1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 मे 2022 (08:16 IST)

चला तयारीला लागा! आषाढी वारीच्या तारखांची अखेर घोषणा; पाऊले चालती पंढरीची वाट

vari
वारकरी संप्रदाय ज्या क्षणाची डोळ्यात तेल घालून वाट पाहत असतात त्या आषाढी वारीच्या तारखांची घोषणा झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून आषाढी वारी नेहमीप्रमाणे साजरी होऊ शकलेली नाही. त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात आषाढी वारी संपन्न होणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्येही मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.
 
जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी येत्या २० जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. देहू संस्थानने यासंदर्भात आज घोषणा केली आहे. ही घोषणा होताच वारकऱ्यांनी जल्लोष केला आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यात एकूण ३२९ दिंड्या सहभागी होणार आहेत. ही पालखी दोन ठिकाणी मुक्कामी असणार आहे. त्यात पुणे आणि इंदापूर या दोन ठिकाणांचा समावेश आहे. देहू येथून पालखी निघेल पायी प्रवास करुन ती ९ जुलै रोजी पंढरपूरमध्ये पोहचणार आहे. १० जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात रंगणार आहे.
 
आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी २१ जूनला प्रस्थान करणार आहे. कोरोनाचे निर्बंध यंदा शिथील केल्याने दोन्ही पालख्या अतिशय उत्साहात संपन्न होणार आहेत. दोन्ही पालख्यांच्या प्रस्थानाच्या तारखा जाहीर झाल्याने वारकरी बांधव तयारीला लागले आहेत. गेल्या वर्षी अत्यंत मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत आणि शिवनेरी बसच्या माध्यमातून पालखी निघाल्या होत्या. यंदा मात्र, अनादी काळापासूनच्या परंपरेप्रमाणे वारी संपन्न होणार आहे.