Dharma Sangrah

श्रावण सरी

मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (16:28 IST)
श्रावण मास सुरु झालेला आहे.. सर्वांचीच मने हर्षोउल्हासित करणारा हा महिना अनेक कवितांमधून, गीतांमधून अनेक कविंनी रंगवलेला आहे  . . . .
 
ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा
 
हे गाणं कोणी आणि कधी लिहिलंय कोणास ठाऊक? लहानपणी ज्यानं हे पाऊसगाणं म्हटलं नसेल तो लहानच नसावा कधी. एक `पैसा’ हे नाणं चलनातून कधीच बाद झालंय. पण आजची कॉन्व्हेंटमधली मुलंही हे गाणं म्हणत पहिल्या पावसात भिजतात. गुगलवर सर्च मारला तरी हे गाणं वाचायला मिळतं. गाणं एवढं साधं, सरळ सोपं, की भर्रकन् पाठ व्हावं. एकही जोडशब्द नाही की बोजड शब्द नाही. लहानपणच्या पावसाचं दुसरं एक गाणं…
 
नाच रे मोरा,
आंब्याच्या बनात,
नाच रे मोरा नाच…
 
हे तर कविता म्हणून बालभारतीच्या पुस्तकातही होतं. बाहेर पाऊस सुरू झाला की त्याच्या लयीत सगळ्या वर्गानं हे गाणं एका सुरात म्हणायचं. मोराचं पहिलं दर्शन झालं होतं ते बालभारतीच्या पुस्तकातच.
 
भरपूर पाऊस यावा अन् शाळेला सुट्टी मिळावी. रेडिओ बहुदा बालगोपाळांच्या मनातली ही भावना नेमकी ओळखायचा. अगदी शाळेत जातानाच रेडिओवर....
 
सांग सांग भोलानाथ,
सांग सांग भोलानाथ,
पाऊस पडेल काय
शाळेभोवती तळे साचून,
सुट्टी मिळेल काय ...
 
हे गाणं लागायचं. श्रावणात पडणाऱ्या पावसासाठी मराठी कवितेत `रिमझिम’ हा शब्द वापरला गेलाय. कित्येक मराठी गाण्यांतून ही 'रिमझिम’ झरताना दिसते. श्रावण महिना म्हटलं की यमुना नदीच्या किनाऱ्यावर हिरवळीवर खेळणारा बाळकृष्ण आणि त्याचे सवंगडी आठवतातच. नदीला पूर आल्यानंतर या कान्हाला शोधणारी यशोदा गाण्यातून दिसते.
 
रिमझिम पाऊस पडे सारखा,
यमुनेलाही पूर चढे,
पाणीच पाणी चहूकडे, ग बाई,
गेला मोहन कुणीकडे’
 
पूर्वी रेडिओवर हे गाणं हमखास लागायचं. गीतकार पी. सावळाराम, संगीतकार वसंत प्रभू आणि लता मंगेशकर ही नावं या गाण्याला चिटकूनच यायची. हिरवा श्रावण आणि रिमझिम बरसणारा पाऊस हा प्रेमीजनांना साद घालतो. अनामिक हुरहूर लावतो.
 
झिमझिम झरती श्रावणधारा
धरतीच्या कलशा
प्रियाविण उदास वाटे रात
 
कवी मधुकर जोशींनी `रिमझिम’या नेहमीच्या शब्दाऐवजी `झिमझिम’असा शब्द वापरला आहे. तो वेगळाच नाद उत्पन्न करतो. पाऊस आणि व्याकुळता हा संबंध फार प्राचीन काळापासून आहे. शंभराहून जास्त वर्षांपूर्वी नाट्य़ाचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी संगीत सौभद्र नाटकासाठी लिहिलेलं हे गीत अजूनही लोकप्रिय आहे.
 
नभ मेघांनीं आक्रमिलें,
तारांगण सर्वहि झांकुनि गेले
कड कड कड कड शब्द करोनी
लखलखतां सौदामिनी
जातातचि हे नेत्र दिपोनी
अति विरही जन ते व्याकुळ झाले’
 
नवकवितेच्या आधुनिक काळातले कवी ग्रेस म्हणजे ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीने समजून घ्यावेत. बाकी काही असो,
पाऊस कधीचा पडतो,
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली,
दुःखाच्या मंद सुराने
पेटून कशी उजळेना,
ही शुभ्र फुलांची ज्वाला
ताऱ्यांच्या प्रहरापाशी,
पाऊस असा कोसळला 
 
किंवा
 
ती गेली तेव्हा रिमझिम,
पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे
हा सूर्य सोडवित होता
 
ही ग्रेसगाणी कोणालाही व्याकूळ करतात. आषाढ संपून श्रावणमास सुरू होईपर्यंत पावसाचा जोर जरा ओसरू लागलेला असतो. पण त्यानं निसर्गावर हिरवी पोपटी जादू केलेली असते. श्रावण महिना आणि बालकवींची कविता यांचं युगानुयुगांचं नातं जुळलेलं आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरूनी ऊन पडे…
 
बालभारतीच्या पुस्तकात हे गाणं चिरंजीव झालं आहे. प्रत्येक पिढीचं हे गाणं तोंडपाठ आहे. सिनेमा आणि पावसाची गाणी ही तर  एकमेकांच्या हातात हात गुंफूनच येतात. श्रावणाची आठवण निघालीय आणि कविवर्य भा. रा. तांबे आठवत नाहीत, असं होतच नाही. त्यांची

पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहूनिया दूर
झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी
हिरवे हिरवे गार शेत हे सुदंर साळीचे
झोके घेती कसे चहुकडे हिरवे गालिचे..’
 
ही कविता ओठ गुणगुणू लागतातच. आभाळ भरून कोसळू लागलं की ग. दि. माडगूळकरांनी `वरदक्षिणा’ सिनेमासाठी लिहिलेलं गाणं 
 
मनात वाजू लागतं.
घन घन माला नभी दाटल्या,
कोसळती धारा
केकारव करी मोर काननी
उभवून उंच पिसारा’

मल्हार रागात बांधलेलं हे गाणं ऐकूनच जणू मेघांमधला पाऊस धरतीवर बरसत असावा. यौवनसुलभ भावना व्यक्त करण्यासाठी एखाद्या मुलीनं आधार घ्यावा तो पावसाचाच. आशा भोसलेंनी गायलेल्या

आज कुणीतरी यावे,
ओळखिचे व्हावे
जशी अचानक या धरणीवर
गर्जत आली वळवाची सर,
तसे तयाने गावे
 
या गाण्यानं कित्येक नवपरिणीतांना हुरहूर लावली. रानकवी ना. धों. महानोरांनी लिहिलेली पाऊसगाणी तर अजरामर झालीत.`जैत रे जैत’ सिनेमासाठी त्यांनी लिहिलेलं
 
नभं उतरू आलं,
चिंब थरथर वलं,
अंग झिम्माड झालं,
हिरव्या बहरात’

परदेशस्थ मराठी माणसं हे गाणं आयपॉडवर ऐकत आपलं मराठीपण जागवत असतात. पावसाच्या सोबतीनं ताल धरणारी धम्माल कोळीगीतं तर इतर भाषिकांनाही ताल धरायला लावतायत. कवयित्री शांता शेळकेंनी लिहिलेलं

वादलवारं सुटलं गो,
वाऱ्यानं तुफान उठलं गो
भिरभिर वाऱ्यात,
पावसाच्या माऱ्यात
सजनानं होडीला पान्यात लोटलंय
वादलवारं सुटलं गो…
 
हे गाणं अजूनही कोणालाही रोमांचीत करतं. शांताबाईंच्या सुंदर गीतांना सुधीर फडकेंनी अप्रतिम चाली लावल्या. त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनीही नव्याकोऱ्या पध्दतीच्या संगीतरचना करून शांताबाईंची गाणी बसवली. त्यातलं श्रावण महिमा सांगणारं हे गाणं –

ऋतु हिरवा, ऋतु बरवा,
पाचूचा वनि रुजवा
युग विरही हृदयांवर
सरसरतो मधु शिरवा,
ऋतु हिरवा’
 
शांता शेळकेंनी पावसावर प्रेमगीतं लिहिली, कोळीगीतं लिहिली, तशीच बालगीतंही लिहिली. 
असंच एक गोड गाणं त्या काळातल्या बालगायिका सुषमा श्रेष्ठ हिच्या आवाजात संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केलंय.
 
पाऊस आला, वारा आला,
पान लागले नाचू
थेंब टपोरे गोरे गोरे,
भर भर गारा वेचू’
 
आपल्या पिढीला मंगेश पाडगांवकरांच्या गीतांनी भुरळ घातली. नुसतीच भुरळ घातली नाही तर जीवनाचा आस्वाद घेण्याची दृष्टीही दिली. त्याचं अरुण दातेंनी गायलेलं,

भेट तुझी माझी स्मरते
अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती
रात्र पावसाची
 
हे गाणं पाऊस आला की अजूनही आपोआप ओठांवर येतं. मुंबईतल्या गर्दीत अन् लोकलच्या खडखडाटात कसला आलाय श्रावण, असं तुम्ही म्हणाल. पण पाडगावकर तुमची विकेट घेतील.
 
श्रावणात घन निळा बरसला
रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतुन
अवचित हिरवा मोरपिसारा ..
 
हे अतिव सुंदर गीत त्यांनी याच धावपळीत लोकलमध्ये जाता येता लिहिलंय. कॉलेजवयात आरती प्रभूंचं आकर्षण वाटू लागलं ते त्यांच्या पाऊसगाण्यांमुळं.
ये रे घना, ये रे घना,
न्हाऊ घाल माझ्या मना’
 
पावसाचा अन् मनभावन श्रावणाचा हा गंध मनात असाच दरवळत राहावा. त्याच्या पोपटी कोवळ्या रुपाचा तजेला तनमनाला उल्हसित करीत राहावा. बस्स!आणखी काय हवं ?

- सोशल मीडिया

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

पंचतंत्र : मूर्ख राजा आणि बुद्धिमान माकडाची गोष्ट

Birthday Wishes For Wife in Marathi बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

Vat Purnima Wishes for Husband in Marathi नवऱ्याला वटपौर्णिमा शुभेच्छा

Vat Purnima Wishes for Wife in Marathi पत्नीला पाठवा खास वटपौर्णिमेच्या शुभेच्छा

ॲसिडिटीची भीती नाही! वटपौर्णिमेच्या उपवासासाठी बनवा हलका-फुलका आणि पौष्टिक फराळ

पुढील लेख
Show comments