Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना व्हायरस: भारतात लॉकडॉऊन अपयशी ठरलं का ?

Updated: गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (14:51 IST)
 
भारतात लॉकडॉऊन अयशस्वी झाला आहे का?
 
पब्लिक हेल्थ फॉऊंडेशन ऑफ इंडियाचे डॉ. गिरीधर आर बाबू यांच्यानुसार लॉकडॉऊन अयशस्वी ठरला असे म्हणता येणार नाही.
 
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितले, "कोरोना संसर्गाचा वेग कमी व्हावा आणि आवश्यक पूर्व तयारी करता यावी हा लॉकडॉऊनचा उद्देश्य होता. ही दोन्ही उद्दिष्टे आता पूर्ण झाली आहेत. लॉकडॉऊनमुळे कोरोनाचा विषाणू नष्ट होईल असे नव्हते. लस येणार नाही तोपर्यंत कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळणार."
 
काही प्रमाणात स्थानिक प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे लॉकडॉऊन अयशस्वी ठरला असं डॉ. गिरिधर यांना वाटते. मुंबई आणि दिल्लीत लॉकडॉऊन काळातही रुग्णसंख्या वाढत होती.
 
पण जेएनयू येथील सेंटर ऑफ सोशल मेडिसिन अॅण्ड कम्युनिटी हेल्थचे अध्यक्ष डॉ. संघमित्रा आचार्य यांना लॉकडॉऊन यशस्वी झाला असे वाटत नाही. लॉकडॉऊन पूर्णपणे अयशस्वी ठरला असं त्या सांगतात.
 
बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "सुरुवातीला कडक लॉकडॉऊनची आवश्यकता नव्हती. टप्याटप्प्याने लॉकडॉऊन करणं गरजेचे होते. केवळ हॉटस्पॉट परिसरात कडक निर्बंध लावणे अपेक्षित होते. पूर्ण देशात एकाच वेळी लॉकडॉऊन लागू करण्यात आल्याची ही पहिलीच घटना होती.
 
"यापूर्वी साथीच्या आरोग्य संकटात असे कधीही झाले नव्हते. आता जेव्हा संसर्ग वाढतोय तेव्हा अनलॉक करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नाही. लोकांचा जीव वाचवायचा आहे असे सुरुवातीला सांगितले गेले. त्यानंतर लोकांच्या उपजीविकेचा विचार करायचा आहे असे सांगण्यात आले."
 
या मताशी डॉ. गिरीधर आर बाबू सहमत नाहीत. ते सांगतात, "बोलण्यासाठी हे सोपे आहे पण भारतात ज्यावेळी लॉकडॉऊन लागू केला गेला तेव्हा अमेरिका आणि ब्राझीलमध्ये लॉकडॉऊन नव्हता. या दोन्ही देशांशी तुलना केली तर भरतात मृत्यू झालेल्यांची संख्या कमी आहे. मृत्यूदरही कमी आहे."
 
ते पुढे म्हणतात, "वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे पाहिले तर ज्या देशांमध्ये देशव्यापी लॉकडॉऊन लागू झाले अशा देशांमध्ये मृत्यू आणि रुग्णांची संख्या कमी आहे. अनेक देशांच्या बाबतीत हे आढळून येते."
 
कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर झालेले मृत्यू आणि त्याच्या आकडेवारीबाबत डॉ. संघमित्रा आचार्य यांचे मत वेगळे आहे.
 
त्या सांगतात, " सुरुवातीला सरकारने कोरोनाचा वाढता संसर्ग आणि आकडेवारी पाहून लोकांच्या मनात भीती निर्माण केली. कोरोनाचा संसर्ग अधिक असून मृत्यूदर कमी आहे हा अनुभव सुरुवातीपासून येत आहे. तीन टक्क्यांपेक्षा अधिक मृत्यूदर कधीही वाढला नाही. आता संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या मोठी दाखवण्यात येते आणि मृत्यू दर कमी असून रिकव्हरी दर अधिक असल्याचे सांगितले जाते. खरं तर ही परिस्थिती पहिल्यापासून अशीच आहे."
 
हा ट्रेंड पहिल्यापासून असाच सांगितला गेला असता तर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले नसते असं त्या सांगतात. यामुळे लोकांचे मानसिक आरोग्य बिघडले नसते.
 
त्या पुढे म्हणतात, "सरकारने कशा पद्धतीने आपले प्रधान्य बदलले हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोरोनाच्या संसर्गाची भीती निर्माण केल्यानंतर जेव्हा कोलमडलेली अर्थव्यवस्था उभारण्याची वेळ आली तेव्हा सरकार मृत्यूदर कमी असल्याचे सांगत आहे. सुरुवातीपासूनच सरकारने याबाबत बोलायला हवे होते. शिवाय, अर्थव्यवस्थेला उभारी मिळतेय असंही नाही."
 
केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2020-2021 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून या कालावधीत विकास दरात 23.9 टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली आहे.
 
कोरोना आरोग्य संकट आणि लॉकडॉऊनमुळे पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी दर 18 टक्क्यांनी कमी होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
 
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अंदाजानुसार हा दर 16.5 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो, पण ताजी आकडेवारी धक्कादायक आहे.
भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात
भारतात कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात 2 सप्टेंबरपर्यंत 8 लाख 25 हजार 739 इतकी रुग्णसंख्या आहे. तर दरदिवशी साधारण 15 - 16 हजार इतकी रुग्णांची वाढ होत आहे. तर महाराष्ट्रात मृत्यूदर हा 3.08 टक्के इतका आहे.
 
महाराष्ट्रातही नुकतीच अनलॉक 4 बाबत नियमावली जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी लोकांचे बरे होण्याचे प्रमाण आणि मृत्यू दर कमी आहे असे राज्य सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे.
 
राज्यांतर्गत प्रवास आता सुरू झाला आहे. एसटी आणि रेल्वेतून राज्यांतर्गत प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. काही निर्बंधांसहित दुकानं आणि बाजारपेठा उघडण्यात आल्या आहेत.
 
पण महाराष्ट्र सरकार लॉकडॉऊनमध्ये राज्याचा कारभार यशस्वीरीत्या चालवत नसल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे.
 महाराष्ट्र रशियाला मागे सोडणार? कोरोना केसमध्ये पेरूला मागे टाकले
लॉकडॉऊनच्या काळात राज्य सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरले असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला. यासाठी मनसकडून लोकांचा सर्वेही करण्यात आला.
 
सामान्य जनतेसमोर आर्थिक संकट असून लॉकडॉऊन पूर्णपणे उघडा अशी मागणीही विविध पक्षांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांकडून लॉकडॉऊन उघडण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, "कोरोनाची भीती दाखवून सरकारने लॉकडॉऊन लागू केले आहे. सरकार जनतेची फसवणूक करत आहे."
 
तर मुख्यमंत्री घरातून कामकाज करत असून मंत्रालयातही येत नाहीत असा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: मुंबई विद्यापीठाने परीक्षेच्या प्रवेशपत्रांसाठी APAAR ID अनिवार्य केला

APAAR आयडीशिवाय परीक्षेचे प्रवेशपत्र दिले जाणार नाही, मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय

WhatsApp Scam Alert आता एआय (AI) फसवणुकीचे संदेश ओळखेल, वापरकर्त्यांना लवकर सूचना मिळतील

पालघरमधील तारापूर एमआयडीसीमध्ये उत्पादनादरम्यान भीषण स्फोट; अनेक कामगार रुग्णालयात दाखल

मुंबई आयकर कार्यालयाच्या तळघरात भीषण आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण

पुढील लेख