1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (16:38 IST)

मंत्रालयात कडेकोट सुरक्षा तपासणी होत असतानाही दारुच्या बाटल्या कशा?

राज्याचा कारभार जिथून हाकला जातो त्या मंत्रालयात पुन्हा एकदा दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्रिमूर्ती पुतळ्याच्या मागे या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या बाटल्या आणल्या का हा प्रश्न उपस्थित होतोय. यापूर्वी देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर बसण्यासाठी असलेल्या व्हरांड्यात रिकाम्या बाटल्या आढळून आल्या होत्या. मात्र मंत्रालयात कडेकोट सुरक्षा तपासणी होत असतानाही या बाटल्या येतात कशा असा प्रश्न आहे.
 
भाजपचा हल्लाबोल
दरम्यान, मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडल्यानंतर भाजपने हल्लाबोल केला. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ही बाब म्हणजे शरम आणणारी आहे, असं म्हटलं.
 
प्रविण दरेकर म्हणाले, “मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या सापडणे अत्यंत दुर्दैवी, चीड आणणारी आणि शरम आणणारी अशी घटना आहे. एका बाजूला मंत्रालयामध्ये सर्वसामान्य लोकांना प्रवेश मिळणं, आपल्या न्यायहक्कासाठी दुरापास्त असताना, दारूच्या बाटल्या मंत्रालयांमध्ये कशा पोहचू शकतात ? दारूच्या बाटल्या मंत्रालयामध्ये कोणी आणल्या आणि कशासाठी आणल्या ? या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, संबंधितांवर कारवाई झालीचं पाहिजे”