नंतर त्याने आपला मोर्चा सूर्यदेवाकडे वळविला. सूर्यदेवानेच अमरत्वाचा वर दिल्याने त्यांनी अत्यंत दु:खी अंतःकरणाने सूर्यलोकाचा त्याग केला. तेथे क्रोधासुराने आपले राज्य स्थापन केले. तेव्हा सर्व देवतांनी गणेशाची आराधना करण्यास सुरवात केली. हे पाहून लंबोदर प्रकट झाले. लंबोदराने क्रोधासुराचा अहंकार मोडून त्याला नष्ट करण्याचे आश्वासन देवतांना दिले. आकाशवाणीने हा संवाद क्रोधासुराच्या कानावर गेला.
तेव्हा तो भयभीत होवून मूर्च्छित झाला. सैनिकांनी त्याला धीर दिला. संपूर्ण ब्रह्मांड आपल्या ताब्यात आहे. तेव्हा आपण आज्ञा करा.
आम्ही कोणत्याही प्रकारच्या शत्रूशी लढण्यास समर्थ आहोत, असे त्यांनी सांगितले. आपल्या सैनिकांची वीरवृत्ती पाहून क्रोधासुर अत्यंत प्रसन्न झाला आणि आपले अजेय सैन्य घेऊन समरांगणावर पोहचला. तेथे त्याने मूषकारूढ गजमुख, त्रिनयन, लंबोदराला पाहिले. त्यांच्या बेंबीत
नाग गुंडाळलेला होता.
लंबोदराचे हे विचित्र रूप पाहून तो अत्यंत क्रोधित झाला. दोघांत घनघोर लढाई झाली. लंबोदराबरोबर देवांनीही असुरांचा नाश करण्यास सुरवात केली. बळी, रावण, माल्यवान, कुंभकर्ण आणि राहू आदी महाबलवान योद्धे मृत झाल्याचे पाहून क्रोधासुर अत्यंत व्याकूळ झाला. तो लंबोदराला समोर पाहून त्याच्या वधाच्या वल्गना करू लागला. तेव्हा लंबोदर त्याला म्हणाले 'अरे दैत्य! तु व्यर्थ बडबड का करतो? मी तुझ्यासारख्या दुष्टाचा वध करण्यासाठीच आलो आहे.
तू सूर्यदेवाच्या वराचा प्रभाव पाडून मोठा अधर्म केला आहे. पण तुझ्या पापामुळे ते सर्व शुभ कार्य निष्फळ झाले आहे. आता मी तुझा आणि तुझ्या अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करणार आहे. तुला जिवंत राहायचे असेल तर मला शरण ये. माझ्याविषयी जाणून घ्यायचे असेल तर शुक्राचार्यांना विचार. ते मला जाणतात. क्रोधासुराच्या सर्व शंकाचे निवारण झाल्यानंतर तो लंबोदर चरणी लीन झाला. त्यांची भक्तीभावाने पूजा केली.
लंबोदराने त्याला क्षमा करून त्याला आपला भक्त मानले. नंतर त्यांची आज्ञा प्राप्त करून शांत जीवन व्यतीत करण्यासाठी पाताळात गेला. अशा प्रकारचा लंबोदराचा अवतार आहे.