शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 7 डिसेंबर 2022 (07:57 IST)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : एकनाथ शिंदेंशी चर्चेनंतर बोम्मईंची नरमाईची भूमिका

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरण पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसत असतानाच दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आता सामोपचाराची भूमिका घेतली आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर केलेल्या चर्चेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाभागात कायदा व सुव्यवस्था राखण्याला प्रथम प्राधान्य असल्याचं स्पष्ट केलं आहे.
 
दरम्यान, आपण महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादासंदर्भातील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगायला मुख्यमंत्री बोम्मई विसरले नाहीत.
 
ते म्हणाले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासोबत फोनवरून चर्चा केली. दोन्ही राज्यांदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबाबत आमची सहमती झाली आहे. दोन्ही राज्यांमधील नागरिकांमध्ये सौहार्दतेचे संबंध आहेत, त्यामुळे शांतता राखण्याला आमचं प्राधान्य असेल.
 
“मात्र, सीमाभागाचा विचार केल्यास त्याबाबत आमची भूमिका बदललेली नाही. सुप्रीम कोर्टातील कायदेशीर लढाई आमच्या बाजूने सुरूच राहील,” असं बोम्मई यांनी म्हटलं.
Published By -Smita Joshi