गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (16:40 IST)

... तर आपल्याला कडव्या कार्यकर्त्यांची फळी लागेल -जयंत पाटील

वर्धा - पक्ष वाढवायचा असेल तर आपल्याला कडव्या कार्यकर्त्यांची फळी लागेल. त्यासाठी आपल्या बुथ कमिट्या पूर्ण करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वर्धा येथे केले. 
 
राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याचा आजचा सातवा दिवस असून वर्धा येथे महात्मा गांधींच्या बापू कुटीमध्ये जावून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. 
 
वर्धा मतदारसंघात तरुणांची फळी सक्षम केली तर नक्कीच पक्षाला इथे मोठी मदत होईल. पक्ष चालवत असताना प्रदेश, महिला, युवक, युवती, विद्यार्थी यात समन्वय पाहिजे असेही जयंत पाटील यांनी सांगितले. 

देशात दिग्गजांचा पराभव झाला आहे. स्वर्गीय इंदिरा गांधीही त्यात अपवाद नाही. झालेला पराभव मागे टाका आणि कामाला लागा. आपले मनोधैर्य वाढण्यासाठीच राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आपल्या भागात आली आहे हेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 
 
यावेळी माजी आमदार सुरेश देशमुख, प्रदेश महासचिव किशोर माथनकर, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.