणाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी रविवारी परिसरातील पाचशेहून अधिक शेतकरी एकत्र आले. गणपती मंदिर परिसरात बैठक घेण्यात शेतकरी संघटनेचे रामनाथ ढिकले यांच्या नेतृत्वाखाली वीज मनोऱ्यावर चढत आंदोलन करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार परिसरातील शेतकरी एकत्र आले. एक एक करत शेतकरी मनोऱ्यावर चढू लागले. यावेळी शेतकऱ्यांनी वीज मंडळाला आमची वाढीव देयके कमी करून द्या, पाच एचपीची देयके कमी करत तीन एचपीची करू द्या, पूर्ण वेळ द्या आदी मागण्या केल्या. वीज पुरवठा पूर्ववत होत नाही तोवर आंदोलन सुरू राहिल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. दरम्यान, आंदोलनाची माहिती खा. हेमंत गोडसे, आ. राहुल ढिकले, आ. सरोज अहिरे, आ. देवयानी फरांदे यांच्यासह पोलीसांना मिळाली. संबंधितांनी आंदोलनस्थळी धाव घेत शेतकऱ्यांशी चर्चा केली. याबाबत वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींसह अन्य प्रयत्न करत होते. मात्र शेतकऱ्यांनी बंद केलेला वीज पुरवठा तात्काळ सुरू करावा. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात येईल अशी भूमिका घेतल्याने पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला.

दरम्यान, महाकृषी अभियान अंतर्गत या ग्राहकांकडे सात कोटी ६७ लाख रुपयांची थकबाकी आही आहे. योजने अंतर्गत दंड व व्याज माफीची सूट धरून ही रक्कम पाच कोटी ९२ लाख रुपये आहे. सध्य स्थितीत पाच कोटी ८० लाख येणे बाकी आहे. चालू देयकाची रक्कमत ही एक कोटी २४ लाख इतकी आहे. यामुळे २८ जानेवारी रोजी थ्री फेज पुरवठा बंद असून सिंगल वीज पुरवठा चालु आहे. चालु वीज देयकांचा सुध्दा भरणा शेतकरी करत नसल्याचे महावितरणच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. अखेर मध्यस्थी नंतर सोमवारी या विषयावर पु्न्हा एकदा चर्चा होणार असल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.