1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 फेब्रुवारी 2019 (09:26 IST)

देशातील शेतकरी आणि जवान दोघेही अडचणीत-छगन भुजबळ

स्व.लाल बहादूर शास्त्री यांनी देशात 'जय जवान'आणि 'जय किसान' असा नारा दिला होता. त्यानुसार देशाची ध्येय धोरणे आखली मात्र सद्याच्या सरकारच्या काळात देशातील शेतकरी आणि सैनिक हे दोघेही अडचणीत असून देशात न किसान सुखी हैं न जवान सुखी हैं असे  छगन भुजबळ यांनी म्‍हटले आहे. आज झाडी,ता.मालेगांव येथे चणकापूर उजवा कालवा रामेश्वर मार्गे कुंभार्डे-झाडी कालव्याच्या ५.८३ कोटी किंमतीच्या विकासकामाचे भूमिपूजन छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे, प्रसाद हिरे,साहेबराव पाटील, दिलीप इनामदार, तालुकाध्यक्ष संदीप पवार, विक्रम मार्कंड,रघुनाथ परेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम देसाई, राजेंद्र देवरे, रतन हलवर, शिवाजी सुपनर, जळगावचे सरपंच रोडू आहिरे, झाडीचे सरपंच माणिक नेमणार, पुंडलिक होडे, बाळासाहेब दुकळे, दिपक आहिरे, युवक तालुकाध्यक्ष अरुण अहिरे,विनोद चव्हाण, माणिकराव पाटील आदी उपस्थित होते. 
 
यावेळी छगन भुजबळ म्हणाले, नोटबंदीमुळे दहशतवाद कमी होईल असे त्यांनी सांगितले मात्र देशात आजही सैनिकांवर हल्ले होत आहे. पुलवामा येथे हल्ल्यात देशातील 44 जवान शहीद झाले आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. एकीकडे पाकिस्तान आपल्यावर हल्ला करत असताना पंतप्रधान मात्र न बोलवता पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमास हजेरी लावून केक भरवतात अशी टीका त्यांनी केली. देशात सैनिक शहीद झाल्यानंतर देशाच्या डोळ्यात अश्रू असतांना सरकार मात्र सभा घेण्यात धन्यता मानत आहे. मात्र अशा परिस्थितीत सरकारसोबत आहोत अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली. दहशतवाद्यांनी अशी कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी आमच्या मध्ये फूट पडणार नाही आम्ही एकसंघ राहु असे ठणकावून सांगत ज्या राहुल गांधींना पप्पू म्हणून संबोधतात त्यांना राहुल गांधी यांच्याकडून शिकण्याची गरज आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.