गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 4 एप्रिल 2021 (11:51 IST)

देवेंद्र फडणवीस: कोरोनासंदर्भात अन्य देशांचे फडणवीसांनी उदाहरण दिल्यानंतर प्रतिक्रियांचा पाऊस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधल्यानंतर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केले.
फडणवीस म्हणतात, "युके, जर्मनी कुठेही जा, सर्वांनीच काही ना काही दिलंय... तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा! विरोधक वा तज्ज्ञांचा दु:स्वास करुन नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल."
या ट्वीटनंतर फडणवीसांना सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आलं. प्रतीक मोरे यांनी फडणवीसांना प्रश्न विचारला की- "आत्मनिर्भर भारत पॅकेजचे काय झाले देवेंद्र भाऊ ? पीएम केअर निधी कुठे गेला देवेंद्रभाऊ ? पीएम केअर निधीचा ऑडिट अहवाल मिळेल का वाचायला ? असे तीन सवाल त्यांनी केले.
"युके जर्मनी काहीही घ्या, सगळे देश आहेत... आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राबद्दल नाही भारताबद्दल बोलले जाईल... युके जर्मनी सगळ्यांनी काही न काही केलंय... भारताच्या पंतप्रधानांनी काय दिलं? उलट राज्यांची अडवणूक केली," असं आत्मनिर्भर टोनी शार्क नावाने अकाऊंट असलेल्या व्यक्तीने म्हटलं आहे.
"ते सर्व देश आहेत आणि आपला देश भारत आहे आणि तिथे तुमच्या पक्षाचं सरकार आहे. मागा केंद्र सरकारकडे मदत. की केंद्र सरकार फक्त जीएसटी आणि पीएम केअर फंडचा भरणा करण्यासाठी आहे? राज्यांना जाएसटी आणून परावलंबी बनवलं आता त्यांनी निधी कुठून ऊभा करायचा?" असा सवाल अमोल यांनी केला आहे.
"उद्धव ठाकरेंचा संवाद 'मन की बात' नव्हता तर पारदर्शक होता,लोकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं देणारा होता आणि कनविन्सिग होता. त्यामुळेच तो विरोधी पक्षनेत्यांसाठी फस्ट्रेटिंग ठरला. भाजपला लोकहिताशी कर्त्यव्य नाही, हे सरकार अस्थिर कसं होईल यातच त्यांना इंटरेस्ट आहे," असं रुपेश मेश्राम यांनी म्हटलं आहे.
"फडणवीस साहेब तुम्ही म्हणता ते सर्व देश आहेत. राज्य नाहीत !! राज्य केारेानाचा ऊद्रेक रेाखण्यास अपयशी हेात असेल तर केंद्र सरकारने पुढे येऊन त्वरित ऊपाय येाजावेत, पॅकेज द्यावे नाहीतर राज्यातील केारेाना सर्व देशभर पसरेन, मग सर्व राज्ये आणि केंद्र सरकारही हतबल हेाण्याची वाट बघू नका.." असं बाळासाहेब गायकवाड यांनी लिहिलं आहे.
काहींनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली आहे. सुनील येवले म्हणतात, " दुसऱ्या शिकवे ब्रम्हज्ञान, स्वत: कोरडे पाषाण... जनतेला खूप सल्ले देता येतात यांना - पण कुठल्यातरी स्मारकाचं भूमिपूजन मात्र थाटात करता येतं... ते ही स्वत:च्या घरात दोन कोरोनाबाधित रूग्ण असताना... तेव्हा यांना लाज वाटत नाही असा एका नेटिझनने म्हटलं आहे.
'देवेंद्र फडणवीस हे राज्यभर फिरले'
काहींनी देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेतली आहे.
'बेस्ट सीएम वर्षभर घरात आहेत, आणि फडणवीस विरोधीपक्ष नेते असूनही पूर्ण महाराष्ट्र भर फिरले लोकांना धीर देण्यासाठी याची तरी जाण ठेवा,' असं कमला वटकर यांनी म्हटलं आहे.
 
'स्वत: काहीतरी करून दाखवा, रडायचे थांबा'
जीएसटीच्या मुद्द्यावरून आव्हाड यांनी फडणवीस यांना टोला लगावला होता. "20 लाख कोटी हे मी शब्दात लिहू शकतो. पण आकड्यात किती शून्य येतात हे माझी स्मरणशक्ती कामकुवत असल्या कारणाने काही जमत नाही. आपली स्मरणशक्ती मजबूत असल्याकारणाने या शून्यांमधील किती शून्य महाराष्ट्राच्या वाट्याला आले. हे जर सांगितलं तर ते मी नक्कीच पाठांतर करून माझ्या स्मरणात ठेवीन," असं आव्हाडांनी फडणवीसांना विचारलं होतं.
आव्हाड यांनी फडणवीसांना केलेल्या टीकेला प्रश्नाला भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. "2020-21 या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत जीएसटी कॉम्पनसेशनचे 70 हजार कोटी रूपये विविध राज्यांना देण्यात आले आहेत.
अगदी 5 दिवसांपूर्वी, 27 मार्च 2021 रोजी सुद्धा 30 हजार कोटी रूपये विविध राज्यांना देण्यात आलेत. त्यातील सर्वाधिक 4446 कोटी रूपये महाराष्ट्राला मिळालेत. महाराष्ट्रातील वसुली सरकारने आता केंद्राकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकणे थांबवावे.
तुमच्या रडगाण्यांना जनता विटली आहे! कोरोनानं हाहाकार माजवलाय… कायदा सुव्यवस्था कोलमडून गेली आहे. देशभरात महाराष्ट्राची बदनामी होतेय.. तुम्ही स्वतः काही तरी करुन दाखवा! किमान रडायचे तरी थांबवा!," असं म्हणत आमदार आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिलं आहे.