शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 जानेवारी 2019 (16:34 IST)

न्यायालयाने महिला व बाल विकास मंत्रालयाला फटकारले

गेल्या ९ महिन्यात एकट्या मेळघाटात ५०८ बालके मृत्यूमुखी पडली आहेत. एप्रिल ते डिसेंबर २०१८ दरम्यान कुपोषणामुळे या बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील ११ आदिवासी भागांमधील कुपोषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्यावेळी न्यायालयात याचिकाकर्त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यावरुन न्यायालयाने महिला व बाल विकास मंत्रालयाला फटकारले असून अद्याप यावर का उत्तर देण्यात आलेले नाही असा सवाल केला आहे.
 
मेळघाटात डॉक्टरांना या भागात जाऊन काम करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप एकही डॉक्टर तेथे गेलेले नसून याविषयीचे अहवाल सादर करण्यात आले आहेत. तसेच ‘मुलांचे मृत्यू कशाने होत आहेत याचे कारण शोधून काढण्यासाठी काहीही केले जात नाही’, असे मेळघाटामधील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जमादार यांच्या खंडपीठाला सांगितले आहे.