शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑगस्ट 2020 (08:59 IST)

'या' प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही : आदित्य ठाकरे

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या प्रकरणावरून सध्या विरोधी पक्ष ठाकरे सरकार आणि पोलिसांवर आरोप करत आहेत. तसेच या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा संबंध असल्याचे देखील बोलले जात आहे. पण अखेर या प्रकरणाबाबत आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले आहे. ‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण करू नका. या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही’, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. 
 
आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुधा, महाराष्ट्र सरकारे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिशः माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही.’
 
पुढे ते म्हणाले की, ‘सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू दुदैवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत वर महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे. पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबर ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. या प्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे. अशाप्रकारे चिखलफेकी करून सरकार आणि ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कोणी राहू नये. तूर्त इतकेच’.