Dharma Sangrah

संसार सुफळ झाला गे माय

Updated: शुक्रवार, 15 जुलै 2016 (12:46 IST)
 
आपण आज गायी घेऊन त्याच्या सोबत जायचे नाही तर वेगळ्या बनात जायचे. त्या प्रमाणे गोपाळ एके दिवशी ज्या जंगलात कृष्ण आपल्या गाई चारायला गेला आहे त्या बनात न जाता दुसर्‍या बनात जातात. कृष्णाला हे कळल्यानंतर तो ज्या बनात गोपाळ गेले आहेत त्या बनात जातो. मात्र गोपाळ त्याला आपल्यात घेत नाहीत. त्याच्या गायी आपल्या गायीत मिसळू देत नाहीत. त्याला आपल्या सोबत खेळायला घेत नाहीत. गोपाळांनी आपल्याला वेगळं टाकलं आहे, हे कळल्यानंतर देव कासावीस होतो आणि गोपाळांना विनंती करतो. अरे मला असे वेगळे टाकू नका. त्याचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात-
 
काकुळती येतो हरी। क्षणभरी निवडिता।।
 
क्षणभर जरी देवाला वेगळं केलं तरी तो भक्तांपासून वेगळा राहू शकत नाही. म्हणून वाट पाहे उभा भेटीची आवडी. या पांडुरंगाकडे गेले की सुख मिळते म्हणून सर्वजण जातात. परंतु विश्वात्मक दृष्टिकोन असलेले आणि विश्वासाच्या सुखाचा विचार करणारे ज्ञानेश्वर महाराज मात्र आपल्या एकटय़ाच्या सुखाची सोय पाहात नाहीत. तर संपूर्ण संसार (जग) सुखमय करून टाकील अशी प्रतिज्ञा करतात. मग महाराजांना लोकांनी प्रश्न केला की तुम्ही संपूर्ण जग सुखमय करण्याचा विचार करत आहात, परंतु ते तुम्हाला कसे शक्य होईल. त्याच्यासाठी तुम्ही काय साधन वापरणार आहात. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात..
 
अवघाची संसार सुखाचा करीन।
 
आनंदे भरीन तीही लोक।
 
जाईन गे मो ता पंढरपुरा
 
भेटेन माहेरा आपुलिया।।
 
ज्ञानेश्वर महाराज अशी संपूर्ण जगाला सुखरूप करण्याची प्रतिज्ञा करीत असताना एकनाथ महाराज तर म्हणतात माझ्या दृष्टीने संपूर्ण त्रैलोक्य आता सुखरूप झाले आहे. ते लोकांनी त्यांना विचारलं की त्रैलोक्य सुखमय झाल्याची अनुभूती तुम्हाला केव्हा मिळाली. तेव्हा एकनाथ महाराज सांगतात-
 
अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता।
 
चरणी जगन्नाथा चित्त ठेले।
 
त्या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालं. असं वारकरी संप्रदायातील प्रत्येक संताने पांडुरंगाच्या भेटीची आवड व्यक्त केलेली आहे. त्यांच्यावर श्रध्दा ठेवून भाविक पंढरपूरला येऊन त्या पांडुरंगाचे दर्शन घेतात. त्या देवावर इतकं निष्काम लोकांचं प्रेम असायचं कारण काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. प्रत्येक देवाला आपलं आपलं असं शास्त्र आहे. याचाच अर्थ त्या देवांनी काहींचं रक्षण केलेलं असताना काहींचा संहार केलेला आहे. या देवाच्या हातात एकही शस्त्र नाही. त्याने कुठला चमत्कार केल्याची उदाहरणे नाहीत. हेच या देवावर भक्तांच्या असलेल्या निस्सीम प्रेमाचं कारण आहे. केवळ करुणा हाच त्याचा आद्य ठेवा आहे. म्हणून त्याकडे येणारा भाविक कोणत्याही अपेक्षेने येत नाही. म्हणूनच कोणतीही अपेक्षा भंग होत नाही. या पालखी सोहळ्याकडे सुखाचा सोहळा म्हणून पाहिले जाते. आज अनेकाकडे पैसा आहे, ऐश्वर्य आहे, गाडय़ा आहेत, बंगले आहेत परंतु सुखाची आणि त्यांची मात्र भेट होत नाही. अशी संसाराने गांजलेली माणसे या पालखी सोहळ्यात येऊन सुखाचा शोध घेताना दिसतात. म्हणून पंढरपूरला जाणार्‍या पालखी सोहळ्याला एकवेळच्या  जेवणाची चिंता असणार्‍या गरिबापासून ते कुबेराशी स्पर्धा करणार्‍या श्रीमंतापर्यंत सर्व स्तरातील लोक या वारीत सहभागी होतात. जात, धर्म, गरीब, श्रीमंत हे सर्व भेद इथे नष्ट झालेले असतात. सर्वाना केवळ त्या पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेली असते. या सोहळ्यातील प्रत्येक  चराचर विठ्ठलम झालेले असते.
 
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडी उच्चारा।
 
विठ्ठल अवघा भांडवला। विठ्ठल बोलावा विठ्ठल।।
 
अशी त्यांची अवस्था झालेली असते. विठ्ठलाच्या ओढीने बावीस दिवसांचा प्रवास करून वारकरी पंढरपुरात पोहोचतात आणि जेव्हा त्या  सावळ्या सगुण पांडुरंगाचे दर्शन त्यांना होते तेव्हा त्यांच्या मुखातून आपोआपच अभंग बाहेर पडतो-
 
आजी संसार सुफळ झाला गे माय।
 
देखियेले पाय विठोबाचे।।

ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर 

सर्व पहा

Devshayani Ashadhi Ekadashi 2026 Wishes Images देवशयनी आषाढी एकादशी शुभेच्छा इमेजेस

उपवास नडणार नाही, पित्त वाढणार नाही! पाळा 'या' सोप्या ५ टिप्स

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

Budhwar Upay: बुधवारी करा हे चमत्कारी उपाय, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल

Ashadhi Ekadashi 2026 Wishes in Marathi आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश मराठीत

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments