Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उष्णता लाट भारत : यंदा ऊन जरा जास्तच आहे का?

Updated: गुरूवार, 28 एप्रिल 2022 (18:30 IST)
 
गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीचा पारा 44 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याचं नोंदवण्यात आलं.
 
भारतीय हवामान विभागात वरीष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम पाहणारे नरेश कुमार यांनी याविषयी अधिक माहिती दिली.
 
त्यांच्या मते, "उष्णतेची लाट येण्याचं कारण म्हणजे वातावरणात अचानक झालेला बदल होय. यामध्ये प्रमुख कारण कमकुवत वेस्टर्न डिस्टर्बन्स.
 
भूमध्य क्षेत्रात निर्माण होणाऱ्या वादळांमुळे वायव्य तसंच मध्य भारतात पाऊस पडत असतो. पण कमकुवत वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हा पाऊस पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे मार्च महिन्यात उष्ण आणि कोरडं वातावरण निर्माण झालं आहे."
 
या बदलाचे परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहेत. तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे पीकावरही त्याचा परिणाम झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. या सगळ्याचा पुरवठा साखळीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
उष्णतेत वाढ झाल्यामुळे विजेची मागणीही वाढली आहे. परिणामी काही राज्यांमध्ये वीज आणि कोळशाचा तुटवडा जाणवत असल्याचं दिसून येतं.
 
उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी भारतात अनेक उपाय केले जातात. मातीच्या डेऱ्यात पाणी साठवणं. शरिरावर कैरीचा लेप लावणं अशा गोष्टी ग्रामीण भागात केल्या जातात.
 
भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्थेत हवामान शास्त्रज्ञ म्हणून काम पाहणारे रॉक्सी मॅथ्यू कोल म्हणतात, "भारतात उष्णतेची लाट येण्याची अनेक कारणे आहेत. पण या सगळ्यांचं मूळ कारण ग्लोबल वॉर्मिंग हेच आहे. या विषयाबाबत अधिक संशोधन होण्याची गरज आहे."
 
इन्स्टिट्यूट ऑफ क्लायमेट चेंज स्टडीजचे डी. शिवानंद पै यांच्या मते, हवामान बदलासोबतच लोकसंख्या वाढ आणि त्यामुळे संसाधनांवर पडणारा अतिरिक्त ताण हे यामागचं कारण मानलं जाऊ शकतं.
 
या कारणांमुळे जंगलतोड, वाढतं दळणवळण, नागरीकरण यांच्यात वाढ होऊ लागली आहे, असं ते सांगतात.
 
ते म्हणतात, "आपल्याकडे सर्वत्र काँक्रीटचे रस्ते तयार झाले आहेत. त्यामुळे उष्णता शोषून घेतली न जाता पृष्ठभागावरच अडकून राहते. यामुळे हवाही गरम होते."
 
वातावरणात उष्णता वाढल्याचा फटका सर्वाधिक कुणाला बसत असेल तर ते म्हणजे गरिबांना. याविषयी बोलताना इंडियन इन्स्टीट्यूट फॉर ह्यूमन सेटलमेंट अँड इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजमध्ये वरीष्ठ संशोधक म्हणून काम करणाऱ्या डॉ. चांदनी सिंह यांच्याशी बीबीसीने चर्चा केली.
 
त्या म्हणतात, "गरिबांकडे उष्णतेविरोधात लढा देण्यासाठी खूपच कमी संसाधने असतात. उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्याचं गंभीर नुकसान होऊ शकतं. त्यातही त्याचा परिणाम गरिबांना जास्त दिसून येतो. प्रशासनाने हवामानात होणाऱ्या तीव्र बदलांमुळे लोकांच्या आयुष्य कसं बदलतं, याकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे."
 
त्या पुढे सांगतात, "रात्रीच्या वेळीही तापमान जास्तच असेल तर शरीर ते सहन करू शकत नाही. यातून आजारपण आणि मग हॉस्पिटलचा अतिरिक्त खर्च या समस्या पुढे उभ्या होतात."
 
कोल यांच्या मते, या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी दूरगामी दृष्टीकोन ठेवणं गरजेचं आहे.
 
ते म्हणतात, भारतात अशीही काही ठिकाणे आहेत, जिथे उष्णता जास्त नाही. पण हवामानातील आर्द्रतेमुळे इथलं आयुष्य कठीण आहे. याठिकाणी उष्णतेची लाट आणि आर्द्रता यांचा एकत्रित परिणाम कसा होतो, हे तपासणंही गरजेचं आहे."
 
याशिवाय प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असलेल्या ठिकाणांकडे लक्ष देणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.
 
ते पुढे सांगतात, "भारतात ग्रामीण भागात रस्त्याच्या कडेला एखादं छप्पर टाकून, झाडाखाली कित्येक शाळा चालतात. अशा उन्हात याठिकाणी शिक्षण घेणं अतिशय अवघड आहे."
 
2015 पासून देशातील केंद्र आणि राज्य सरकारांनी उष्णतेच्या लाटेचे परिणाम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उदा. उष्णतेच्या वेळांमध्ये बाहेर काम करण्यावर आळा घालणे इ.
 
परंतु कामगार कायद्यात योग्य प्रकारे बदल करून त्याची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने झाली, तरच हे शक्य होणार आहे, असं डॉ. सिंग यांना वाटतं.
 
याशिवाय डॉ. सिंग यांनी इतर काही मुद्द्यांकडेही लक्ष वेधलं. त्या म्हणतात, "आपल्या देशात इमारतींचं बांधकाम करताना उष्णता आतमध्येच अडकून राहील, अशा पद्धतीने केलं जातं. ही पद्धत बदलायला हवी. घरांमध्ये हवा खेळती राहावी, याला पहिलं प्राधान्य असावं. जगभरात याबाबत विविध संशोधन होत आहे, त्यांचा विचार आपल्यालाही करता येऊ शकतो."
 
त्या पुढे म्हणतात, "आपण काही गोष्टी योग्य करत आहोत. पण काही गोष्टींच्या बाबतीत एक पाऊल पुढे जाऊन विचार करणं आवश्यक आहे. कारण आगामी काळात उष्णतेसोबत जगणं आपल्याला शिकून घ्यावं लागणार आहे."

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

केस धुण्यापूर्वी केसांना योग्यरित्या तेल लावण्यासाठी या टिप्स अवलंबवा

रजोनिवृत्तीनंतर हाडे कमकुवत होण्याचा धोका वाढतो! ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी हे उपाय नक्की करा

उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी कोणते योगासन करावे जाणून घ्या

लघु कथा : गवळण आणि तिची स्वप्ने

व्याधींपासून मुक्ती! तुमच्या बागेत असायलाच हव्यात 'या' आयुर्वेदिक वनस्पती

पुढील लेख
Show comments