शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (09:51 IST)

'ती' साडेतीन लोकं कोण?

शिवसेनेची मंगळवारी (15 फे्ब्रुवारी) महत्त्वाची पत्रकार परिषद होणार असून पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार आणि सर्व पदाधिकारी उपस्थित असतील, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.
 
या पत्रकार परिषदेच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी (14 फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी विरोधकांना तसंच केंद्रीय तपास यंत्रणांना इशारा दिला होता.
"डोक्यावरुन पाणी गेलं असून आम्हीही आता सहन करणार नाही. आता आम्ही बरबाद करणार,"असा इशारा संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
 
संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, विरोधकांनी माझी पत्रकार परिषद काळजीपूर्वक ऐकायला हवी. केंद्रीय तपास यंत्रणांच्या प्रमुखांनाही माझी पत्रकार परिषद ऐकायली हवी.
 
ही पत्रकार परिषद मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार होत आहे. त्यांचं या पत्रकार परिषदेवर लक्ष असेल. या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्ष बोलणार नसून महाराष्ट्र बोलणार आहे. शिवसेना हा 11 कोटी मराठी माणसांचा आवाज, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
 
शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहेत. परंतु, त्यापूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर आणखी आरोप केले आहेत. आज पत्रकार परिषद घेणार आहात, तर आजच्या प्रश्नांची उत्तरे का देत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत, विषय भरकटवण्यासाठी पत्रकार परिषदेचा घाट घातला जातोय, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या मुलीच्या विवाहसोहळा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा झाला. या सोहळ्यातील कार्यक्रमांचे लाखो रुपयांचे बिल कोणी भरले, असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
 
सोमवारी पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि तपास यंत्रणांविरोधात दंड थोपटले आहेत. सर्वांना उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे? भाजपने पत्रकार परिषद जरुर पाहावीच, असे आव्हान संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांच्या या आव्हानानंतर आज किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदा कसल्या घेता. सरकार तुमचंच आहे. थेट कारवाई करा. मला टाका ना जेलमध्ये, मी येतो बॅग भरून, असं सांगतानाच साडे तीन लोकांना अटक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुहूर्त शोधत होते का? असा संतप्त सवाल सोमय्या यांनी केला आहे. मी मुद्द्यावरून हटणार नाही. जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळा झाला आहे. सर्वच त्यात सहभागी आहेत. त्यामुळे सर्वच घाबरले आहेत, असा दावाही सोमय्या यांनी केला.