शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 जुलै 2021 (18:04 IST)

महाराष्ट्र १ ऑगस्टपासून लॉकडाउनमध्ये शिथिलता

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाली असल्याने काही जिल्ह्यात निर्बंधात शिथिलता आणली जावी अशी मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात 1 ऑगस्टपासून 25 जिल्ह्यात निर्बंध अजून शिथिल करण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तर उर्वरीत 11 जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तेथील निर्बंध वाढण्यात येतील, असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
 
या दरम्यान टोपे यांनी म्हटले की अजूनही धोका टळलेला नाही. दुसरी लाट कमी होताना दिसत आहे. मात्र, तिसरी लाट केव्हा येईल हे सांगता येत नाही. 
 
निर्बंध कुठे असतील कायम?
राज्यातील 11 जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील नगरमध्ये निर्बंध कायम राहतील. हे 11 जिल्हे लेव्हल तीनमध्येच राहणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.
 
पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या जिल्ह्यात निर्बंध शिथिलता
२५ जिल्ह्यांमध्ये शिथिलता
११ जिल्हे तिसऱ्या लेव्हलमध्येच राहणार
दुकाने, रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा
दोन ते तीन दिवसात रेल्वेचा निर्णय
 
सिनेमा गृह आणि मॉल मधील कर्मचारी यांच लसीकरण पूर्णपणे करून चालू ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. रेल्वे विभागाशी चर्चा करून लोकल सुरू करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं टोपे यांनी सांगितलं. लोकल प्रवासाबाबत पुढील एक ते दोन दिवसांत निर्णय येण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले.