शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (21:35 IST)

महाराष्ट्र बंदचा उद्धव ठाकरेंचा इशारा..!

uddhav thackeray
केंद्राने पाठवलेल्या या सॅम्पलला पुन्हा बोलवून घ्या किंवा एखाद्या वृद्धाश्रमात पाठवा अन्यथा त्यांना महाराष्ट्रांचा इंगा दाखवणार, हे पार्सल राज्यातून नाही गेलं तर आम्ही महाराष्ट्र बंद करू किंवा विराट मोर्चा काढू असा खणखणीत इशारा शिवसेना (उ. बा. ठा.) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र-राज्य सरकारांना दिला आहे. त्यांच्या सडक्या मेंदूच्या मागे कोण याचा शोध घ्यायला हवा असे म्हणत भाजपवर घणाघात केला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला आहे. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचा देखील त्यांनी समाचार घेतला असून बोम्मईंच्या अंगात भूताने प्रवेश केला की काय असे वाटतं. म्हणत खोचक टोला लगावला आहे.
 
उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर चांगलाच घणाघात केला असून ते म्हणाले, “त्यांच्या सडक्या मेंदूच्या मागे कोण याचा शोध घ्यायला हवा. राज्यपाल निष्पक्ष असावा, राज्यात काही पेचप्रसंग निर्माण झाला तर त्याची सोडवणूक त्यांनी करावी. पण आपले राज्यपाल काहीही बोलत सुटतात. आता राज्यपालांनी जे काही बोललंय ते गांभिर्याने घेण्याची गरज आहे. कुणीही व्यक्ती केवळ राज्यपाल म्हणून काहीही बोलला तर ते सहन करणे गरजेचं नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी ठाण्यात मराठी लोकांचा अपमान केला, सावित्रीबाई फुलेंच्याबद्दलही चुकीचं वक्तव्य केलं. आता शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. “
 
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “येत्या दोन चार दिवसात राज्यपालांचा विषय तडीस न्यावा लागेल. जे महाराष्ट्र प्रेमी, फुले प्रेमी, आंबडेकर प्रेमी आणि छत्रपती प्रेमी आहेत. त्यांना उभे राहावे लागेल. शिवाजी महाराज नसते तर कोश्यारी कुठे असते. सावित्रीबाई फुले नसत्या तर महिला शिक्षणाचं काय झालं असतं? याचं साधं भान राज्यपालांना राहिलं नाही. हे आता अति झालं. ज्यांना आगा पिछा नाही असे लोक राज्यपाल पदावर बसवले गेले आहेत,”
 
“जर राज्यपालांना हवटलं गेल नाही तर या महाराष्ट्रद्रोह्यांचा विरोध करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन खणखणीत विरोध करुन दाखवलं पाहिजे. वेळ आली तर महाराष्ट्र बंद पाडू , शांततापूर्ण मार्गाने महाराष्ट्र बंद करू. महाराष्ट्र हा लेचापेच्यांचा नाही हे केंद्राला दाखवून देऊ. त्यासाठी महाराष्ट्र बंदमध्ये सर्वांनी सामील व्हावं.” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor