शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 जुलै 2022 (08:42 IST)

नाशिकला संभाजी चौक ते त्रिमूर्ती चौक उड्डाणपूल होणार की नाही? मुंबई आयआयटीने हा अहवाल दिला

शहरात अत्यंत कळीचा ठरलेला संभाजी चौक ते त्रिमूर्ती चौक उड्डाणपूलाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या उड्डाणपुलाला अनेकांनी विरोध केला. अत्यंत प्राचिन वृक्षाची तोड करावी लागणार असल्याने विरोधाची धार तीव्र होती. अखेर यासंदर्भात मुंबई आयआयटीला या संदर्भात अभ्यास करुन अहवाल देण्याचे नाशिक महापालिकेने सांगितले होते. अखेर आयआयटीने त्यांचा अहवाल सादर केला आहे.
 
नाशिक महानगरपालिकेतर्फे शहरातील संभाजी चौक, सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक येथे उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला. काही स्थानिक नागरिकांनी त्यासाठी जोर लावला होता. नाशिककरांच्या कराच्या पैश्यातून तब्बल २५० कोटींची उधळपट्टी करून गरज नसताना पूल उभारणीच्या हट्टाविरोधात मनसेसह काही संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला होता. मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती. त्यातच आता आय.आय.टी. पवईने अहवाल सादर केला आहे. त्यात उड्डाणपूलाची गरज नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
 
या प्रस्तावित उड्डाणपुलाला स्थानिक नागरिकांचा असलेल्या विरोधाच्या अनुषंगाने सदर उड्डाणपुल त्वरित रद्द करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने लढा दिला. अखेर या लढ्याला यश मिळाले आहे. मायको सर्कल पाठोपाठ त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपूलांची गरज नसल्याच्या आय.आय.टी. पवईच्या अहवाला नंतर तत्कालीन मनपा आयुक्त रमेश पवार यांनी दोन्ही उड्डाणपूल रद्द करण्याचे आदेश दिले. शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह मनसैनिकांनी याबद्दल महापालिकेचे आभार मानले आहेत.
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्रिमूर्ती चौक येथे पेढे वाटप करून आनंद साजरा केला. या प्रसंगी मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर, उपजिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, सिडको विभाग अध्यक्ष-नितीन माळी, बबन जगताप , महिला सेनेच्या कामिनीताई दोंदे,अरुणाताई पाटील, निर्मलाताई पवार,भाग्यश्रीताई ओझा, गौतम पराडे,सचिन कामानकर ,सचिन रोजेकर, राहुल पाटील, मनोज जैन ,अजिंक्य शिर्के, पंकज दातीर, गोपी पगार, गोपी गांगुर्डे, शुभम थोरात, सचिन ओझा, समाधान चव्हाण, गणेश दातीर, व सर्व पदाधिकारी ,सर्व भाजी विक्रेते, व्यावसायिक व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.