Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑलिंपिक किती वर्षांनी होतं? आधुनिक ऑलिंपिकला सुरुवात कधी झाली?

Updated: मंगळवार, 23 जुलै 2024 (10:34 IST)
 
पण महिला आपल्या मालकीचे घोडे या ऑलिंपिकमध्ये रथांच्या स्पर्धेत उतरवू शकत होत्या. तसंच दर चार वर्षांनी झ्यूसची पत्नी हेराच्या सन्मानार्थ केवळ अविवाहीत महिलांच्या खेळाचं आयोजन केलं जायचं.
 
ग्रीक संस्कृतीचा प्रभाव ओसरत गेला, तसे हे खेळ मागे पडत गेले आणि काहींना त्यांचा साफ विसर पडला होता.
 
आधुनिक ऑलिंपिकचा जन्म
फ्रेंच जहागीरदार पिएर द कुबेर्तान यांना आधुनिक ऑलिम्पिकच्या आयोजनचा श्रेय दिलं जातं, पण त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली होती ती इंग्लंडंमधल्या वेनलॉक ऑलिंपिक गेम्समधून.
 
‘मच वेनलॉक’ गावी जन्मलेले डॉ. विल्यम पेनी ब्रुक्स यांनी आपल्या परिसरातील तरुणांना शिस्त लागावी, त्यांची तब्येत सुधारावी अशा उद्देशानं 1850 साली वेनलॉक ऑलिंपिक गेम्सची सुरुवात केली होती.
 
या वेनलॉक क्रीडास्पर्धांमधूनच पिएर द कुबेर्तान यांना आधुनिक ऑलिंपिक खेळांच्या आयोजनाची प्रेरणा मिळाली होती. कुबेर्तान हे शिक्षणतज्ज्ञ होते. ते श्रीमंतही होते.
 
कुबेर्तान इंग्लंडमधल्या शाळांच्या कामाच्या पद्धतीवर संशोधन करण्यासाठी गेले असताना त्यांना तिथे खेळावर कसा भर दिला जातो, खेळातून मूल्यशिक्षण देता येतं आणि समाजाविषयी जागरुकता कशी निर्माण करता येते, याची जाणीव झाली.
 
कुबेर्तान यांचे फ्रान्समधल्या शाळांमध्ये क्रीडासंस्कृती रुजवण्याचे प्रयत्न तेवढे यशस्वी झाले नाहीत. पण त्या सगळ्यांतून त्यांना प्राचीन ऑलिंपिकचं पुनरुज्जीवन करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या कल्पनेतल्या या ऑलिम्पिकमध्ये देशविदेशातले खेळाडू सहभागी होणार होते आणि आपापसातलं वैर विसरून खेळाच्या मैदानात उतरणार होते.
 
कुबेर्तान यांच्या प्रयत्नांतून फ्रान्समध्ये 1894 साली 23 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना झाली. दोनच वर्षांत ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये पहिल्या आधुनिक ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं.
 
पहिले ऑलिंपिक खेळ
एप्रिल 1896 मध्ये अथेन्सच्या पॅनाथेनिक स्टेडियममध्ये पहिल्या आधुनिक ऑलिंपिक खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी 43 क्रीडाप्रकारांमध्ये फक्त 14 देशांचे जेमतेम 200 पुरुष खेळाडू सहभागी झाले होते.
 
पहिल्या ऑलिंपिक मध्ये टेनिस, ट्रॅक अँड फिल्ड, फेन्सिंग, वेटलिफ्टिंग, सायकलिंग, कुस्ती, नेमबाजी, जलतरण आणि जिमनॅस्टिक्सचा समावेश होता. क्रिकेट आणि फुटबॉललाही त्या स्पर्धेत स्थान मिळालं होतं, पण पुरेशा खेळाडूंअभावी ते रद्द करावं लागलं.
 
चार वर्षांनी दुसऱ्या ऑलिंपिकमध्ये काही खेळांत पहिल्यांदाच महिलांना स्थान मिळालं.
 
त्यानतंर पुढच्या 125 वर्षांत या क्रीडास्पर्धेनं बरेच चढउतार पाहिले आहेत, लोकांना खेळावर प्रेम करायला शिकवलं आहे आणि त्यांना संकटकाळात प्रेरणा दिली आहे.
 
ऑलिंपिक दर 4 वर्षांनी का होतं?
प्राचीन काळी ग्रीसमधल्या ऑलिम्पिया नगरीमध्ये दर 4 वर्षांनी खेळ म्हणजेच 'ऑलिंपिक' होई, आणि हीच परंपरा पुढे सुरू ठेवण्यात आली.
 
दोन ऑलिंपिकदरम्यानच्या 4 वर्षांच्या काळाला ऑलिम्पियाड म्हटलं जाई. आणि हे त्याकाळी कालगणनेचं मापही होतं. म्हणजे वर्षांऐवजी ऑलिम्पियाडमध्ये कालगणना केली जाई.
 
महिलांना ऑलिंपिकमध्ये केव्हापासून सहभागी होता येऊ लागलं?
1900 साली पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये महिला पहिल्यांदा सहभागी झाल्या. हे दुसरंच ऑलिंपिक होतं.
 
या ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या 997 अॅथलीट्सपैकी 22 महिला होत्या.
 
टेनिस, सेलिंग, क्रोके (Croquet), इक्वेस्ट्रियानिझम (घोडेस्वारीशी निगडीत स्पर्धा), आणि गोल्फ या खेळ प्रकारांत महिला अॅथलीट्स सहभागी झाल्या.
 
2012मध्ये लंडन ऑलिंपिकमध्ये महिलांच्या बॉक्सिंगचाही समावेश झाला तेव्हापासून ऑलिंपिकच्या सर्व क्रीडा प्रकारांत महिलांचा समावेश झाला. 1991पासून ऑलिंपिकमध्ये नवीन खेळाचा समावेश करण्यासाठी एक नियम करण्यात आला. महिला आणि पुरुष अशा दोन्ही अॅथलीट्सचा सहभाग ज्या खेळात असेल, तोच ऑलिंपिकमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो.
 
टोकियो 2020 ऑलिंपिकमध्ये कराटे, स्केटबोर्डिंग, सर्फिंग, क्लाईंबिंग या खेळांचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला.
 
2016 च्या रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी 45% महिला होत्या.
 
2024 च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी महिला खेळाडूंचं प्रमाण 50 टक्के एवढं म्हणजे समसमान झालं.
 
ऑलिंपिकचं बोधचिन्हं काय सांगतं?
एकमेकांत गुंफलेल्या पाच रिंगा हे ऑलिंपिकचं बोधचिन्ह आहे. याला ऑलिंपिक रिंग्स म्हटलं जातं. जगभरातल्या अब्जावधी लोकांचं प्रतिनिधित्व या रिंगा करतात.
 
ऑलिंपिकचे जनक मानले जाणाऱ्या पिएर द कुबेर्तान यांनी पहिल्यांदा हा लोगो तयार केला.
 
पाच खंडांचं द्योतक असणाऱ्या या रिंगा विविध रंगांच्या, पण समान आकाराच्या आणि एकमेकांमध्ये गुंफलेल्या आहेत. जगभरातल्या लोकांचं एकत्र येणं यावरून दर्शवतात.
 
पांढऱ्या पार्श्वभूमवीवरच्या या रिंगा निळा, पिवळा, काळा, हिरवा आणि लाल रंगात असतात.
 
ऑलिंपिक डे म्हणजे काय?
ऑलिंपिक ही केवळ एक क्रीडास्पर्धा नाही, तर खेळाचा प्रसार करणारी आणि त्यातून लोकांना एकत्र आणणारी एक मोठी विश्वव्यापी चळवळ आहे.
 
ऑलिंपिक चळवळीचं हे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी वर्षातला एक दिवस ऑलिंपिक दिवस म्हणून साजरा केला जावा, असा प्रस्ताव पहिल्यांदा 1947 साली मांडण्यात आला होता.
 
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीतले चेकोस्लोवाकियाचे प्रतिनिधी डॉक्टर ग्रुस यांनी मांडलेली ही संकल्पना सर्वांनीच पुढे उचलून धरली आणि काही महिन्यांनी तिला मूर्त रूपही मिळालं.
 
तेव्हापासून 23 जून या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या स्थापना दिवशी किंवा त्याच्या आसपासच्या एखाद्या सोयीस्कर दिवशी वेगवेगळ्या देशांतल्या राष्ट्रीय ऑलिंपिक समितींतर्फे त्या त्या देशात ऑलिंपिक डेचं आयोजन केलं जातं. त्यानिमित्तानं खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
 
वय, वर्ण, लिंग, सामाजिक पार्श्वभूमी काहीही असो, सगळ्यांनाच म्हणजे अगदी अजिबात कोणताही खेळ न खेळणाऱ्या व्यक्तींनाही यात सहभाग घेता यावा, ही अपेक्षा ठेवली जाते. काही देशांत तर ऑलिंपिक डे हा शाळेतील महत्त्वाचा सोहळा बनला आहे.
 
2020-21 मध्ये कोव्हिडच्या जागतिक साथीनं सगळीकडे निराशेचं सावट पसरलेलं असताना तर ऑलिंपिक डेचं महत्त्व आणखी वाढलं.
 
अनेक आजी माजी ऑलिंपियन खेळाडूंनी या काळात लोकांना प्रेरणा दिली आहे, खेळानं लोकांच्या जगण्यात सकारात्मकता आणली आहे आणि शारिरीक तसंच मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठीही मदत केली आहे, असं IOC ने नमूद केलं होतं.
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

यवतमाळच्या बोरगाव धरणावर सहलीसाठी गेलेल्या कॉलेजच्या दोन विद्यार्थिनी सेल्फी काढताना बुडाल्या

LIVE: 'कॉकरोच जनता पार्टी' स्वातंत्र्यदिनी हिंगोली जिल्ह्यात शाळा सुधारण्यासाठी उपक्रम सुरू करणार

किश्तवारमध्ये मोठा अपघात, महिंद्रा स्कॉर्पिओ चिनाब नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

हातात इंजेक्शन आणि औषधे पण डॉक्टरी पदवी नाही! मुंबईत बनावट डॉक्टरांचा पर्दाफाश

'शाळा ठीक करा' अभियान; स्वातंत्र्यदिनी हिंगोलीमध्ये सीजेपीकडून घोषणा

पुढील लेख