शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जून 2022 (21:25 IST)

सद्गुरु नाशिककरांशी येत्या 11 जूनला साधणार संवाद

sadguru
मनुष्याने प्रगतीची अनेक शिखरे गाठताना स्व:ताच्या स्वार्थासाठी पर्यावरणाची अपरिमित हानी केली आहे. आता याच प्रदूषणामुळे मनुष्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. या प्रदुषणात मातीचा देखील समावेश आहे. मातीचे हेच प्रदूषण रोखण्यासाठी आणि याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी ईशा फांउडेशनचे संस्थापक सद्गुरु अर्थात जग्गी वासुदेव संपूर्ण जगा
त ‘माती वाचवा'ची (सेव्ह सॉईल) ची मोहीम हाती घेतली आहे. यात सद्गुरू यांची जागतिक यात्रा सुरु आहे. या यात्रेअंतगर्त सद्गुरू येत्या 11जूनला नाशिकमध्ये येत असून नाशिककरांशी संवाद साधणार आहेत. शहरातल्या केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी 4.30 वाजता सदरचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन दैनिक देशदूत आणि मराठा विद्या प्रसारक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.    
   
या जागतिक मोहिमेमध्ये सद्गुरू सोलो बाईक राईड करत 27 देशांत 100 दिवस यात्रा करत आहेत.  मार्च महिन्यामध्ये  ही जागतिक मोहीम सुरू केल्यानंतर सद्गुरू यांनी 30,000 कि.मी  प्रवास केला. दरम्यान, वेगवेगळ्या देशांना भेटी देऊन नागरिक आणि नेत्यांपर्यंत माती वाचवाचा संदेश पोहोचविला आहे. २१ मार्चला लंडनमध्ये त्यांचा प्रवास सुरू झाला आणि जूनच्या अखेरीस कावेरी नदीच्या खोऱ्यात संपणार आहे. 26 देशांना भेट देऊन नुकतेच त्यांचे जामनगर येथे भारतात आगमन झाले.  आता पुढे भारतातील विविध राज्यांत भेट दिल्यानंतर11जूनला ते नाशिकमध्ये येत आहेत.
 
सद्गुरू यांचे हे अभियान जागतिक अन्न संघटना आणि युनायटेड नेशन्स कन्झव्हेंशन टू कॉम्बैट डेजर्टिफिकेशन यांच्या माध्यमातून होत आहे. यूएनसीसीडी म्हणजे युनायटेड नेशन्स कन्झव्हॅशन टू कॉम्बैट डेजर्टिफिकेशन (UNCCD) ने त्यांच्या अहवालात भिती व्यक्त केली आहे की, 2050  सालापर्यंत जगभरातील सुमारे 90 टक्के मातीचा हास होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे अन्न सुरक्षा, पाण्याचा तुटवडा, दुष्काळ वातावरणातील बदल, स्थलांतरावर परिणाम होणार आहे. म्हणूनच मातीचे संवर्धन केले तर हे प्रश्न सुटणार आहेत. त्यासाठी ‘माती वाचवा' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. जगभरातील किमान साडेतीन अब्ज किंवा 60 टक्के लोकांमध्ये मातीच्या संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे हे मोहिमेचे ध्येय आहे. 
 
माती वाचवा मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट जगातील सर्व राष्ट्रांना तातडीच्या धोरणात्मक सुधारणांद्वारे शेतजमिनीत किमान 3-6% सेंद्रिय सामग्री अनिवार्य करण्यासाठी प्रेरित करणे आहे. मृदा शास्त्रज्ञांनी या किमान सेंद्रिय सामग्रीशिवाय मातीच्या विनाशाचा इशारा दिला आहे, ज्याला ते ‘मातीचे नामशेष होणे’म्हणून संबोधत आहेत. भारतामध्ये, शेतजमिनिवारच्या मातीत सरासरी सेंद्रिय सामग्री 0.68% असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे देशाला वाळवंटीकरण आणि माती नष्ट होण्याचा मोठा धोका आहे. देशातील सुमारे 30% सुपीक माती आधीच नापीक बनली आहे आणि उत्पादन देण्यास असमर्थ आहे. असा अंदाज आहे की, जागतिक स्तरावर सुमारे 25% सुपीक जमीन ओसाड झाली आहे. युनायटेड नेशन्सने चेतावणी दिली आहे की सध्याच्या मातीच्या ऱ्हासाच्या दरानुसार आतापासून तीन दशकांपेक्षा कमी काळात - 2050 पर्यंत पृथ्वीचा 90% भाग वाळवंटात बदलू शकतो.
 
माती नष्ट झाल्यामुळे जगभरात अभूतपूर्व पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक आपत्ती येऊ शकतात. यामध्ये तीव्र होणारे हवामान बदल, जागतिक अन्न आणि पाण्याची टंचाई, भीषण नागरी संघर्ष आणि प्रत्येक राष्ट्राची सुरक्षा आणि सांस्कृतिक रचना धोक्यात आणणाऱ्या स्थलांतरचा समावेश आहे.
माती वाचवा, ही माती आणि ही धरती वाचविण्यासाठी एक सजग दृष्टीकोणाची प्रेरणा देणारी जागतिक चळवळ आहे. ही पहिली आणि अग्रगण्य अशी  लोक चळवळ आहे. जगातील 3.5 अब्ज लोकांचा पाठींबा मिळवून (जगात मतदानाचा अधिकार असणाऱ्या 60% लोकसंख्येपेक्षा जास्त) जगभरातल्या शासनांना मातीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि मातीचा ऱ्हास थांबवण्यासाठी धोरणात्मक बदल करण्यासाठी प्रेरित करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. जागतिक नेते, प्रभावशाली व्यक्ती, कलाकार, शेतकरी, तज्ञ, आध्यात्मिक नेते, NGOs आणि सामान्य जनता, हे पुढे येऊन माती सोबत मानवतेचा संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी या मोहिमेला पाठींबा देत आहेत.